पुणे(प्रतिनिधी)– “काँग्रेसमुक्त भारत” अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आज स्वतःच्याच पक्षात काँग्रेसच्या नेत्यांची मोठी भरती केली असून, मूळ भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आणि संघर्षशील नेते आज कुठे गायब झाले आहेत, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि बदलत्या विचारधारेवर यावेळी अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, प्राजक्त तनपुरे यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या मनातील अडचणी मोकळेपणाने मांडल्या होत्या. प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी असू शकतात आणि त्या सर्वच गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाहीत, असे सांगत त्यांनी तनपुरे यांच्या निर्णयावर फार काही भाष्य करणे टाळले. मात्र, त्यांना भावी वाटचालीस नेहमीच शुभेच्छा असतील, असेही त्यांनी नमूद केले.
सुप्रिया सुळे यांनी अहिल्यानगर (नगर) जिल्ह्याचे उदाहरण देत भाजपच्या धोरणांवर जोरदार प्रहार केला. त्या म्हणाल्या की, एकेकाळी भाजपचे नेते ‘काँग्रेसमुक्त भारत’ म्हणत होते, मात्र आज अहिल्यानगर जिल्ह्याचा अभ्यास केला तर असे दिसते की, तिथे राम शिंदे वगळता १०० टक्के नेतृत्व हे मूळ काँग्रेसमधून आलेले आहे. ज्या लोकांना नाकारून भाजपला बदल घडवायचा होता, तेच शंभर कुटुंबे आणि तेच नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नेमकी कोणती क्रांती घडली आणि भाजपने नेमका काय बदल आणला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडताना सुळे म्हणाल्या की, ज्या कार्यकर्त्यांनी भाजप विरोधी पक्षात असताना लाठ्या खाल्ल्या, सतरंज्या उचलल्या आणि पक्षासाठी रक्त आटवले, ते कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज कुठे आहेत?. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांचा विशेष उल्लेख केला. प्रकाश जावडेकर हे भाजपचे अत्यंत सुसंस्कृत आणि प्रभावी प्रवक्ते होते, ज्यांनी संसदेत उत्तम काम केले आणि पक्षाच्या संघर्षाच्या काळात ते नेहमी आघाडीवर असायचे, मात्र आज त्यांनाही बाजूला सारले गेल्याचे सुळे यांनी सांगितले.
राजकारणातील सध्याच्या वातावरणावर चिंता व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज राजकीय पक्षांमध्ये विचारधारा उरली आहे की नाही आणि ती पूर्णपणे पुसली गेली आहे का, असा प्रश्न वारंवार मनात येतो. निवडणुकीत तिकीट देताना आता ‘मेरिट’ हा विषय शिल्लक राहिला आहे की नाही, याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. तरीही, सत्तेत असताना जे चांगले दिवस पाहिले, त्या आठवणी कायम राहतील, असे सांगत त्यांनी आगामी काळात शून्यातून विश्व निर्माण करून नवीन टॅलेंटसह कष्ट करण्याची आणि पुन्हा उभे राहण्याची जिद्द व्यक्त केली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यासह इतर ठिकाणच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. याच संभाषणात त्यांनी देशातील शिक्षण क्षेत्रातील विदारक स्थितीवरही भाष्य केले. नीट परीक्षेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक केली.
पुण्यात जे गृहखात्याचा कारभार पाहतात त्यांना सक्तीच्या सुट्टीवर
पुण्यातील विषारी दारूकांड प्रकरणी बोलताना सुळे म्हणाल्या, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर होतं. पण, आत्ता पुणे हे महाराष्ट्राचं ‘क्राईम कॅपिट’’ झालं आहे. माझे हे आरोप नसून, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या खात्याचा एक अहवाल आला आहे, ज्यात राज्यात पुणे गुन्हेगारीमध्ये एक नंबरवर तर देशात पाचव्या क्रमांकावर आहे. माझी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, पुण्यात एवढी गुन्हेगारी का वाढली आहे? याबाबत पुण्याच्या कारभाऱयांची चौकशी व्हायला पाहिजे. त्यानंतर त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं पाहिजे. आज शहरात जी स्थिती पाहायला मिळते त्याला पूर्णपणे पुण्याचे कारभारी जबाबदार आहेत. पुण्यात सुधारणा नाही झाली तर सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
विषारी दारु प्रकरण थांबवता आलं असतं
विषारी दारू प्रकरण हे सरकारचं अपयश आहे. सरकारला हप्ते हा शब्द माहिती नाही का? सरकारला हे सगळं माहिती होतं. जी हत्या झालीय याला जबाबदार कोण? याला सरकारच जबाबदार आहे. महाराष्ट्र सरकारला याबाबत आधीच माहिती होती. आधीच हे थांबवता आलं असतं,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारला धारेवर धरलं.
















