आठवणी २६ नोव्हेंबरच्या ..कहाणी एका अज्ञात नायिकेची


ही शौर्यकथा आहे, स्टाफनर्स अंजली कुल्थे यांची! अंजलीला आवर्जून आठवायला ती कुणी चकचकीत दुनियेतली हिरॉईन नाही. तिच्या शौर्याची आठवण करून द्यावी लागणं, हेच मन विषण्ण करणारं आहे.

अंजली ही सीएसटी स्टेशन जवळच्या  कामा व अल्ब्लेस रुग्णालयात रात्री ८ ते सकाळी ८ अशी रात्रपाळी करणारी नर्स. हे स्त्री व बालरुग्णालय असल्यानं प्रसूतिवेदना सुरू झालेल्या बाळंतपणासाठी आलेल्या २० महिला त्यावेळी अंजलीच्या देखरेखीखाली लेबर रूममध्ये आपल्या बाळाच्या जन्माच्या प्रतीक्षेत होत्या. अंजली नेहमीपमिाणे तिची जबाबदारी पार पाडत होती. ती काळरात्र होती, २६ नोव्हेंबर २००८ची! एवढ्यात, मुंबईवर हल्ला करणारा दहशतवादी अजमल कसाब कामा रुग्णालयाच्या परिसरात आल्यानं एकच गोंधळ उडाला. हातात बंदूक घेऊन माथेफिरूसारख्या गोळ्या चालवणाऱ्या, कसाबनं रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनाच गोळ्या घातल्यानं ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर त्यानं एका नर्सलाही जखमी केलं. ‘आता आपल्यालाही हा गोळ्या घालणार,’ या भीतीनं रुग्णालयातील रुग्ण जीव मुठीत धरून होत्या.

सुरक्षारक्षकांना मारल्यावर तो पहिल्या मजल्यावर येण्याच्या बेतात असतानाच प्रसंगावधान राखून अंजलीनं अक्षरशः एका क्षणात पळतच जाऊन विभागाचे जड दरवाजे कसेबसे बंद केले. तिच्या देखरेखीखाली असलेल्या वीस गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाइकांना तत्काळ वॉर्डच्या टोकाला असलेल्या पँट्रीमध्ये हलवलं आणि जखमी परिचारिकेला आपत्कालिन विभागात हलवलं. कसलाही आवाज होऊ न देण्याची खबरदारी घेतली. रुग्णालयातील प्रत्येक जीव वाचवण्याची सूत्रंच जणू तिनं हातात घेतली. त्यानंतर वेळ न दवडता तिनं प्रसंगावधान राखून डॉक्टर आणि पोलिसांना फोन करून सावध केलं. या इमारतीच्या खालीच बाँबस्फोटांचे हादरे आणि दहशतवादी व पोलिस यांच्यात गोळीबार सुरू होता. दहशतीच्या वातावरणात रुग्णालयातील प्रत्येकाला धीर देण्याचं, मदत करण्याचं काम ही नर्स मोठ्या धैर्याने करत होती. त्याचदरम्यान प्रसूती करण्यासाठी दोन महिलांना तिनं ताबडतोब दुसऱ्या मजल्यावरील प्रसूति विभागात नेलं. डॉक्टरांनाही प्रसूतीसाठी मदत केली. बाळं सुखरूप जन्माला आली. हे सर्व एकाच ट्यूबच्या उजेडात चालू होतं. कारण खाली तुफान गोळीबार सुरू होता. काही काळानंतर हा आवाज थंडावला; पण ती रात्र वैऱ्याची होती.

अधिक वाचा  नरवीर तानाजी मालुसरे पुण्यतिथी : (माघ वद्य नवमी- ४ फेब्रुवारी १६७०)

या घटनेनंतर महिनाभरात अंजलीनं ओळखपरेडमध्ये कसाबला न घाबरता ओळखलं. ती नर्सच्या गणवेशात गेली आणि त्या गणवेशाची ताकद दाखवली. ती घाबरली नाही, डगमगली नाही, आपल्या जिवाला असलेल्या धोक्याचा तिनं त्यावेळी विचारही केला नाही. तिनं प्रसंगावधान राखलं. स्वतःच्या जबाबदाऱ्या जिवावर उदार होऊन व्यवस्थित पार पाडल्या. तिचे रुग्ण ही तिची जबाबदारी होती. त्यांचा जीव वाचवला. काळजी घेतली. तिचा गणवेश हेच तिचं सामर्थ्य होतं.

त्या दिवशी घाबरून तिनं दरवाजेच बंद केले नसते तर… रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवलं नसतं तर… किंवा दहशतवाद्याला ओळखायला नकार दिला असता तर… पण तिनं केलेलं काम देशासाठी किती मोठं होतं, याची जाणीव आज आपण हरवून बसलोय की काय, असं वाटतंय.

अधिक वाचा  वाईन दुकानात विक्रीस परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे- अमृता फडणवीस

अंजली कुल्थे ही माझ्या मते, आपली खरी सेलिब्रिटी आहे. आमची ही हिरॉईन, काही  दीपिका पादुकोन नाही कि झेड सिक्युरिटीच्या गराड्यातली कंगना रणावत नाही  . अंजली हीच धैर्यातलं आणि सेवेतलं खरं सौंदर्य असलेली आमची हिरॉईन आहे. माझ्या साठी ती या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. पडद्यावरील नायिकां एवढेच  २६ नोव्हेंबरच्या रात्री अंजली किंवा तिच्यासारख्याच अनेकांनी दाखवलेलं धैर्यही तेवढंच मोलाचं आहे. कसाबच्या विरोधात ओळख परेड सुरू होती तेव्हा जसा उज्ज्वल निकम यांच्या जिवाला धोका होता तसा शंभर टक्के अंजलीच्या जिवालाही असणार! पण तिनं सिक्युरिटी मागितलेली नाही किंवा तिची तशी अपेक्षाही नाही. अंजली कुल्थे ही कधी पेज थ्री सेलिब्रिटी होणार नाही किंवा माध्यमांमधून तिला पहिल्या पानावर स्थान मिळणार नाही, ना तिला पद्मश्री मिळेल, ना विधानपरिषद मिळेल, ना तिला पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी मिळेल, ना महाराष्ट्रभूषण मिळेल. आपला सन्मान व्हावा, अशी तिची अपेक्षाही असणार नाही. पण ती काळाच्या ओघात विस्मरणात गेली. आपण भारतीय तिच्यासारख्या खऱ्या नायिकेला ओळखू शकत नाही की लक्षात ठेवू शकत नाही.

अधिक वाचा  'मी पुन्हा येईन' असे म्हणण्यात घमेंड नाही तर आत्मविश्वास --नारायण राणे

पण तरीही समाजमन जागं ठेवून आपण अंजली कुल्थेला दीपिका पादुकोन, रिंकू राजगुरूच्या जागी ठेवू तेव्हा या धैर्याने, हजरजबाबीने काम करणाऱ्या वैद्यक क्षेत्रातल्या लेकींना , अहोरात्र रुग्ण सेवा करत नाईटेन्गेलने पेटवलेला सेवेचा धैर्याचा दिवा तेवत ठेवणाऱ्या नर्सेस आणी ब्रदर्स ला समाजमान्यता मिळेल  . त्या जेव्हा खऱ्याखुऱ्या हिरॉईन्स म्हणून गणल्या जातील, तेव्हा तुमची पाच वर्षांची मुलगी किंवा मुलगा म्हणेल, ‘आई, मला नर्स व्हायचंय.’, ‘ आई मला ब्रदर व्हायचय”

यानिमित्ताने मी दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून म्हणजे रात्र रात्र जागून डॉक्टरांपेक्षाही जास्त कष्ट उपसून रुग्णांची शुश्रूषा करणारे देशातील तमाम  ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो.

*- डॉ. अमोल अन्नदाते.*

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love