सरळसेवा भरतीसंदर्भात पुढील आठवड्यात सकारात्मक निर्णय होईल : शरद पवार

राजकारण
Spread the love

पिंपरी- राज्यातील भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीत सरळसेवा भरतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

राज्यातील सरळसेवा नोकर भरती संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते रविकांत वरपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची पुणे येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी पवार साहेबांकडे सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील मागण्यांचे निवेदन दिले.

 या निवेदनात रविकांत वरपे यांनी म्हटले आहे, की राज्य शासनाच्या सरळ सेवा नोकर भरती प्रक्रिया धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल व्हावेत, अशी राज्यातील लाखो युवकांची मागणी आहे. यामध्ये महराष्ट्र शासनाच्या आरोग्य भरतीबाबत (वर्ग क व ड) आरोग्य विभागाची परीक्षा पोलीस विभागाच्या अहवालानुसार रद्द करण्यात यावी, गृहनिर्माण विभागाची (वर्ग क व ड) म्हाडा विभागाच्या परीक्षांची अंतिम भूमिका जाहीर करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाची ग्रामविकास, महसूल, ऊर्जा, जलसंपदा, गृह व इतर विभागातील सरळसेवा नोकर भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात यावी, वर्ग क व ड च्या परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत घेण्याचे धोरण बंद करण्यात यावे, महाराष्ट्र शासनाची सरळसेवा नोकरभरती प्रक्रिया IBPS, TCL, MKCL कंपन्यांमार्फत करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाची सर्व नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून करण्याच्या व्यवस्थेची चाचपणी करून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात यावा, सरळसेवा नोकर भरतीबाबत राज्य शासनाने SOP जाहीर करून एक स्वतंत्र व्यवस्था उभा करावी, सरळसेवा नोकरभरतीचे सर्व विभागांचे वेळापत्रक त्वरित जाहीर करावे, राज्यातील सरळसेवा नोकरभरतीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात याव्यात, तसेच सरळसेवा नोकर भरतीची वयोमर्यादा ओलांडणार्‍या युवकांबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, आदी मागण्या रविकांत वरपे यांनी शरद पवार साहेब यांच्याकडे केल्या आहेत.

रविकांत वरपे म्हणाले, की राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. अनेक महत्त्वाकांक्षी प्रश्‍नांवर महाविकास आघाडी सरकार वेगाने काम करीत आहे. महाराष्ट्र शासनाची सरळसेवा नोकर भरती हा महाराष्ट्रातील युवकांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रश्‍नांबाबतही मी 11 ऑक्टोबर 2021 रोजी शरद पवार साहेब यांना पत्र दिले होते. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रश्‍नांना प्राधान्यक्रम देऊन गती दिल्याने यातील अनेक प्रश्‍नांवर उपाययोजना झाल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील युवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळसेवा नोकर भरती करण्यासाठी महापोर्टल ही नवी व्यवस्था निर्माण करून या पोर्टलच्या माध्यमातून सरळसेवा नोकर भरतीसाठी खासगी कंपन्या नियुक्त करण्याचे धोरण अवलंबले होते. राज्यातील युवकांचा या धोरणावर प्रचंड राग होता. यातील भ्रष्टाचारामुळे महाविकास आघाडी सरकारने हे महापोर्टल रद्द केले. केवळ ग्रामविकास विभागाच्या 13 हजार जागांसाठी 13 लाख अर्ज आले होते. याची परीक्षा फी रक्कम जवळपास 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शासनाकडे जमा आहे.

कोविड-19 आपत्तीनंतर राज्य शासनाने राज्यातील नोकरभरती संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, या निर्णर्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. यामुळे परीक्षांची तयारी करणार्‍या युवकांमध्ये समाधानाची भावना आहे. आता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीत सरळसेवा भरतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी दिले आहे, असेही रविकांत वरपे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *