परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एमपीएससीचे विद्यार्थी संतप्त;रस्त्यावर झोपून आंदोलन

राजकारण
Spread the love

पुणे—राज्यातील पुन्हा वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 14 मार्च रोजी होणारी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा ((एमपीएससी) पुढे ढकलण्यात आल्याने संतप्त झालेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाच्या या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर झोपून रास्ता रोको केला. या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हेही सहभागी झाले होते. दरम्यान, जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोवर रस्त्यावरून बाजूला हटणार नाही असा पवित्रा पडळकर यांनी घेतला.

येत्या १४ मार्च रोजी होणारी एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.याबाबतची अधिकृत माहिती एमपीएससीने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील पत्रकात म्हटले आहे. कोरोना संकटामुळे मागील वर्षभरात जीवनमान विस्कळीत झाले आहे. तसेच याचा परिणाम शैक्षणिक पातळीवर पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. तसेच एमपीएससीच्या उमेदवारांना देखील याचा चांगलाच फटका बसला आहे. मात्र, १४ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा कायम राहिली आहे.

पहिल्यांदा २०१९ च्या मार्च महिन्यामध्ये एमपीएससीची पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलली होती. त्यानंतर एमपीएससी नेच जाहीर करण्यात आलेली ११ ऑक्टोबर सुद्धा मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे रद्द करण्यात आली. आता १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी ची परीक्षा पुन्हा एकदा पुढे गेल्यामुळे उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे. कोरोनाचं कारण देत परीक्षा रद्द करण्यात येत आहे हे कारण चुकीचं आहे. आरोग्य विभागाची परीक्षा झाली, यूपीएससीची, एनटीपीसीची परीक्षा घेतली जाते. परीक्षेसंदर्भात राजकारण केलं जात आहे. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मागं घ्यावा आणि परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोविड – १९ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. सरकारने आतापर्यंत पाच वेळा MPSC परीक्षा पुढे ढकलल्या, आता पुन्हा परीक्षा रद्द करून त्या पुढे ढकलल्या, सरकारचं धोरण चुकीचं आहे, जोपर्यंत सरकार MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नाही, गरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतंय, UPSC परीक्षा झाल्या, बँकिंग परीक्षा झाल्या, मग MPSC परीक्षांसाठी कोरोना होतो का? MPSC परीक्षा न घेण्यामागे ठाकरे सरकारचं राजकारण काय? असा प्रश्न भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.  

सरकारने अधिवेशन सुरु असताना चर्चा करुन हा निर्णय का घेतला नाही? भले विद्यार्थ्यांना पीपीई किट घालायला लागली तरी चालतील पण MPSC ची परीक्षा 14 तारखेला झालीच पाहिजे. महाराष्ट्र सरकारमधील काही मंडळींनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

तसेच १ लाख विद्यार्थी MPSC च्या परीक्षेसाठी पुण्यात राहतात, दर महिन्याला ९ ते १० हजार रुपये घराचे भाडे देतात, परंतु सरकारला या विद्यार्थ्यांसाठी काही देणंघेणं नाही. विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, सरकार निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही,असा पवित्रा त्यांनी घेतला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *