मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील – अजित पवार

राजकारण
Spread the love

पुणे- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या (दिनांक १६ ) कोल्हापूर मध्ये होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यकर्त्यांनी बोलावे अशी मागणी होते आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये आघाडीचे तिथले पालकमंत्री तसेच आमदार बाजू मांडतील असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यामधे मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या संचालक मंडळाच्या  बैठकीसाठी अजित पवार उपस्थित  होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवारांनी मराठा आरक्षण, आघाडी सरकार, कोरोना स्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडी सरकारला आम्ही सहा मागण्या दिल्या आहेत. त्या मान्य करा. तुमचं स्वागत करू, असं सांगतानाच मराठा आरक्षणावर समाज बोलला, आम्ही बोललो. आता लोक प्रतिनिधींनी बोलायला हवं, असं ते म्हणाले. अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, अशी मागणी केली आहे. त्यावर अजित पवार यांनी राज्यकर्त्यांनी बोलावे अशी मागणी होते आहे त्यामुळे उद्या कोल्हापूरमधे होणाऱ्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि इतर नेते भुमिका मांडतील असे अजित पवार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारला कायदा करण्याची मागणी केली आहे,  जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे.  त्यामधे मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल असे त्यांनी सांगितले.

नाना पटोले यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा गैर नाही

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती त्यावरून आघाडीत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण केले, महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन बनवल आहे. हे तिघे नेते जोपर्यंत या सरकारच्या पाठीशी आहे आहे तोपर्यंत हे सरकार भक्कम आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर नाही तसेच प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे शिवसेना असेल किंवा कॉंग्रेस प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असे अजित पवार म्हणाले.आत्ताचा फॉर्म्युला हा उद्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आहे.  नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी 145 ची मॅजीक फिगर लागते. ती ज्याच्याकडे असते तो मुख्यमंत्री होतो असा चिमटा त्यांनी काढला.

विरोधकांच्या पोटात दुखणे थांबलेले नाही

भाजपच्या आध्यत्मिक आघाडीकडून पायी वारी काढण्याबाबत सांगितलं जातं आहे त्यावर,  हे सरकार आल्याने विरोधी पक्षातील अनेकांच्या पोटात दुखणे थांबलेले नाही असा टोला पवार यांनी लगावला. ते म्हणाले, आज पडेल, उद्या पडेल असं म्हणत विरोधक वेळ काढतायत.  दुटप्पी भूमिका घेता आहेत.  कोरोना सारख्या परिस्थितीत पायी वारी न काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मात्र विरोधक चुकीची भूमिका घेत असल्याचे अजित पवार म्हणाले.

उदयनराजे यांच्या वक्तव्यावर

उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने  लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केले होते त्यावर बोलताना सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं आहे ना…. बोलणारेही लोकप्रतिनिधीच आहेत ना असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

राम मंदिर ट्रस्ट घोटाळ्याचा आरोप गंभीर –

राम मंदिर ट्रस्ट घोटाळ्यासंदर्भात काल हेडलाईन सुरू होत्या, राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप होणे खूप गंभीर आहे, सगळ्यांनी त्याला देणगी दिली आहे, यावर स्पष्टीकरण येणे गरजेचे आहे हा हिंदु धर्मियांच्या आस्थेचा प्रश्न आहे असे अजित पवार म्हणाले.

कठोर निर्णय घ्यावा लागेल  

कोरोना परिस्थिती बाबत बोलताना, पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट सध्या 5 टक्क्यांच्या खाली मात्र पुन्हा जर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर कठोर निर्णय घेण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी असे अजित पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *