🚩ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।।
🚩संवत्सर प्रतिपदा! चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजे वर्षारंभाचा दिवस. याच दिवशी सृष्टीच्या निर्मात्याने, ब्रम्हदेवाने युगारंभ केला, कृतज्ञता म्हणून ‘गुढी’ अर्थात ‘ब्रह्मध्वज’ पूजन करण्याची पद्धत आहे. हा वसंत ऋतूच्या आगमनाचा दिवस सुद्धा. आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो.
🚩 गुढीपाडवा हा ऋतुंवरून प्रचारात आलेला आपला सण आहे. त्याचबरोबर त्याला धार्मिक अधिष्ठान पण आहे, तर पर्यावरणाचा संदर्भ सुद्धा आहे. चैत्रापासून पुढील चार महिने सर्व प्राणिमात्रांसाठी जलदान करावे, पाणपोई बांधावी किंवा रोज एकाच्या घरी माठ भरून पाणी नेऊन द्यावे इत्यादी. इथे धार्मिकदृष्ट्या दान म्हटले असले तरी दान म्हणजे समोरच्याला मदत किंवा त्याची सोय करणे असा आहे. इथे हा पर्यावरणवादी दृष्टीकोन दिसतो. हे चार महिने उन्हाळा असतो. जसा माणसांना उन्हाचा त्रास होतो, तसा प्राणी आणि पक्ष्यांना पण होतो, झाडांना पण होतो. एरव्ही सुद्धा आपण आपल्याकडे भर उन्हात कोणी आलं, अगदी पोस्टमन, सिलिंडर घेऊन येणारा माणूस, कुरीअरवाला, किंवा कुणीही… घरी आल्यानंतर त्याला प्रथम पाणी देण्याची पद्धत आहे. उन्हाळा असेल तर द्यायलाच हवे. हाच धर्म आहे म्हणजे कर्तव्य आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला मत्स्य जयंती आहे असे मानतात म्हणून पाण्याचे महत्व आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही हे सर्वांना माहिती आहेच.
🚩 पाडवा म्हणजे नवनिर्मितीच्या आरंभाचा दिवस! पाडव्याला वर्षारंभीच सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आणि आपली कर्तव्ये करण्यास सुरवात करायची असते, यात अनेक गोष्टी येतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेताची मशागत करून ठेवणे, पाऊस यदा-कदाचित कमी झालाच तर त्याची सोय म्हणून विहिरी, पाट, तलाव यांची नीट सोय करून ठेवणे, दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन धान्य, चारा यांची साठवण करून ठेवणे. बी-बियाणे आणून ठेवणे अशी कामे पावसाळयापूर्वी उरकून ठेवायची असतात.
वसंताचे आगमन होणार्या काळात शरीराला थंडावा देणार्या कडुनिंबाचे महत्व चैत्र प्रतिपदेला असते. आरोग्यास हितवर्धक, पचनक्रिया सुधारणारा, पित्तनाशक, त्वचा रोग बरा करणारा, शिवाय धान्यातील किडीचा नायनाट करणारा कडूनिंब आयुर्वेददृष्ट्या महत्वाचा आहे म्हणून त्या दिवशी कडुनिंबाची पाने खायची प्रथा आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याची ही प्रथा उपयोगीच आहे.
🚩 शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तो याच दिवशी. म्हणूनच शालिवाहन शक सुरू झाले आणि हा दिवस विजयोत्सव म्हणून लोक साजरा करू लागले. असाच विजय दिवस लंकाधिपती रावण वधानंतर, प्रभू श्रीराम अयोध्येला चौदा वर्षानी परत आले तो, विजय आणि आनंदोत्सव म्हणून घरोघरी ब्रह्मध्वज / गुढ्या, तोरणे उभी केली गेला. ही गुढी /ब्रह्मध्वज आनंदोत्सवाचे द्योतक आहे. कवी योगेश्वर अभ्यंकर यांचं भावगीत तुम्हाला स्मरत असेल. श्रीरामांच्या स्वागतासाठी अयोध्या कशी सजली होती, लोकांना किती आनंद झाला होता याचं हे वर्णन खूप बोलकं आहे…
🚩🚩🚩🚩🚩🚩 विजयपताका श्रीरामाची, झळकते अंबरी,
प्रभू आले मंदिरी!
गुलाल उधळून नगर रंगले, भक्त गणांचे थवे नाचले,
राम भक्तीचा गंध दरवळे,
गुढ्या तोरणे घरोघरी …
🚩 अशा उत्साहात लोकांनी हा आनंदउत्सव साजरा केला असल्याचा उल्लेख रामायणात आहे.
अशी ही उत्सवी काठी किंवा गुढी यांचे पूजन इतिहासात सांगितले आहे. उत्सवी काठीचा उल्लेख एक प्राचीनतम पूजा म्हणून इतिहासात आढळतो. आपल्या सारखाच इतर देशात काठीपूजा/ब्रह्मध्वजपूजन/ गुढीपूजन करण्याची परंपरा होती. दक्षिण आफ्रिकेत दामारा जमातीमध्ये, सायबेरियातील सामोयीड्समध्ये, इस्रायलमध्ये, युरोपमध्ये ख्रिश्चन पूर्व काळात मेपॉल काठी उत्सव, पॅसिफिक क्षेत्रात, कुक बेटावर आदिवासींचा काठीपूजा उत्सव, तसंच, युनान, व्हिएतनाम, कोरिया, म्यानमार या ठिकाणी काठी उत्सवांची परंपरा होती. भारतीय उपखंडात याला निरनिराळी नावे आहेत. नेपाळमध्ये काठी उत्सव, आसाममध्ये बास पूजा, मणिपूर-त्रिपुरामध्ये काठी पूजा, राजस्थान, मध्यप्रदेश, बलुचिस्तानातही. ओरिसामध्ये तर आदिवासींची ‘खंबेश्वरी’ देवीची पूजा ही काठीपूजा असते.
🚩 आपल्या या प्राचीन परंपरेचे उल्लेख महाराष्ट्राच्या अनेक साहित्यात सुद्धा दिसतात. अगदी म्हाइंनभट्ट यांच्या लिळाचरित्र ग्रंथापासून, संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या अभंगात गुढीचा उल्लेख सापडतो.
🚩 गेल्या वर्षीचा गुढीपाडवा कोरोना साथीमुळे अत्यंत चिंतायुक्त वातावरणात लॉकडाऊनमध्ये झाला. जरा परिस्थिति सुधारते असं वाटत असतानाच आता पुन्हा दुसरी लाट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा चैत्र पाडवा सुद्धा चिंतेतच साजरा होत आहे. पण मागच्या वर्षीपेक्षा या पाडव्याला सगळ्या रामभक्तांच्या मनात सुखद, आनंदाची लहर आहे, ती रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामांच्या भव्य-दिव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाल्याची. २० ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराचा भूमिपूजन सोहोळा पार पडला होता. त्या वेळेचं वातावरण म्हणजे अयोध्यावासियांची दिवाळीच होती जणू. संकटकाळात भक्तांच्या मनाला, उभारी देणार्या श्रीरामांच्या मंदिराची निर्मिती होणार आहे. मग यंदा आम्हाला घरातच राहून, कुठल्याही तयारी शिवाय हा उत्सव साजरा करावा लागणार असला तरी मन या गोष्टीने आनंदी असणार आहे हे नक्की. दु:खाच्या आणि चिंतेच्या मन:स्थितीत मनाचा एक कोपरा आनंदी असणार आहे हे या परिस्थितीत सकारात्मकता वाढवणारे असेल.
🚩 हे राम मंदिर उभे करण्यासाठी सर्व लोकांचे समर्पण भावाने दान आले आहे. नागरिकांच्या सहभागातून हे मंदिर उभे राहणार आहे हे याचे विशेष आहे. एक विशेष नोंद घ्यावीशी वाटते ती म्हणजे, या मंदिरात अध्ययन केंद्र असणार आहे. ‘ग्लोबल एनसायक्लोपेडिया ऑफ द रामायण’ अर्थात ‘रामायण विश्व महाकोशा’चे खंड तयार होणार आहेत. यात पुरातत्व, इतिहास, सर्व संस्कृतिक, साहित्यिक दृष्टिकोनातून माहिती असणार आहे, तसेच अयोध्याच्या इक्ष्वाक्षू वंशाच्या सर्व ६५ राजांची माहिती असेल. असे अनेक खंड, जवळ जवळ २०० खंड, अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यांचे इंग्लिश. हिन्दी, तामिळ अशा भाषांतून भाषांतर होणार आहे. जगातल्या २०५ देशातील रामायणाची मूर्त-अमूर्त माहिती या कोशात असेल. तो तयार करण्यासाठी सर्व राज्यातील विद्वान सहभागी होतील. सर्व भाषेतील, सर्व परांपरतील, सर्व लोककथातील भगवान श्रीरामाची माहिती यात सर्वांना वाचायला मिळेल. असे नियोजन अयोध्या शोध संस्थानतर्फे करण्यात आले आहे. ही फार मोठी आणि महत्वाची निर्मिती होईल असे मला वाटते. कारण या विषयाच्या संशोधनासाठी अभ्यासकांना महत्वाचे संदर्भ उपलब्ध होणार आहेत.
🚩 रामायणात विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय आहे. यातील सर्व घटनांमध्ये श्रीरामांनी स्वत:ला मानवी मर्यादेमध्ये सिद्ध केलं आहे, त्यात मार्गदर्शक तत्वे आहेत. म्हणूनच ती आज लागू आहेत.
या संवत्सर सणाची भारताच्या विविध प्रांतात, विविध नावे आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात या नववर्ष संवत्सरास ‘उगादी’ म्हणतात, तामिळमध्ये पुथंडू म्हणतात. श्रीलंकेत सुद्धा हा सण साजरा होतो. कश्मीरमध्ये हा सण काश्मिरी हिंदू पंडित नवरेह म्हणून साजरा कारतात. आसाममध्ये बिहू, केरळमध्ये विशु, बंगालमध्ये नोब बोर्ष, पंजाबमध्ये बैसाखी तर भारत आणि पाकिस्तानातील सिंधी लोक चैत्रात चेटीचंड उत्सव साजरा करतात.
🚩 भारतातील सगळीकडच्या या परंपरा पाहिल्या की लक्षात येतं आपली संस्कृती धर्म, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक आणि कौटुंबिक सलोखा या धाग्याने बांधली आहे. नव्याचं स्वागत करा, जुने जाऊ द्या, विसरून जा, एकमेकांशी सौहार्दाने वागा. ही आणि अशी अनेक आदर्श मूल्ये आणि संस्कार अशा सणांमधून प्रसारित होत असतात.
म्हणून थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या कवितेत हाच संदेश देतात,
🚩🚩 गुढीपाडव्याचा सन,
आतां उभारा रे गुढी।
नव्या वरसाचं देनं,
सोडा मनांतली आढी।
गेलं सालीं गेली आढी,
आतां पाडवा पाडवा।
तुम्ही येरांयेरांवरी,
लोभ वाढवा वाढवा।।
आजच्या सामाजिक व राजकीय सद्य परिस्थितीत हा संदेश खूप महत्वाचा आहे. म्हणूनच,
सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु।
सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु।।
आताच्या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोरे जाऊन, सर्वांचे कल्याण होईल याची योजना करून येणारं वर्ष सर्वांसाठी मंगल ठरो, हीच प्रार्थना! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
लेखिका – डॉ. नयना कासखेडीकर