संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २० जूनला तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे २१ जूनला पंढरीकडे प्रस्थान

अध्यात्म पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–देहू संस्थानने आषाढी वारीची घोषणा केली आहे. यानुसार संत तुकाराम महाराजांची पालखी २० जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहचणार असून १० जुलैला आषाढी एकादशी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे.

यंदा पालखी देहूतून  जू२० नला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. कोरोना ओसरल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी होणार आहेत. आषाढी वारीची घोषणा झाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही, मात्र परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारीसाठी वारकरी उत्सुक आहेत. आषाढी वारीची गावागावांत वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासह विठूचरणी माथा टेकविण्याची आस लागली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा

पायी आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा परंपरेने ज्येष्ठ वद्य अष्टमीला (ता. २१ जून) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सोहळा ९ जुलैला पंढरीत पोहोचणार असून, सोहळ्यात तीन उभे रिंगण, चार गोल रिंगण होणार आहेत. तिथीची वृद्धीमुळे लोणंदमध्ये अडीच दिवस, पुणे, सासवड, फलटणमधे प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी राहील, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख अॅड. विकास ढगे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा आळंदीतून २१ जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहील. बुधवारी (ता. २२) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. सासवडला (ता. २४ व २५ जून), जेजुरीला (ता. २६ जून), वाल्हे येथे (ता. २७ जून), असा प्रवास करून सोहळा नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे (ता. २८ व २९ जून) अडीच दिवसांच्या मुक्कामी पोहचेल. दुपारच्या जेवणानंतर लोणंदपासून पुढे चांदोबाचा लिंबला सोहळ्यातील पहिले उभे रिंगण करून पालखी तरडगाव (ता. ३० जून) मुक्कामी जाईल. फलटणला (ता. १ व २ जुलै), बरड (ता. ३ जुलै), नातेपुते येथे (ता. ४ जुलै) मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरस येथे (ता. ५ जुलै) मुक्कामी राहील. खुडुस फाटामध्ये सकाळचे दुसरे गोल रिंगण करून दुपारी धावाबावी माऊंटमधील भारूडानंतर सोहळा वेळापूर (ता. ६ जुलै) मुक्कामी जाईल.

ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण व दसुर फाटा येथील टप्पा येथे संत सोपानदेव व माउलींच्या बंधूभेटीनंतर भंडीशेगाव (ता. ७ जुलै) मुक्काम असेल. भंडिशेगावच्या जेवणानंतर वाखरीतील (ता. ८) दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगणानंतर सोहळा वाखरी मुक्कामी राहील. वाखरीतील दुपारच्या जेवणानंतर तिसरे उभे रिंगण आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरला (ता. ९) प्रवेश करेल.

२३ जुलैला परत आळंदीत

आषाढी एकादशीला (ता. १० जुलै) नगरप्रदक्षिणा, माउलींचे चंद्रभागा स्नान, असा कार्यक्रम आहे. त्यानंतर १३ जुलैला माउलींचे चंद्रभागास्नान, विठ्ठल-रुक्मिणी भेट, गोपाळपूर काला होईल. त्याल्यानंतर आळंदीच्या दिशेने सोहळा माघारी येणार आहे. २३ जुलैला सोहळा आषाढी वारी करून आळंदीत पोहचेल.

सोहळ्यातील रिंगणे व ठिकाण

१) पहिले उभे रिंगण- चांदोबाचा लिंब

२) पहिले गोल रिंगण- पुरंदवडे

३) दुसरे गोल रिंगण- खुडुस फाटा

४) तिसरे गोल रिंगण- ठाकुरबुवाची समाधी

५) दुसरे उभे रिंगण- बाजिरावची विहीर वाखरी

६) चौथे गोल रिंगण- बाजीरावची विहीर वाखरी

७) तिसरे उभे रिंगण- पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *