पुणे(प्रतिनिधी)—लाडकी बहिण योजनेसाठी २९,६९३ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात तब्बल ३३,२३७ कोटी रुपये खर्च झाल्याचे कॅगच्या अहवालात दिसून येते. या खर्चात ३,५४१ कोटी रुपयांचा मोठा फरक असून, हा वाढीव निधी नेमका कोठून वळवण्यात आला आणि तो कशासाठी खर्च झाला, याचे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. आदिती तटकरे यांनी या ३,५४१ कोटींच्या तुटीचा हिशोब द्यावा, अन्यथा त्यांनी त्यांचे वडील सुनील तटकरे यांना विचारून जनतेला उत्तर द्यावे, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
कॅगने या आर्थिक गोंधळावर गंभीर निरीक्षणे नोंदवली असून, राज्य सरकारने १५,५८६ कोटी रुपयांचा निधी आपल्या नियंत्रणाखाली का ठेवला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पगारी मतदार तयार करण्याच्या नादात सरकारने इतर महत्त्वाच्या विकासकामांचा निधी या योजनेकडे वळवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्य सरकारने अत्यंत गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि तांत्रिक त्रुटी असल्याचा गंभीर ठपका थेट नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालाने ठेवला आहे, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. अर्थ खात्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळेच राज्यात हा आर्थिक गोंधळ सुरू आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडकी बहिण योजनेच्या लाभापासून ९२ लाख महिलांना वंचित ठेवल्याचे सांगत अंधारे यांनी पहिल्या टप्प्यात ७० लाख, दुसऱ्यात १२ लाख आणि तिसऱ्या टप्प्यात १० लाख अशा एकूण ९२ लाख महिलांना टप्प्याटप्प्याने योजनेतून वगळण्यात आले आहे. या महिलांना मिळणाऱ्या १८ हजार रुपयांच्या लाभाचे नेमके काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने निकष शिथिल करून मतांचे राजकारण केले आणि आता निवडणुका नसल्याचे पाहून निकषांचा बागुलबुवा करत महिलांना योजनेबाहेर काढले जात आहे, असे त्या म्हणाल्या.
या योजनेसाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य सुविधांवर कात्री चालवली आहे. रुग्णवाहिका, डॉक्टर आणि रुग्णालयांमधील महिलांच्या आरोग्य सुविधांसाठीचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आला. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असून पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर झाला आहे. जर या निधीचा योग्य वापर करून आरोग्य सुविधा बळकट केल्या असत्या, तर मोशीसारख्या दुर्दैवी घटना टाळता आल्या असत्या, असा दावाही अंधारे यांनी केला.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि पुण्यात घडणाऱ्या अनुचित प्रकारांकडे लक्ष देण्यास फडणवीस यांना वेळ नाही, कारण ते दिल्लीतील राजकारणात आणि मंत्रिमंडळ विस्तारात व्यस्त आहेत, असे त्या म्हणाल्या.
मोशीतील अपघाताप्रकरणी जबाबदार आयुक्त आणि प्रकल्प अधिकाऱ्यांवर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही, तर त्यांच्या आर्थिक संबंधांची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अर्थ खात्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळेच राज्यात हा आर्थिक गोंधळ सुरू आहे. आदिती तटकरे यांनी या ३,५४१ कोटींच्या तुटीचा हिशोब द्यावा, अन्यथा त्यांनी त्यांचे वडील सुनील तटकरे यांना विचारून जनतेला उत्तर द्यावे, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला. सामान्य जनतेच्या पैशातून स्वतःची बॅनरबाजी करणाऱ्या सरकारने पायाभूत सुविधांकडे केलेले दुर्लक्ष राज्याला महाग पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.















