या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे-डॉ. विजय भटकर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– “ सर्वात प्राचीन भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे आज ही येथे ऋषीतुल्य व्यक्तींचा सत्कार होतो. या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे. अशा वेळेस भारतात ऋषीतूल्य व्यक्तींचा सत्कार होणे हे भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे. असे विचार जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी मांडले.”

शारदा ज्ञान पीठम तर्फे शारदा ज्ञानपीठमच्या ४७  व्या वर्धापन दिनानिमित्त ऋषी पंचमीच्या दिनानिमित्त विविध क्षेत्रातील ८२ ते १०० वर्षे वयाच्या १० तपस्वींचा बहुमान ऋषी पुजनेने केले. या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम सेनापती बापट रोड येथील सिम्बॉयोसिस येथे संपन्न झाला.

यावेळी पीफ चेसतीश देसाई व पुणे विभागाचे माजी धर्मादाय आयुक्त दिलीपराव देशमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक अध्यक्ष पं.वसंतराव गाडगीळ हे उपस्थित होते.

या प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दादाराव कराड(८२),  नाभिक समाजभूषण वामनराव शंकरराव देसाई (९२), ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हेमंत जोगदेव (९३), संस्कृतसेवेचे व्रत निष्ठेने पाळणारे पंडित बाबूराव तथा रामकृष्ण पांडुरंग जोशी संस्कृत जीवनव्रती (९०), ग्रंथालय तपस्वी लक्ष्मीनारायण रामचंद्र रोहिवाल (८५), विद्यामहर्षी काकासाहेब तथा केशव कृष्णाजी जोशी (८४), पोलिस पाटील संघटक विलासराव तथा काका पाटील (८४), वेणूवादक व संशोधक पं. केशव गिंडे (८०) आणि डॉ. अमृता मराठे (८०) यांचे पूजन करून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, स्मृतीचिन्ह व पुस्तके देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच पं. वसंतराव गाडगीळ यांचा ही विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अंगुलीमुद्रातज्ज्ञ चंद्रकांत इंगळे (१००) यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात येणार आहे.

डॉ. विजय भटकर म्हणाले,“ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला अशा ऋषीतूल्य व्यक्तींची ओळख होत आहे. त्यांनी समाजासाठी केलेले अतुलनीय आहे. हे सर्वाना सतत प्रेरणादायी ठरेल.”

सत्काराला उत्तर देतांना डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ भारतीय संस्कृती, तत्वज्ञान आणि परंपरा यांचे दर्शन अशा ऋषीतूल्य व्यक्तीमुळे घडते. सदगुणांची पूजा हीच ईश्वर पुजा आहे. जो व्यक्ती समाज कल्याणाचा विचार करतो तो खरा संत असतो. अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हें. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. स्वामी विवेकांनद यांच्या नुसार २१ व्या शतकात भारतमाता विश्वगुरू म्हणून उदयास येईल व सुख शांतीचा मार्ग दाखवेल.”

डॉ. अमृता मराठे म्हणाल्या,“ समाज हा सर्वांसाठी असतो. त्यामुळे आपली मधुर वाणी ही समाजातील प्रत्येक घटक जोडत असतो. वर्तमानकाळात समाजनिष्ठ व विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी अशा ऋषींचे योगदान खूप मोठे आहे. ज्या प्रमाणे मानव संवेदनशील असतो तसेच प्राणीपण असतात ही भावना सर्वांनी लक्षात ठेवावी.  ”

सतीश देसाई म्हणाले,“भारतीय प्रथा, परंपरा, संस्कृतीचा वारसा घेऊन दुसरी पिढी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. येथे दिग्गज लोकांचा सन्मान होतो. असा कार्यक्रम डॉ. विश्वनाथ कराड यांच्यामुळे अधिक लोकाभिमूख झाला आहे. पुण्याचे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व सर्वांसमोर येण्यासाठी पुढील वर्षी हा कार्यक्रम नेहरू स्टेडियमवर घेण्याचे आवाहन त्यांनी केले.”

डॉ. संजय उपाध्ये यांनी ऋषीचे कर्तृत्व नव्या पिढीला कळण्यासाठी काय करता येईल यावर विचार व्यक्त केले. तसेच डॉ. विश्वनाथ कराड यांनी आयुष्यभर केलेल्या सामाजिक, आध्यात्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाची माहिती दिली.

पं. वसंतराव गाडगीळ यांनी शारदा ज्ञानपीठमच्या माध्यमातून ऋषीतूल्य व्यक्तीचे सत्कार करण्यामागचा उद्देश सांगितला.

शारदा ज्ञानपीठाचे संचालक श्रीवर्धन गाडगीळ यांनी प्रस्तावना केली.  डॉ. ठिगळे सूत्रसंचालन केले. संजय रूईकर यांनी आभर मानले.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *