पुणे(प्रतिनिधी)-पुणे शहरात झालेल्या पहिल्याच पावसाने महापालिकेच्या मान्सूनपूर्व कामांची पोलखोल केली असून, ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहेत. या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी आज शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘होडी’ धरून अनोखे आंदोलन करण्यात आले., शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून पालिकेचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आज सकाळपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते महापालिकेच्या गेटवर जमा झाले होते. हे आंदोलन इतके आक्रमक होते की, काही कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या हातामध्ये कागदी होड्या होत्या, ज्या त्यांनी प्रतीकात्मकरीत्या महापालिकेच्या प्रांगणात फेकल्या., गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते, ज्यातून वाहनचालकांना आणि नागरिकांना जीव मुठीत धरून वाट काढावी लागली., याच पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिका या परिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असल्याचा दावा शिवसेनेने केला.
या आंदोलनातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर घेतलेली जलपर्णी. मुळा-मुठा नदीत वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी थेट अंगावर जलपर्णी घेत “मी पुण्यातली जलपर्णी… मला कधी काढणार?” अशा घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. नदी स्वच्छतेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवला जात असताना प्रत्यक्षात नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढल्याचे चित्र असल्याने शिवसेनेने प्रशासनाला लक्ष्य केले. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरातील नागरिक आणि माध्यमांचे विशेष लक्ष वेधले गेले.
या आंदोलनाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर घुले, माजी नगरसेविका सोनाली लांडगे, पंकज कोद्रे,विकी माने, अभिजित बोराटे, आनंद गोयल,मिलिंद अहिरे, दत्ता खवळे, नितीन पवार, सुधीर कुरुमकर, राजाभाऊ भिलारे, नवनाथ निवंगुणे, प्रकाश ढमढेरे, दीपक कुलाळ, प्रवीण हिलगे, तुषार मरळ, अक्षय टकले, महेंद्र जोशी, अनिकेत सपकाळ,संतोष लांडगे,अक्षय तारू, सचिन तरवडे,एकनाथ ढोले, अनिल दामजी, संदेश पावसकर, लक्ष्मण कामलेकर, स्मिता साबळे, विशाल सरोदे, अजित ढोकळे,रोहित कदम, अश्विनी मल्हारी,हेमंत बत्ते, स्वराज बाबर, प्रशांत मते, प्रणव धंगेकर, आकाश रेणूसे, मार्तंडराज धंधुके, उमेश गालींदे, अमित दाभाडे,अकबर शेख, सुहास कांबळे, श्याम ताठे, उद्धव कांबळे, राजू परदेशी, श्रीधर कामठे, मंगेश सातपुते,तुषार सातपुते, आशिष कामठे, सोनू रणपिसे श्रीराम चौक जेष्ठ नागरिक, शिवसेना पुणे शहरातील पुणे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. शेकडो कोटींची टेंडर्स काढूनही शहरातील नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत आणि ड्रेनेजची कामेही अर्धवट आहेत, असा दावा यावेळी करण्यात आला. “शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे, त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना भेट म्हणून देण्यासाठी या बोटी आणल्या आहेत,” असे संतप्त आंदोलकांनी सांगितले. नालेसफाईची कामे केवळ कागदावरच झाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पुणेकरांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यात जरी शिवसेना आणि भाजप एकत्र असले तरी, पुणे महानगरपालिकेत शिवसेना सत्तेत सहभागी नाही., त्यामुळेच पुण्यात सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात शिवसेनेने थेट रस्त्यावर उतरून ही भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे., “सत्ता कोणाचीही असो, आम्ही पुणेकरांच्या हितासाठी हे आंदोलन करत आहोत,” असे स्पष्ट करत शिवसेनेने पालिकेच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. पहिल्याच पावसात पुण्याची ही अवस्था झाली असेल, तर आगामी मान्सूनमध्ये काय होणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून या आंदोलनाची पालिका प्रशासन काय दखल घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“महानगरपालिकेने हजारो कोटींच्या निविदा काढल्या, वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या, मात्र प्रत्यक्षात एकही काम वेळेत आणि दर्जेदार झालेले नाही. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात संपूर्ण पुणे शहर पाण्यात बुडाले. सामान्य पुणेकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रस्ते, चौक आणि वस्त्या जलमय झाल्या. हा हजारो कोटींचा मलिदा कोणी खाल्ला याचा जाब आता पुणेकर विचारणार आहेत,” असा इशारा त्यांनी दिला. “पुणेकरांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि सत्ताधाऱ्यांना शिवसेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
-शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे













