येत्या ४ ते ५ वर्षांत देशातील ‘सीएनजी स्टेशन्स’ची संख्या ३ हजारांवरून १० हजारांपर्यंत करणार -धर्मेंद्र प्रधान

राष्ट्रीय
Spread the love

पुणे – येत्या ४ ते ५ वर्षांत देशातील ‘सीएनजी स्टेशन्स’ची संख्या सध्याच्या ३ हजारांवरून १० हजारांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. पंतप्रधानांनी कल्पना केल्याप्रमाणे वायूबाबतच्या प्रगत पायाभूत सुविधा निर्माण करण्याची सीजीडी उद्योगावर मोठी जबाबदारी आहे. सीजीडी उद्योगाला आणखी चालना देण्यासाठी भारत सरकार विविध पावले उचलत आहे आणि सर्वसामान्यांना परवडणार्‍या किंमतीत वायू उपलब्ध करुन देत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस आणि पोलाद या खात्यांचे केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.

टॉरंट गॅस ची ४२ सीएनजी स्टेशन्स आणि ३ सिटी गेट स्टेशन्स  (सीजीएस) यांची उद्घाटने पेट्रोलियम, नैसर्गिक गॅस आणि पोलाद या खात्यांचे केंद्रिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. यातील सीएनजी स्टेशन्स विविध राज्यांमध्ये स्थित आहेत. ती उत्तर प्रदेशात १४, महाराष्ट्रात ८, गुजरातमध्ये ६, पंजाबमध्ये ४ आणि तेलंगणा व राजस्थानात प्रत्येकी ५ आहेत. सिटीगेट स्टेशन्स उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक आहेत.

ही ४२ सीएनजी स्टेशन्स सुरू केल्यामुळे टॉरंट गॅस या कंपनीने अगदी अल्पावधीतच शंभर सीएनजी स्टेशन्स कार्यान्वित करण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. टॉरंट गॅस कडे ७ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश येथील ३२ जिल्ह्यांमध्ये सिटी गॅस डिस्ट्रीब्यूशन (सीजीडी) नेटवर्क उभारण्याचे अधिकार आहेत. ही कंपनी आपल्या समवयस्कांमधील सर्वात वेगाने वाढणारी सीजीडी संस्था आहे आणि अंतर्बाह्य स्वरुपात ती वाढत आहे. लवकरच टॉरंट गॅस तर्फे चेन्नईमध्ये सीएनजी व पीएनजी उपलब्ध करण्यात येईल. सीएनजी व पीएनजी अद्याप अस्तित्वात नसलेले ते एकमेव मेट्रो शहर आहे. २०२१ पर्यंत पुणे जिल्ह्यातील सीएनजी स्टेशन्सची संख्या १५ वरून २८ वर जाईल आणि संपूर्ण जिल्ह्यात सीएनजी व्यापकपणे उपलब्ध होईल.

टॉरंट गॅस कंपनी कडून ज्या तत्परतेने सीएनजी स्टेशन्स उभारली जात आहेत व देशात सीजीडी च्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्याचे विशेष कौतुक धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या भाषणात केले. ते म्हणाले, टॉरंट गॅसची ही कामगिरी विशेष कौतुकास्पद आहे, कारण तिने दोन वर्षापेक्षा कमी कालावधीत १०० सीएनजी स्टेशन्स उभारण्याचा महत्त्वाचा टप्पा साध्य केला. इतरांनी अनुकरण करण्यास पात्र अशी ही स्पर्धात्मक स्वरुपाची कामगिरी आहे. ग्रामीण क्षेत्रांमध्ये नैसर्गिक वायू उपलब्ध करून दिल्यास, ग्राहक हे स्वच्छ आणि स्वस्त इंधन वापरण्यास प्रोत्साहित होतील. त्यामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल आणि नागरिकांना त्याचा सर्वार्थाने फायदा होईल.  

आगामी काळात नागरिकांना त्यांच्या दारात ऊर्जा पोहोचवता यावी, या उद्देशाने सीजीडी कंपन्यांनी व्यापक ऊर्जा विक्रेते बनावे आणि आपली सेवा तसेच पेमेंट सिस्टीम यांचे डिजिटलायझेशन करावे, अशी अपेक्षा प्रधान यांनी यावेळी व्यक्त केली. ऊर्जा क्षेत्रातील डिजिटलायझेशनमुळे रोजगार कसा निर्माण होतो, आयात अवलंबन कसे कमी होऊ शकते आणि आत्मनिर्भर भारत ही संकल्पना कशी अमलात येऊ शकते, याचे विवेचनही त्यांनी केले.

यावेळी बोलताना टॉरंट गॅस चे संचालक जिनल मेहता म्हणाले, सीएनजी आणि पीएनजी देशात व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आपल्या मोहिमेसाठी टॉरंट गॅस कटिबद्ध आहे. त्याद्वारे सन २०३० पर्यंत एकूण ऊर्जेमध्ये नैसर्गिक वायूचा वाटा ६.२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या भारत सरकारच्या धोरणास हातभार लागेल. नैसर्गिक वायूची व्यापक उपलब्धता देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी योगदान देईल, अशी अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षांत देशातील सीजीडी च्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एकूण ८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा विचार टॉरंट गॅस  करीत असून त्यापैकी १०५० कोटी रुपयांची गुंतवणूक यापूर्वीच कंपनीने केली आहे. कोविड-१९ च्या उद्रेकामुळे काही अडचणी आल्या असल्या, तरी अल्पावधीतच १०० सीएनजी स्टेशन स्थापित करण्यास टॉरंट गॅस सक्षम आहे. आम्ही आता मार्च २०२१ पर्यंत २०० सीएनजी स्टेशन्स

उभारण्याच्या आमच्या निकटतम उद्दिष्टासाठी आणि मार्च २०२३ पर्यंत ५०० सीएनजी स्टेशन्स उभारण्याचे मध्यम-मुदतीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करीत आहोत. आमच्या अधिकृत क्षेत्रात उद्योगांना व रहिवाशांना व्यापकपणे पीएनजी उपलब्ध करुन देण्यासही आम्ही कटिबद्ध आहोत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *