24 तासांमध्ये देशात पहिल्यांदाच 12 लाखांपेक्षा जास्त कोविडच्या चाचण्या:6.36 कोटींचा टप्पा पार

आरोग्य राष्ट्रीय
Spread the love

मुंबई – कोविड-19 महामारी विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. देशभरामध्ये पहिल्यांदाच एका दिवसामध्ये  12 लाखांपेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. (For the first time in 24 hours, more than 12 lakh covid tests were conducted in the country)

गेल्या 24 तासांमध्ये देशात 12,06,806 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या.  देशामध्ये आत्तापर्यंत एकूण 6.36 कोटी (6,36,61,060) जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशामध्ये कोविड-19 च्या चाचण्या करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये अतिशय वेगाने वृद्धी होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. देशाची दरदिवसाला चाचणी करण्याची क्षमता अनेक पटींनी आता वाढली आहे. दि. 8एप्रिल, 2020 रोजी  देशात अवघ्या 10,000 चाचण्या करण्यापासून प्रारंभ झाला होता. आता चाचण्यांची  दैनंदिन सरासरी 12 लाखांच्या पुढे गेली आहे.

गेल्या केवळ 9 दिवसांत एक कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Image

मोठ्या संख्येने चाचण्या होत असल्यामुळे कोविडची बाधा झालेल्या रूग्णांची ओळख लवकर होते त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होते. वेळेवर आणि प्रभावी उपचारांमुळे रूग्णांच्या मृत्यूदराचे प्रमाणही कमी होत आहे.

चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे संक्रमणाच्या- प्रसाराचे प्रमाण कमी  होत आहे त्याचबरोबर दैनंदिन कोविड बाधित होण्याच्या दरामध्येही घट दिसून येत आहे.

जगामध्ये होत असलेल्या चाचण्या पाहता भारताची दैनंदिन चाचणी संख्या सर्वाधिक आहे.

कोविड-19 संदर्भातील धोरणे आवश्यतेनुसार केंद्राकडून सातत्याने विकसित करण्यात येत आहेत. तसेच लोकांपर्यंत चाचण्यांची सुविधा पोहोचविण्यासाठी, चाचण्या अधिक सुलभतेने करण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. अलिकडेच केंद्र सरकारने प्रथमच ‘ मागणीनुसार चाचणी’ सेवा उपलब्ध करून दिली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनाही चाचणी सक्षम करण्यासाठी  कार्यपद्धती अधिक व्यापक करून त्यामध्ये लवचिकता आणण्यात आली आहे.

केवळ सरकारी डॉक्टरांनी लिहून दिले तरच चाचणी केली जाणार असे आता नाही;  तर कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला कोविड-19 चाचणी करण्यासाठी लिहून देण्याची परवानगीही केंद्र शासनाने आता दिली आहे. ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचणीचे निकष पूर्ण करणा-या कोणत्याही व्यक्तीला आणि खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाला तसेच सर्व पात्र वैद्यकीय चिकित्सकांना कोविड-19 चाचणी लिहून देता येवू शकते. त्याचबरोबर चाचणी सुलभ करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांनी त्वरित पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी, संक्रमणाला आळा घालण्यासाठी अवलंबिलेल्या नीतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने चाचण्या करणे, हा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती चाचणी करण्यातून सुटू नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘रॅपिड अँटिजन टेस्ट’ केल्यानंतर आलेला निष्कर्ष   आरटी-पीसीआर नियमनाच्या अधिन राहून देण्यात आलेला आहे, असे राज्यांनी स्पष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सुलभ चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विस्तारित चाचणी प्रयोगशाळांचे जाळे देशभरामध्ये तयार करण्यात आले आहे.

देशात प्रति दशलक्ष चाचण्यांमध्ये 46,131पर्यंत वाढ झाली आहे.

भारत जागतिक आरोग्य संघटनेच्या  मार्गदर्शक सल्ल्यानुसार प्रतिदिनी/प्रति दशलक्ष 140 चाचण्या करण्याची लक्षणीय कामगिरी पार पाडत आहे. कोविड-19 संदर्भामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय योजना समायोजित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार कार्य केले जात आहे.

देशातल्या 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 चाचण्या करण्याचे लक्ष्य पार केले आहे.

विस्तारित चाचणी प्रयोगशाळांचे व्यापक जाळे निर्माण करण्यामध्ये प्रमुख निर्धारक म्हणून देश अधिक बळकट झाला आहे. सरकारी क्षेत्रातल्या 1061 प्रयोगशाळा आणि 712 खाजगी प्रयोगशाळांमध्ये म्हणजेच देशामध्ये एकूण 1773 प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 ची चाचणी केली जाते. यामध्ये:-

रिअल टाइम रॅपिड टेस्ट आधारित चाचणी प्रयोगशाळा –

902 (सरकारी – 475 + खासगी 427)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा – 746 (सरकारी – 552 + खासगी – 194)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा –

 125 (सरकारी – 34 + खासगी 91)

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *