मालिकांच्या केसला काही लॉजिक नाही- जयंत पाटील

राजकारण
Spread the love

पुणे–भाजपने कोणत्याही परिस्थितीत मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगात टाकायचे असा निश्चय केला होता. त्यामुळे कायद्याला डावलून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधातील केसला काही लॉजिक नाही. कागपदत्रे बघितल्यावर ओढून-ताणून रचलेली केस असल्याचे लक्षात येते. आता त्याला ‘टेरर’ अॅगल’ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील यांनी आज (शनिवारी) मोशी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. गुन्हा सिद्ध झाला नाही,त्यामुळे त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मंत्री नवाब मलिक यांना फाशी देण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, ”मंत्र्याला फाशी देण्याबाबतचे वक्तव्य करणे विधानसभेच्या सदस्याला शोभत नाही. नवाब मलिक राज्याचे मंत्री आहेत. विधानसभेचे सदस्य आहेत. अनेकवेळा निवडून आलेले आहेत. त्यांना ओढून-ताणून या केसमध्ये अडकविले आहे. पॉवर ऑफ अॅटर्नी ज्याच्या नावाने होते. त्याने संबंधित महिलेला पैसे दिले नाहीत अशी तक्रार आहे. पॉवर ऑफ अॅटर्नी ज्याच्या नावावर आहे. त्याला पकडायचे की पैसे देणा-याला पकडायचे, मुळातच या केसचा बेस अतिशय चुकीचा आहे. नवाब मलिक यांनी घेतलेल्या जागेचे पैसे मिळाले नाहीत, असे एक महिला २०  वर्षाने सांगते. या महिलेला हे आत्ताच सांगण्याची बुद्धी कशी येते”, असा सवाल त्यांनी केला.

२० वर्षापूर्वीच्या घटनेत न्यायाच्या तत्वाने त्याचे स्पष्टीकरण, कागदपत्रे द्यायला मलिक यांना २०  तास किंवा २०  मिनिटे तरी संधी द्यायला पाहिजे होती. सकाळी सहा वाजता घेऊन जातात. कोणत्याही कागदपत्रांचा खुलासा न मागता वाटेल ते आरोप लावून दुपारी अटक करुन न्यायालयासमोरे नेले जाते. कोणत्याही परिस्थिती मलिक यांना तुरुंगात टाकायचे असा भाजपने निश्चय केला होता. त्यामुळे कायद्याला डावलून त्यांना अटक केली. या केसला काही लॉजिक नाही. ओढून-ताणून रचलेली केस आहे. आता त्याला ‘टेरर’ अॅगल देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुद्दाम बदनाम करण्याचे काम केले जात आहे. निवडणुकीत आपल्याला फायदा व्हावा यासाठी हे चित्र रंगविले आहे की काय माहिती नाही. पण, कागपदत्रे बघितल्यावर ओढून-ताणून रचलेली केस असल्याचे लक्षात येते. गुन्हा सिद्ध झाला नाही. ते गुन्हेगार आहेत हे सिद्ध झाले नाही. त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. विरोधक दररोज आरोप करतील. मग, प्रत्येकाने राजीनामा घ्यायचा काय, असा सवाल करत मंत्री मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे” पाटील यांनी ठामपणे सांगितले.

‘आम्हाला झोप लागते, कारण आम्ही भाजपमध्ये आहोत’

राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्याच लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. जुनी प्रकरण उकरुन काढली जात आहेत. तीनच पक्षातील लोकांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. जे भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहेत. ते जाहीरपणे सांगतात की आम्ही सुखी आहोत. आम्हाला रात्री झोप लागते, कारण आम्ही भाजपमध्ये आहोत. लोकशाहीमध्ये हा विरोधाभास डोळ्यासमोर दिसत आहे. हे राज्यातील जनता उघड्या डोळ्याने बघत असल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *