पुणे(प्रतिनिधी)–पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांत हातभट्टीची विषारी स्पिरिटयुक्त दारू प्यायल्याने शुक्रवार संध्याकाळपर्यंत १७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या भीषण घटनेमुळे दापोडी, फुगेवाडी हडपसर आणि काळेपडळ, परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपी योगेश वानखेडे आणि अड्ड्याचे मालक कर्नलसिंह विरखा यांच्यासह एकूण ८ जणांना अटक केली आहे. यामध्ये दापोडी पोलिसांनी ४ मुख्य आरोपींना अटक केली आहे, ज्यात कर्नलसिंह तखतसिंह विरका (वय ७३), गुरमंगतसिंह कर्नलसिंह विरका (वय ४५, दोघे रा. संजयनगर, फुगेवाडी), योगेश रामचंद्र व्हानकडे (वय २३, रा. केशवनगर, मुंढवा) आणि राधेश्याम हरिराम प्रजापती (वय ३५, रा. उरुळीकांचन) यांचा समावेश आहे असे सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांनी सांगितले. तर समांतर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी, दयानंद राजपूत आणि आर्यन संजय धोत्रे या अन्य चार जणांना अटक केली आहे. या सर्व आरोपींवर सदोष मनुष्यवध, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, गुन्हा करण्याच्या उद्देशाने अपायकारक पदार्थाद्वारे इजा करणे, इतरांचे जीव धोक्यात आणणारी कृती, अपायकारक पेयाची विक्री आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील दापोडी परिसरातील संजय नगर येथे विरका सिंग कुटुंबीयांकडून मागील अनेक महिन्यांपासून अवैध दारू विक्रीचा अड्डा चालवला जात होता. आरोपी योगेश वानखेडे हा या कुटुंबाला अवैध दारूचा पुरवठा करत असे आणि त्यानंतर ही दारू ग्राहकांना विकली जात होती.
पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी आणि दापोडी परिसरात सुरुवातीला १० जणांचा मृत्यू झाला, तर पुण्याच्या हडपसर आणि काळेपडळ भागात ७ जणांनी आपला जीव गमावला आहे. या विषारी दारूच्या सेवनामुळे मृत झालेल्यांमध्ये फुगेवाडीतील अक्षय अवसरमल, सौरभप्पा भंगारी, भीमाप्पा बसवंत पुजारी, पांडुरंग फुगे, विजय राठोड, राजेंद्र राठोड, राजेंद्र राजपूत, अकबर पठाण, काशिनाथ निकाळजे आणि आनंद देसाई यांचा समावेश आहे. हडपसर परिसरातील पांढरे मळा आणि ससाणे नगर भागात राहुल शरद क्षीरसागर, विजय भूकुरलाल शर्मा, अरुण डाडर आणि अशोक रमेश चव्हाण यांचा बळी गेला आहे. धक्कादायक म्हणजे हडपसरमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ आणि त्यांच्या बहिणीच्या मुलाचाही या विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
ज्या नागरिकांनी या विषारी दारूचे सेवन केले, त्यांना मळमळणे, पोटदुखी, तीव्र चक्कर येणे आणि उलट्या होण्यासारखी लक्षणे दिसून आली. अनेकांच्या तोंडाला फेस आला आणि ते जागीच कोसळले, तर काहींचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने मुंबईवरून विनापरवाना इथेनॉल आणून त्यापासून ही दारू बनवली होती आणि ती दापोडी, हडपसर व चतुश्रुंगी परिसरातील वेगवेगळ्या विक्रेत्यांना विकली होती. या रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी केली असून संशयित दारूचे कॅन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. वस्तीच्या मधोमध अवैध दारूचे गुत्ते राजरोसपणे सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती, तरीही कोणतीही कारवाई केली गेली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. काही स्थानिकांनी तर पोलीस ‘हप्ता’ घेत असल्यामुळेच हे धंदे सुरू असल्याचा दावा केला असून, वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी सुरुवातीला काही मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाल्याचा दावा केला होता, परंतु स्थानिकांनी हा दावा फेटाळून लावत हे सर्व मृत्यू केवळ विषारी दारूमुळेच झाल्याचे ठामपणे मांडले आहे.
राठोड कुटुंबातील दोन सख्खे भावांचा मृत्यू
या कांडातील सर्वात दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना राठोड कुटुंबासोबत घडली. विजय राठोड आणि राजेंद्र राठोड हे दोन सख्खे भाऊ, घराचा मुख्य आधार असलेले हे दोन तरुण एकाच दिवशी मृत्युमुखी पडले. गरिबीचे दिवस संपणार, घरात चार पैसे येतील असं वाटत असतानाच नियतीने घाला घातला. विजय यांच्या पत्नी सोनाली आणि राजेंद्र यांच्या पत्नी संगीता यांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज चिरणारा होता. “माझी सोन्यासारखी मुलं मला सोडून कुठे गेली? आता मी कोणासाठी जगू?” असा टाहो फोडणाऱ्या वृद्ध आईला आणि “आम्हाला कोणाच्या भरवशावर सोडलं?” असा प्रश्न विचारणाऱ्या त्यांच्या पत्नींना काय उत्तर द्यावे, हे कोणालाच समजत नव्हते. दोन्ही भावांच्या पश्चात त्यांची लहान चिमुरडी मुले आता पोरकी झाली आहेत.
केवळ राठोड कुटुंबच नाही, तर चाळिशीच्या आतील कित्येक तरुणांचे संसार या विषारी दारूने उघड्यावर आणले आहेत. ४२ वर्षीय अकबर पठाण, जे कुशल इलेक्ट्रिशियन म्हणून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते, त्यांच्या निधनाने संपूर्ण मोहल्ला सुन्न झाला आहे. ईदच्या दिवशी ज्या घरात आनंदाची लगबग असायची, तिथून आज अंत्ययात्रा निघत होती. कुटुंबातील सदस्यांनी “आमच्या घरचा ‘चांद’च हरवला!” असा आक्रोश केला. त्यांच्या सोबतीला सुतारकाम करून घर सांभाळणारे ४४ वर्षीय बाबा शेख यांच्या निधनाने सुतारकाम करणाऱ्या कुटुंबाचा आधार कोसळला आहे. एकाच भागात राहणारे, सोबत जगणारे जिवाभावाचे मित्र आज मृत्यूच्या दारातही सोबतच गेले.
वेदना हॉस्पिटलच्या वॉर्डात आणि स्मशानभूमीतही…
या विषारी दारूची व्याप्ती इतकी मोठी आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएम रुग्णालय, सांगवी जिल्हा रुग्णालय आणि खडकी येथील मेडिपॉइंट सरकारी इस्पितळात अजूनही अनेक रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. अनेकांची प्रकृती खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असून, त्यांचे नातेवाईक रुग्णालयाच्या कॉरिडोअरमध्ये देवाकडे प्रार्थना करत डोळे लावून बसले आहेत. या संपूर्ण दुर्घटनेत प्रशासनाचा ढिसाळपणा मृतानंतरही संपला नाही. संजय नगर भागातील स्मशानभूमीची दुरवस्था या निमित्ताने चव्हाट्यावर आली. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रेल्वे लाईन क्रॉस करावी लागते. परंतु, तिथून जाण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे, नातेवाईकांना चक्क लोखंडी पत्रे उचकटून मृतदेह पलीकडे नेण्याची वेळ आली. आपल्या माणसाला गमावल्याचे अथांग दुःख उराशी बाळगून असताना, अंत्यसंस्कारासाठी करावी लागणारी ही फरपट पाहून नातेवाईकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
दोषींना शोधून कठोर शासन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन अवैध दारू निर्मिती आणि पुरवठा साखळीत सामील असलेल्या प्रत्येकाला शोधून कडक शिक्षा केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मानवी जीव वाचवणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून रुग्णालयात दाखल असलेल्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांविरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी मोहीम हाती घेण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सध्या मृतांच्या शवविच्छेदनाचा आणि वैद्यकीय चाचणीचा अहवाल येणे बाकी असून, त्यानंतरच मृत्यूचे नेमके तांत्रिक कारण स्पष्ट होईल, असे पोलीस उपायुक्त संदीप अटोले आणि जीवन बेनीवाल यांनी सांगितले.
रोहित पवार यांनी स्वत: फोडला काऊंटर
ज्या दारु अडड्यामुळे ही दुर्देवी घटना घडली, तिथे रोहित पवार स्वत: पोहोचले व त्यांनी काऊंटर फोडला. रोहित पवारांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा दारु अड्डा फोडून टाकला. तिथे लावलेले पत्रे उखडले. “जेव्हा सिस्टिम काम करत नाही, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं, तेव्हा आम्हाला लोकांना एक संदेश द्यायचा आहे, काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील. लहान मुलींवर अत्याचार होतो, महिलांवर अत्याचार होतो, सिस्टिम मदत करत नाही, अजितदादांच्या बाबतीत सिस्टिम मदत करत नाही” असं रोहित पवार म्हणाले.
“दारु पिऊन गरीबाची माणसं मरतात. सिस्टिम काहीही करत नाही. त्यावेळी लोकांना कायदा हातात घ्यावा लागतो. कार्यकर्त्यांनी दारु अड्ड्यांची तोडफोड केली आहे. बुलडोझर धर्म बघून चालवला जातो. सामान्य लोकांचा जीव जातो, तेव्हा प्रशासन शांत बसतं” अशा शब्दात रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. त्याआधी ते ससून रुग्णालयात गेले व विषारी दारुमुळे अडचणीत असलेल्या पीडित कुटुंबांची भेट घेतली.
पोलिसांना विचारल्यावर सांगतात, अजून कारण कळलेलं नाही. पोलीस कोणाचीतरी पाठ राखण करण्याचा प्रयत्न करतात. एक जण स्वतहून ताब्यात येतो. पुढचा तपास होऊ नये यासाठी हे सगळं चाललं आहे. पोलिसांनीच एकाला सरेंडर व्हायला सांगितलं. म्हणजे तपास होणार नाही, मोठा मासा यातून सुटेल” असा आरोप रोहित पवार यांनी केला.















