मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही ; राजसत्तेसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा- प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे – मराठा आरक्षणाचा प्रश्न सत्तेशिवाय सुटणार नाही, राजसत्तेसाठी खासदार संभाजी छत्रपती यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं तर आरक्षणाबाबत नागरिकांचे सांगणे झाले, आता लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

खासदार संभाजी छत्रपती यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी संभाजी छत्रपती यांना बहुजन समाजाचं नेतृत्व करण्याचं आवाहनच केलं. मराठा आरक्षणासाठी आता दोनच संवैधानिक मार्ग आहेत. एक म्हणजे न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणं आणि ही याचिका फेटाळली तर दुसरी याचिका दाखल करणं. पण राजसत्तेशिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. राजकारणात ताजेपणा येण्याची गरज आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर हा ताजेपणा येईल, असं आंबेडकर म्हणाले.

मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

संभाजी महाराजांनी घेतलेल्या विषयात राजकीय पक्षांना कधीच रस नव्हता. आरक्षणाच्या मुद्द्यावरच डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. नंतर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीने आरक्षण मान्य केलं आणि बाबासाहेबांनी राजीनामा मागे घेतला होता. आरक्षण हा व्यवस्थेशी जोडण्याचा भाग आहे. संभाजीराजेंशी चर्चा करत असताना आरक्षणावर चर्चा झाली. पण हा प्रश्न पुढे न्यायचा असेल तर राजसत्तेची गरज आहे, हा विचार पुढे आला. या चर्चेचा हा मुख्य गाभा आहे, असं ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालायने मराठा आरक्षणावर दिलेल्या निर्णयाचं पुनरावलोकन पुनर्विचार याचिकेद्वारे नाही तर राष्ट्रपती किंवा राज्यपालांमार्फत होणं महत्त्वाचं आहे. राजसत्ता असेल तर राज्यपालांच्या माध्यमातून यासंबंधी रिव्ह्यू मागवता येईल. त्यातून हे प्रकरण लार्जर बँकेकडे जाऊन त्यावर मार्ग निघू शकतो, असं आंबेडकर यांनी  सांगितलं.

संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत नियोजन करावे लागेल. गायकवाड आयोगाच्या तत्रुटी पाहाव्या लागतील. पुनर्विचार याचिकेचा पर्यायही पाहावा लागेल. आरक्षणासंदर्भात दिल्लीत गोलमेज परिषद घ्यायची आहे. या परिषदेसाठी शरद पवार आणि इतर नेत्यांना आमंत्रित करू. समाजासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे संभाजी राजे म्हणाले.

आरक्षणाबाबत लोकांनी भावना व्यक्त केल्या, आता लोकप्रतिनिधींनी त्यांची प्रश्ने मांडणे गरजेचे आहे. पुनर्विचार याचिकेचा पर्याय बऱ्याचदा फेटाळले जातो, हे माहिती आहे. त्यानंतर ३४२ ए चा पर्याय  आहे, असे संभाजी राजे म्हणाले.

तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाही?

मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाही , हा आजच्या भेटीमागचा उद्देश होता, असं संभाजीराजे म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. भेट घेण्यामागे जातीय विषमता कमी करता येईल, बहुजन समाज एका छताखाली राहील, हे कारण आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण हा एक भेटीचा भाग होईल. शाहू महाराज यांनी सुरुवातीला बहुजन समाजाला आरक्षण दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी इच्छा होती, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *