आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही – पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)– मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे परंतु,आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही. आरक्षण ज्या दिवशी मिळेल त्यादिवशी अवश्य फायदा घ्या पण त्याला वेळ लागणार असेल तर पुढे काय? त्यामुळे सगळ्या मुलांनी आरक्षण मिळण्याची वाट बघू नये, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

संभाजी ब्रिगेडतर्फे आज बुधवारी गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या रौप्यमहोत्सवी महाधिवेधशानाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.  अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. उदघाटनाच्या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर तंजावरचे युवराज संभाजी राजे भोसले, चित्रपट अभिनेते भरत जाधव, अशोक समर्थ, लेखक अरविंद जगताप उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते भरत जाधव याना विश्व जागतिक जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तर अशोक समर्थ यांचाही सन्मान करण्यात आला.  शाल,फणसाचे रोप, सन्मानपत्र, शिवाजी महाराज व संभाजी महाराजांची शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

चव्हाण म्हणाले की आपण मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा मुद्दा माझ्यापुढे आला.  शेतकरी अल्पभूधारक व नोकरदार मंडळींना डोळ्यासमोर ठेवून आरक्षण देण्याचा कायदा केला या आरक्षणाला काही जणांनी विरोध केला. मागासवर्गीय आयोगाने ही आरक्षण देण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका घेतली.  त्यानंतर राणे समिती नेमली. राणे समितीने दिलेल्या माहितीच्या आधारे २०१३ – १४ मध्ये अध्यादेश पारित करून आरक्षणाचा कायदा केला. त्यावेळी निवडणुक प्रचार करताना मी सांगत होतो जर २०१४ च्या निवडणुकीत वेगळ्या विचारांचं सरकार आलं तर हे आरक्षण विसरा. पुढे तेच झालं सहा महिने आरक्षण मिळाले, मात्र पुढे त्याचा कोणी न्यायालयात कोणीही बचाव केला नाही. आरक्षण ही गरज होती ती गरज पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, असंही त्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा वकीलांची टीम नेमून आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  पण त्याला किती वेळ लागतो हे सांगणे अवघड आहे त्यामुळे  आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, संभाजी ब्रिगेड  ही २५ वर्षे विविध विषय हाती घेऊन कार्य करीत आहे पण आता संभाजी ब्रिगेड वेगळ्या दिशेने पाऊल उचलले आहे. अर्थकारण आणि सर्वागीण विकास ही भूमिका घेऊन तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  अत्याधुनिक तंत्रज्ञानमूळे वेगवेगळ्या क्षेत्रात बदल होत आहे तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी कमी होण्याची भीती वाटत आहे त्यासाठी तरुणांनी स्वतः धडपड करून विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतातील शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावलेला असून तो सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही ते म्हणाले.

श्रीनिवास पाटील म्हणाले की संभाजी ब्रिगेड मध्ये तरुणांच्या विकासासाठी सुरू केलेले प्रयत्न स्वागतार्ह आहेत

प्रदेश उपाध्यक्ष सुधीर भोसले यांनी प्रास्ताविक केले हर्षवर्धन मगदूम यांनी उपस्थितांचे आभार मानले यशवंत गोसावी यांनी सूत्रसंचालन केले

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *