Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेलं नाही,” अशा शब्दांत त्यांनी भाजपसह (BJP) सत्ताधाऱ्यांना सुनावले असून, आज जे चुकीचे पायंडे पाडले जात आहेत, ते भविष्यात सत्ताधाऱ्यांवरच उलटतील असा इशारा दिला. काँग्रेसने (Congress) पूर्वी चुका केल्या म्हणून आम्हीही त्याच मार्गाने जाणार, असे समर्थन देणे चुकीचे असून उद्या सत्ता परिवर्तन झाल्यावर दुसरी सत्ता तुमच्यापेक्षा दामदुपटीने वाईट वागेल, तेव्हा तक्रार करायला कोणाकडेही जागा उरणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
महाराष्ट्र हे देशाला दिशा दाखवणारे सुसंस्कृत राज्य आहे, परंतु गेल्या १० वर्षांपासून या राज्याचे ‘उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहार (Bihar)’ केले जात आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ज्या प्रकारचे राजकारण चालते, ते आता महाराष्ट्रातही पाहायला मिळत असून हे राज्याच्या भवितव्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत घातक आहे. जे तरूण आज राजकारणात येऊ इच्छितात, त्यांची विचारसरणी (Ideology) अशा वातावरणामुळे बदलत असून यामुळे महाराष्ट्राचे वाटोळे होईल, अशी भीती राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली.
राजकीय पक्ष आणि राज्यकर्त्यांनी आपल्या कृतीचे भान ठेवणे गरजेचे आहे, असे सांगताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील दुटप्पीपणावरही बोट ठेवले. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘बिनविरोध‘ (Unopposed) निवडीचे प्रकार घडले होते, तेव्हा भारतीय जनता पक्ष (BJP) त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेला होता; मात्र आता महाराष्ट्रात त्याच प्रकारच्या गोष्टी घडत असताना भाजपची भूमिका काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या या चुकीच्या पद्धतींना प्रोत्साहन देऊ नये, कारण उद्या जेव्हा सत्ता जाईल, तेव्हा हेच प्रकार आपल्या वाट्याला येतील याची जाणीव त्यांनी करून दिली आहे. राज्याच्या हितासाठी आणि सुसंस्कृत राजकारणासाठी (Cultured Politics) सध्याच्या राजकीय प्रवासाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याचेही ते म्हणाले.
















