पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २०.८३ टक्के


पुणे-राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी (दि.१२) जाहीर झाला. पाचवी व आठवीचा एकूण निकाल २०.८३ टक्के लागला आहे. निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यंदा पाचवी व आठवीचे एकत्रित ३१ हजार ४२८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेकडून दि. १६ फेब्रुवारी रोजी राज्यभरात पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा अंतरिम निकाल ऑक्टोबरमध्ये जाहीर झाला होता. त्यानंतर शाळांमार्फत गुणपडताळणीचे अर्ज मागविण्यात आले होते. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढून यानंतर अंतिम निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेत पाचवीचे १ लाख ३६ हजार ८२१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यापैकी १६ हजार ६८४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मि.ळणार आहे. तसेच आठवीचे ५७ हजार ५६७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर १४ हजार ७४४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. पाचवीचा निकाल २४.८२ टक्के तर आठवीचा निकाल १५.०७ टक्के लागला आहे. एकूण निकाल २०.८३ टक्के लागला आहे.
परिषदेच्या संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांना आसन क्रमांक टाकून निकाल पाहता येणार आहे. तसेच, शाळांना त्यांच्या लॉगिनमध्ये एकत्रित निकाल पाहता येईल. परीक्षा परिषदेच्या वतीने राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरीय गुणवत्ता याद्या जाहीर केल्या असल्याची माहिती आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  प्रतीक्षा संपली: बारावीचा निकाल उद्या (८ जून)