तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – अजित पवार


पुणे- जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लक्ष केले जात आहे. अशात भाजपचे नेते सरकार पडणार असल्याचे विधान करत आहेत. भाजपच्या या दाव्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार आज संतापले. ‘145 ची मॅजिक फिगर असेपर्यंत मविआ सरकारला धोका नाही,’ असे अजित पवार पुण्यातील टेकडी येथील वन उद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि लोकार्पण सोहळ्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्वाखालचे सरकार सव्वा दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. त्या दिवसापासून सरकार पडणार हे चालू आहे. या गोष्टीला सव्वा दोन वर्ष झाली, कितीदा आम्ही तेच तेच सांगू. जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

अधिक वाचा  मला वाटेल तेव्हा मी बोलेन... तो माझा अधिकार आहे- अजित पवार संतापले

‘भाजप आणि शिवसेनेच्या नेते एकमेकांना शिव्या देत आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘दोघांनी तारतम्य ठेवले पाहिजे आणि आरोप-प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी थांबले पाहिजेत. आमच्याबद्दल बोलणारे काही वाचाळवीर असून त्यांच्याबद्दल आम्ही अवाक्षर देखील बोललो का? आपलं काम भलं आणि आपण भलं. आपली ही संस्कृती नाही. त्यामुळे हे सगळे थांबवा,असेही पवारांनी सांगितले.

नवाब मलिकांच्या अटकेच्या संदर्भात विचारले असता अजित पवार म्हणाले, मला याच्यावर काहीही बोलायचं नाही. मी माझं काम करत राहणार, स्वतः पवार साहेब बोलले. काल सीएम पण बोलले आहेत. विरोधकांचे हे कुरघोडीचं राजकारण सरकार स्थापन झाल्यापासून सुरू आहे. काहीजण पहाटे ट्विट करून माहिती कशी देऊ शकतात, यावरूनच तुम्ही समजून घ्याना, हे नेमकं काय सुरू आहे ते. नवाब मलिकांनी त्यांची बाजू या पूर्वीच मांडली आहे, तरीही अटक झाली, यावरून काय बोध घ्यायचा जनतेनं घ्यावा. सुडाचं राजकारण कुठवर करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कालपण काही ठिकाणी धाडी पडल्या हे तुम्ही बघताच आहात.

भाजप नेते किरीट सोमय्यांनी मागच्या दोन दिवसात १२ नेत्यांची ट्विटवरून नावे जाहीर केली आहेत. आता यांचीही चौकशी होणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. त्यात तुमचे नाव आहे.  अजित पवार लवकरच तुरुंगात जातील, असे किरीट सोमय्यांनी म्हटल्याचे पत्रकारांनी अजित पवारांना विचारले. त्यावर मग काय तुरुंगात जाऊ का? नो कमेंन्ट्स, तुम्हाला कितीदा सांगत असतो की, मी विकास कामाला महत्व देत असतो असे म्हणत जे काही कायद्याने, नियमाने असेल ते प्रत्येकाच्या बाबतीत घडते. जेव्हा मोदी साहेब इथे आले, तेव्हा त्यांनी देशांमध्ये विकासाच्या मुद्यावर लोकांचंन मन जिंकले. ही फॅक्ट असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक केले.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीस हे दबंग नेता : ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

कुत्र्यांचे जे काही लाड करायचे आहेत ते घरी करा

पुण्यातील तळजाई टेकडीवर होणाऱ्या घाणीच्या साम्राज्यावरुन अजित पवारांनी पुणेकरांना चिमटा काढला आहे. अजित पवार म्हणाले, पुणेकरांनी तळजाईवर पाळीव कुत्री आणू नयेत. कुत्र्यांचे जे काही लाड करायचे आहेत ते घरी करा, हवं तर गादीवर झोपवा. पण इथं तळजाईवर नको असं म्हणत अजित पवारांनी तळजाईवर मॉर्निंग वॉकला येताना कुत्रे घेऊन येणाऱ्या पुणेकरांना टोमणा मारला.

तळजाईवर एक रुपया पार्किंग चार्ज लावतात आणि पुणेकर ओरडतात, काही पठ्ठेतर थेट कोर्टातच जातात. पुणेकरांचा स्वभाव आपल्याला सर्वांना माहिती आहे. अरे कोर्टात जाण्याआधी पहिले चर्चेला तर या. सरकारी चर्चेतून मार्ग काढता येतो असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढे म्हणाले, मी तळजाईकडे येताना बघितलं लोक रस्त्यावरच कचरा टाकतात हे बरं नाही. भटकी कुत्री तळजाईवर येतात, काही लोक पाळीव कुत्री पण फिरायला घेऊन येतात, हे थांबलं पाहिजे. तळजाईवरची ससे आणि मोर कुत्री खातात, या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. तळजाईवर वनोद्यानाचं सौंदर्य टिकलं पाहिजे, इथली झाडं जगवण्यासाठी टेकडीवर पाइपलाईन टाकावी लागेल, त्यासाठी मी निधी देतो. इथलं फुलपाखरू उद्यान बहरलं पाहिजे. तळजाईमुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळतोय, म्हणजे हे वनउद्यान टिकलं पाहिजे. पुन्हा अशी कुरबूर नको. मी आज ठरवून तळजाईवर आलो, मला इथली कामं बघायची होती, लोकांनाही भेटलो समस्या जाणून घेतल्या असंही अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  हे सरकार अहंकारी :नियोजन करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी

आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात

अजित पवार यांनी पुण्यातील तळजाई टेकडी येथील वन उद्यानामधील विविध विकास कामांची पाहणी आणि उद्घाटनं केली. यानंतर केलेल्या भाषणात अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली. प्रसार माध्यमांशी संवादात साधताना पत्रकारांनी अजित पवार यांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणावर प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार भडकल्याचं पाहायला मिळालं. “आता घे पायताण आणि घाल माझ्या डोक्यात” असं उत्तर देत त्यांनी संभाजीराजेंच्या उपोषणावर बोलणं टाळलं. यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love