जनसामान्यांचे ‘दादा’ अनंतात विलीन; साश्रू नयनांनी महाराष्ट्राचा आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप

Zydus Pinkathon
Zydus Pinkathon

The Final Farewell To Ajit Pawar —राज्याच्या राजकारणातील एक धगधगते आणि कृतिशील नेतृत्व, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखों चाहत्यांच्या उपस्थितीत, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात त्यांचे अकाली निधन झाले होते. आपल्या लाडक्या ‘दादां’ना अखेरचा निरोप देण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र बारामतीत जणू एकवटला होता आणि “अजितदादा परत या…”, “अजित दादा अमर रहे..” अशा काळीज चिरणाऱ्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.

बुधवारी, २८ जानेवारी रोजी सकाळी अजित पवार आपल्या नियोजित प्रचारसभांसाठी मुंबईहून बारामतीकडे ‘बंबार्डिअर लिअरजेट ४५ एक्सआर’ या ८ सीटर विमानाने रवाना झाले होते. सकाळी ८:१० मिनिटांनी विमानाने उड्डाण केले, मात्र ८:४५ च्या सुमारास बारामती धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच विमानाला भीषण अपघात झाला. दाट धुक्यामुळे दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विमान कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत अजित पवारांसह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, सुरक्षारक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.

अधिक वाचा  कोणत्या देवाने सांगितल की मुलं आर्ध्या चड्डीत आल्यावर त्यांना दर्शन घेऊ देऊ नका- अजित पवार

अजित पवार यांचे पार्थिव आज सकाळी प्रथम त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले, जिथे पवार कुटुंबाने त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी सुनेत्रा पवार यांना शोक अनावर झाला होता, तेव्हा त्यांच्या नणंद सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांना सावरले. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली आणि सकाळी ११ वाजता पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि बिगुल वाजवून त्यांना शासकीय सलामी दिली. त्यानंतर त्यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि धाकटे चिरंजीव जय पवार यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी “अजितदादा अमर रहे” आणि “परत या दादा” अशा घोषणांनी बारामतीचा परिसर दणाणून सोडला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांनी जड अंतःकरणाने अजित पवारांना अखेरचा मुजरा केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला होता. प्रत्येकाच्या मनात ‘एक पर्व संपले’ हीच भावना दाटून आली होती.

अधिक वाचा  विनोदी विधान करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा लौकिक-शरद पवार

आपल्या लाडक्या सहकाऱ्याला आणि नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरातील आणि राज्यातील दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आणि आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, आणि अभिनेता रितेश देशमुख यांसह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

आई आणि पत्नीची अवस्था हृदयद्रावक

या कठीण प्रसंगी अजित पवार यांच्या मातोश्री आणि पत्नी सुनेत्रा पवार यांची अवस्था अत्यंत हृदयद्रावक होती. आपल्या आयुष्याचा भक्कम आधार आणि राज्याच्या राजकारणाचा कणा असलेला माणूस असा अचानक सोडून गेल्याने दोन्ही माऊली पूर्णतः खचल्या होत्या. सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना सावरून धरले होते. ज्या मातीने या नेत्याला घडवले, त्याच मातीत आज त्यांना अखेरची विदाई देताना कुटुंबाचा शोक अनावर झाला होता.

अधिक वाचा  #Sunil Tatkare: दादा एकच आहेत, इतर कोणीही दादा होऊ शकत नाही - तटकरेंचा रोहित पवारांना टोला

दादा गेले म्हणजे बारामतीचा बाप गेला

अजित पवार यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी पहाटेपासूनच हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते. “आज दादा गेले म्हणजे बारामतीचा बाप गेला,” अशी भावूक प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली. काटेवाडीतील महिलांनी देखील मोठ्या संख्येने त्यांच्या निवास्थानी गर्दी केली होती; आपला भाऊ आणि हक्काचा माणूस गेल्याच्या भावनेने अनेकींनी हंबरडा फोडला. आयुष्यभर लोकांसाठी झटणारा हा नेता असा अचानक सोडून जाईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा तपास सुरू

या भीषण विमान अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी डीजीसीए  आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले असून, तांत्रिक बिघाड की मानवी चूक याचा तपास सुरू आहे . पुणे ग्रामीण पोलिसांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची  नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

 

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love