शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे : आ. विखेंनी पुरस्कार केला कोव्हीड योध्दयांना समर्पित


पुणे – आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि असंख्य प्रकारच्या भाषा आहेत ज्या आपण शिकलो तरच आपलं आयुष्य समृद्ध होईल असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मोहन आगाशे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे,  व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा, अधिसभा सदस्य आणि सर्व अधिष्ठाता तसेच जीवनसाधना व युवा गौरव पुरस्काराचे मानकरी आदी मंचावर उपस्थित होते.

यावेळी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारती ठाकूर, आयुर्वेद विषयात काम असणारे डॉ. सदानंद सरदेशमुख,  शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.मो.स.गोसावी, शैक्षणिक व सामाजिक कामात नावलौकिक मिळवलेले डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ज्योती देशमुख, सामाजिक व सहकार क्षेत्रातील रमेश आप्पा थोरात, विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण अडसूळ, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील प्रमोद कांबळे, सांस्कृतिक व सांगीतिक क्षेत्रातील कलाकार व सुप्रसिद्ध निवेदक आनंद देशमुख आदींना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या युवा गौरव पुरस्कारांमध्ये  विनायक लष्कर यांना सामाजिक कार्यासाठी, लेखिका मनस्विनी लता रविंद्र यांना साहित्य क्षेत्रातील, कला क्षेत्रात चिंतन उपाध्याय तर क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार टेनिसपटू अंकिता रैना यांना प्रदान करण्यात आला.

अधिक वाचा  विद्यापीठात लवकरच मराठी भाषा साहित्य, संस्कृती, अभ्यास व विकास विषयक केंद्र -प्रा. डॉ. नितीन करमळकर

यावेळी ‘व्हिजन डॉक्युमेंट’ चे प्रकाशन व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, डॉ.संजय चाकणे, डॉ. संतोष परचुरे, डॉ. माधवी रेड्डी, डॉ. दत्तात्रय कुटे आणि उल्हास लाटकर यांनी केले. तसेच यावेळी ‘विद्यापीठ वार्ता’ या अंकाचेही प्रकाशन करण्यात आले.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, मौखिक संवाद ते डिजिटल संवादाच्या प्रवासात लेखन परंपरा आली. मात्र ही लेखन परंपरा जोपासण्याच्या प्रयत्नात आपण चित्रसंवाद, ध्वनी संवाद, संवेदना दुसऱ्या भाषा मागे टाकल्या. मात्र औपचारिक शिक्षणात या सर्व भाषांचा समावेश होणे गरजेचे आहे.

डॉ.करमळकर म्हणाले, जवळपास ५२ विभागांचा समावेश असणाऱ्या १७ प्रशाला विद्यापीठ परिसंस्थेत सुरू केल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या विषयात अधिक अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी विद्यापीठाने अनेक उपक्रम सुरू केले आहे. मागील पाच वर्षातील धोरणात्मक निर्णयाने विद्यापीठ भविष्यात मोठी उंची गाठेल असा विश्वासही डॉ. करमळकर यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली होती त्याच पायऱ्यांवर केला सोमय्यांचा सत्कार : जोरदार घोषणाबाजी करत भाजपचे शक्तिप्रदर्शन

चौकट

पुरस्कार कोव्हीड योध्दयांना समर्पित – राधाकृष्ण विखे पाटील

आपल्या पुरस्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पद्मश्री डॉ.  विठ्ठलराव विखे आणि आदरणीय खासदार साहेबांनी घालून दिलेल्या मार्गावरुनच ग्रामीण भागात काम करीत राहीलो.या कामात कुटूबियांनी साथ दिली.कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहीले.शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनता सतत पाठबळ देते म्हणूनच काम करताना आत्मविश्वास मिळतो.त्यामुळेच हा पुरस्कार जनता, सर्व कार्यकर्ते,आणि  जीवावर उदार होवून कोव्हीड संकटात समाजाची सेवा करणार्या कोव्हीड योध्दयांना हा पुरस्कार मी समर्पित करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील वटवृक्ष केलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आ.विखे पाटील अनेक  शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत.याचा मोठा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला.हजारो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असून दिडलाख माजी विद्यार्थी देशात आणि परदेशात विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून यासर्व माजी विद्यार्थ्याचे संघटन आ.विखे पाटील यांनी केले आहे.

अधिक वाचा  काव्य, नृत्य, एकपात्री प्रयोग यांमधून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकर

प्रामुख्याने कोव्हीड संकटात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यामातून पद्मश्री डॉ विखे पाटील महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरचा मोठा उपयोग रुग्णांना झाला.मोफत उपचार आणि सुविधा आ.विखे यांनी  उपलब्ध करून दिल्याने सामान्य नागरीकांचे कोट्यावधी रुपये वाचले.मराठा आरक्षणाच्या निर्माण झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला.याचाही लाभ नव्याने प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्याना झाला.

नगर जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त २०८ शेतकरी कुटुंबियांना दतक घेवून विखे पाटील परीवाराने या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच या कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करण्याचे दायित्व स्विकारले आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love