राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार- संभाजीराजे छत्रपती : ‘स्वराज्य’ संघटनेची केली घोषणा

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे-मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. परंतु, या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे स्पष्ट करत माझ्या कामाची दखल गेऊन सर्व पक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेत पाठवावं असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. दरम्यान, आज ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केल्याची घोषणाही त्यांनी केली. ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात कुणीही वावगं समजू नये असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.

पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांचे हे दोन निर्णय जाहीर केले.

संभाजीराजे म्हणाले, “या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. यावर्षीची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. राजकारण विरहीत, समाजाला दिशा देताना मी कधीही त्याचा फायदा कोणाला होतो आहे न पाहाता समाजाचं हित पाहिलं. त्यामुळे माझा अधिकार बनतो की सर्वांनी अपक्ष म्हणून मला पाठिंबा देणं गरजेचं आहे. फक्त छत्रपतींचा वंशज म्हणून नाही, तर माझी कार्यपद्धती पाहून जे २९ अपक्ष आमदार आहेत, त्यांनी मोठं मन दाखवायला हवं आणि मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मी तुम्हाला नक्कीच भेटून माझी बाजू समजावून सांगणार आहे. माझ्या कामाची दखल गेऊन तुम्ही मला राज्यसभेत पाठवावं अशी विनंती मी सर्वपक्षीय नेत्यांना करतो. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवणार आहे. मी आजपासून कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही”, असं संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले.

स्वराज्य संघटनेची केली घोषणा

मला वेगवेगळ्या संघटनांचे, पक्षांचे लोक पाठिंबा देतात. ही छत्रपती घराण्याची ताकद आहे. मला चांगले-वाईट अनुभव देखील आले. या जनतेला एका छताखाली कसं आणता येईल, हा माझा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच राहिला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या सगळ्यांना संघटित करण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी, सगळ्यांच्या कल्याणासाठी मी आणि आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन करत आहोत असे सांगत त्यांनी या संघटनेचं नाव ‘स्वराज्य’’ असेल असे सांगितले. संघटनेच्या छताखाली सर्वांना एकत्र आणण्यासाठी मी याच महिन्यात राज्याचा दौरा करणार आहे. लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी हा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि पंतप्रधान मोदी यांनी मला बोलवून विनंती केली की आपण राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. मी खासदार झालो त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मी पहिल्यांदा मोदीांना भेटलो, तेव्हा मी राजश्री शाहू महाराजांचं पुस्तक त्यांना दिलं होतं. त्यात मी माझा अभिप्राय लिहिला होता. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणेच माझी वाटचाल असणार आहे. त्याप्रमाणेच ६ वर्षांत राजकारणविरहीत समाजाला दिशा देण्याच्या नियमाप्रमाणे मी चाललो. या काळात मी अनेक कामं केली. माझा कार्यकाळ समाजहिताच्या दृष्टीने होता. २००७ पासून २०२२ पर्यंत मी पूर्णपणे समाजासाठी वाहून घेतलंय. राजवाड्यात वैभव असूनही मी महिन्यातले ५-६ दिवसच जातो. पण लोकसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्त्वाची आहे, त्यामुळे हे दोन निर्णय मी घेतले आहेत”, असं त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी बोलताना हा आपल्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असल्याचं सांगतानाच संभाजीराजे भोसले यांनी निवडणुकीच्या राजकारणात भविष्यात उतरणार असल्याचे संकेत दिले. “माझ्या राजकीय वाटचालीचा पहिलाच टप्पा असेल ‘स्वराज्य’ संघटित करणं. आपली ताकद तिथे संघटित व्हायला हवी. मी सांगू इच्छितो की ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात कुणीही वावगं समजू नये. माझी त्यासाठी तयारी देखील आहे. पण पहिल्या टप्प्यात आपण संघटित होणं गरजेचं आहे. स्वराज्य संघटित होण्यासाठी मे महिन्यातच माझा महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  स्वतंत्र पक्ष स्थापन करावा असं अनेकांनी सुचवलं असल्याचं संभाजीराजे भोसले यावेळी म्हणाले. “तुम्ही वेगळा पक्ष स्थापन करायला हवा असं अनेकांनी सांगितलं. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. सोशल मीडियाची, शिवभक्तांची काय ताकद आहे हे गेल्या काही दिवसांत समजलं. या ५-६ दिवसांत अनेकांनी मला शक्य त्या सर्व माध्यमातून सांगितलं की संभाजीराजे, तुम्ही स्वतंत्र पक्ष काढा. मी त्यांचा आदर आणि आभार व्यक्त करतो. हीच भावना आमच्याबद्दल राहू द्यावी”, असं ते म्हणाले.

अजून राजकारण शिकतोय

“मला राजकारण अजून समजत नाही. आता कुठे शिकायला लागलोय. मी सर्व २९ अपक्ष आमदारांची भेट घेणार आहे. त्यात काही चुकीचं नाही. राज्यसभा खासदारकीसाठी १० आमदारांचं अनुमोदन लागतं. मी सर्व प्रमुख नेत्यांची देखील भेट घेणार आहे. मी आज ठरवलंय की अपक्ष म्हणून राज्यसभेवर जायचं. याप्रकारे त्यांना सन्मान करायचा असेल, तर चांगलंच आहे. नाहीतर आपला मार्ग सुरू आहेच. मला माझी ताकद तर कळू द्या असे ते म्हणाले. कुणी पक्ष काढणं हे काही चुकीचं नाही. दुसऱ्यांनी काढायचा आणि आम्ही काढायचा नाही असं काही आहे का?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

असं मी असं म्हटलोच नाही की लोकसभा निवडणूक लढवणार नाही. महाराष्ट्रातील काही मोजके लोक असे आहेत की जे कुठूनही निवडणूक लढवू शकतात. त्यातला मी एक आहे. माझी माझ्याशीच स्पर्धा आहे. मी सर्व शिवभक्त, शाहूभक्तांना संघटित करण्यासाठी हे करतोय. त्याचा वेगळा अर्थ ज्यांना काढायचाय त्यांनी काढावा”, असं ते म्हणाले.

दरम्यान, घटनेचं चिन्ह ठरलंय का?  असे विचारल्यावर ते म्हणाले, “अजून चिन्ह किंवा रंग ठरवलेला नाही. जसं दौऱ्यात जाऊ, तिथे लोक सांगतील. पण रक्तात आणि ह्रदयातला केशरी पट्टा तर कुणी काढून घेऊ शकत नाही”, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *