नवी दिल्ली – अयोध्येच्या भव्य राम मंदिरात देशभरातील भाविकांनी अर्पण केलेल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भारताचे माजी गृहसचिव एस. लक्ष्मीनारायण यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लक्ष्मीनारायण यांनी आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि आयुष्यभराची पुंजी खर्च करून रामललाला अर्पण केलेले सुमारे १५० किलो वजनाचे ‘सुवर्ण रामचरितमानस’ (रामायण) मंदिरातून बेपत्ता झाल्याचा दावा ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला असून, या प्रकरणी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसआयटीला (SIT) पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत भावनिक आणि श्रद्धेशी जोडलेली आहे. माजी गृहसचिव एस. लक्ष्मीनारायण हे १९७० च्या बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे आयएएस अधिकारी होते. आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या आईने आयुष्यभर रामनामाचा जप केला होता. लक्ष्मीनारायण यांच्या कुटुंबाचा या आंदोलनाशी जुना ऋणानुबंध आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी जेव्हा राम मंदिरासाठी विटा गोळा करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा पहिली वीट त्यांच्या सासरच्या घरून (त्रिवेंद्रम, दक्षिण भारत) लोड करण्यात आली होती. त्यांच्या घरात आजही १५०० वर्षांपूर्वीचे प्राचीन रामायण जतन केलेले आहे. त्यांच्या पत्नीची आणि त्यांच्या आईची (ज्या आयुष्यभर ‘राम-राम’ लिहायच्या) इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे कार्य हाती घेतले होते.
आईच्या निधनानंतर तिचे सर्व दागिने आणि लक्ष्मीनारायण यांना सेवानिवृत्तीनंतर कॉर्पोरेट क्षेत्रातून मिळालेले मानधन एकत्रित करून त्यांनी हे अद्वितीय रामायण तयार करण्याचा संकल्प केला. हे रामायण केवळ धार्मिक ग्रंथ नसून ती एक अनमोल कलाकृती आहे. तांब्यावर २४ कॅरेट सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंग करून तयार केलेल्या या रामायणाच्या प्रत्येक पानासाठी सुमारे ८०० ग्रॅम ते १ किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भारताच्या नवीन संसदेत स्थापित करण्यात आलेले ‘सेंगोल’ ज्या चेन्नईच्या जगप्रसिद्ध ‘वुम्मिडी बंगारू ज्वेलर्स’ यांनी तयार केले आहे, त्यांनीच हे दीड क्विंटल वजनाचे रामायण साकारले होते. “मी एक शाकाहारी, निर्व्यसनी व्यक्ती असून माझ्या गरजा अत्यंत कमी आहेत, माझ्या पेन्शनमधील पैसेही मी पूर्ण खर्च करू शकत नाही; त्यामुळे भगवंताने दिलेले त्यालाच परत करावे,” या उदात्त भावनेतून त्यांनी ही ५ कोटींची भेट तयार केली असे लक्ष्मीनारायण यांनी म्हटले आहे.
८ एप्रिल २०२४ रोजी, रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतरच्या पहिल्या रामनवमीच्या मुहूर्तावर, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने हे सुवर्ण रामायण रामललाच्या चरणी अर्पण करण्यात आले . सुरुवातीला चंपत राय यांनी हे रामायण रामललाच्या मूर्तीपासून केवळ १५ इंचाच्या अंतरावर ठेवण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यासाठी लागणाऱ्या पेडेस्टलची रचनाही निश्चित केली होती. मात्र, काही महिन्यांनंतर जेव्हा लक्ष्मीनारायण यांचे नातेवाईक दर्शनासाठी गेले, तेव्हा त्यांना ते रामायण तिथे दिसले नाही. स्वतः लक्ष्मीनारायण यांनी जेव्हा याबद्दल विचारणा करण्यासाठी चंपत राय यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना अत्यंत कटू अनुभवाचा सामना करावा लागला.
लक्ष्मीनारायण यांचा आरोप आहे की, चंपत राय यांनी त्यांना भेटण्यासाठी नऊ-नऊ तास ताटकळत ठेवले. जेव्हा भेट झाली, तेव्हा राय यांनी अत्यंत अहंकारी भाषेत उत्तर दिले की, “माझ्याकडे दररोज कोट्यवधींच्या भेटी येतात, मी प्रत्येक वस्तूचे प्रदर्शन करू शकत नाही. मी जे ठरवेन तेच होईल, तुम्हाला जिथे जायचे असेल तिथे जा”. एवढेच नव्हे तर, दीड क्विंटल वजनाचे सोनेरी रामायण दान देऊनही ट्रस्टने त्यांना साधी पोचपावती किंवा अधिकृत रसीद देण्याचेही टाळले. एका पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना गुप्तपणे माहिती दिली की, ते मौल्यवान रामायण आता एका ‘गार्ड रूम’मध्ये किंवा स्टोअर रूममध्ये दुर्लक्षित अवस्थेत पडलेले आहे.














