किसान सभेचा केंद्र सरकारला तीन दिवसांचा अल्टीमेटम:मोदी-शहांना झुकावेच लागेल

राजकारण
Spread the love

पुणे–दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाची उपेक्षा थांबवून केंद्र सरकारने पुढील तीन दिवसात शेतकरी विरोधी असलेले तिन्ही कायदे रद्द केले नाही,तर भारतीय किसान सभा महाराष्ट्रातही हे आंदोलन आणखी तीव्र करेन, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेने केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा संयम कसा सुटेल याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे असा आरोप करीत काहीही झाले तरी आम्ही लोकशाही आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही, मात्र, बहुसंख्य शेतकरी,गरीब कष्टकरी जनता, बुद्धीवादी या सर्वाना बरोबर घेऊन मोदी आणि शहा विरुध्द आम्ही असा रणसंग्राम होईल आणि या देशाच्या समोर मोदी-शहांना झुकावेच लागेल असे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  केंद्र सरकारने मंजूर करवून घेतलेले तीन शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांना आधारभावाचे कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय स्तरावर कायदा करावा, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीज विधेयक मागे घ्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी दिल्ली येथे 26 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे, दिनांक 8 डिसेंबर रोजी भारत बंद करून देशवासीयांनी या आंदोलनास अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे, देशभरातील लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमा रोखून धरत प्रचंड थंडीतही रस्त्यावर बसून आहेत.

केंद्र सरकार मात्र शेतकऱ्यांच्या या देशव्यापी आंदोलनाची उपेक्षा करत आहे, आंदोलन कमजोर करण्यासाठी डावपेच केले जात आहेत. शेतक-यांना खलिस्तानवादी म्हणत आंदोलनाचा तेजोंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आंदोलनाला पाकिस्तानची फूस आहे अशा प्रकारचे संतापजनक आरोप करून शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे, केंद्र सरकार व भाजपच्या या निंदनीय कृत्यांचा किसान सभा अत्यंत तीव्र शब्दात निषेध करत असून  केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन गांभीर्याने घ्यावे व शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशी मागणी नवले यांनी केली.

राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र या तिन्ही पक्षांनी केवळ पाठिन्यावर न थांबता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना साथ करावी, तसेच ते सामील असलेल्या राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी, बाजार समित्यांमधील लूटमार थांबविण्यासाठी व राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आधारभावाचे संरक्षण मिळावे यासाठी ठोस व प्रभावी पावले टाकावीत असे आवाहन किसान सभा करत आहे. डॉ. अजित अभ्यंकरही या पञकार परिषदेला उपस्थित होते

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *