पुणे-काही राज्यात काँग्रेस कमकुवत असली, तरी देशभरात सर्वत्र पाळेमुळे रुजलेला तो एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून देशात कोणतीही आघाडी होऊ शकत नाही, असा दावा शिवसेना नेते आणि ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. 2024 मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजिलेल्या ज. स. करंदीकर स्मृति व्याख्यानानंतर ते बोलत होते. राऊत म्हणाले, अनेक राज्यांत सध्या प्रादेशिक पक्ष सत्तेत आहेत. हा ट्रेंड बरेच काही सांगून जातो. यापुढे देशात एकाच पक्षाचे सरकार राहणार नसेल. तर आघाडी सरकारचे राहील. त्यामुळे केंद्रातील चित्रही 2024 मध्ये बदलेल, हे नक्की आहे. उत्तर प्रदेशात आम्ही लहान असलो, तरी तेथे निवडणूक लढवू. त्याचबरोबर दादरा नगर हवेली, गोव्यातही काम करत आहोत. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एनसीबी अधिकारी समीर वानखडे प्रकरणाबाबत बोलताना ते म्हणाले, समीर वानखेडे चुकीचे वागले आहेत, अशी लोकभावना आहे. या एकूणच प्रकरणात तपास यंत्रणा काम करत आहे. मुंबईचे पोलीस तपास करत आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी जे पुरावे समोर आणले आहेत, ते खरे असतील, तर ते गंभीरच म्हणावे लागेल.
महाराष्ट्रातील सर्व जण मराठीच
या महाराष्ट्रातील सर्व मराठीच आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर विरुद्ध वैयक्तिक लढाई नाही. येथील मराठी लोकांविरुद्धही केंद्रीय यंत्रणांची कारवाई होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिणी, खासदार भावना गवळी, मंत्री अशोक चव्हाण यांचे नातेवाईक हेही मराठीच आहेत ना, असा सवालही त्यांनी केला.
भुजबळांशी चांगला संवाद
नाशिकमधील पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे वाद मिटेल. आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही. आमच्याकडे वाद नाही. आमच्याकडे पेल्यातील वादळे येत नाहीत, जी येतात ती मोठी वादळे येतात. छगन भुजबळ महाविकास आघाडीचे सन्माननीय नेते, वरि÷ मंत्री आहेत. कधीकाळी ते शिवसैनिक होते. त्यांच्या ती रग अजूनही कायम आहे. सुहास कांदे यांच्यातही आमदार म्हणून तशी रग आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान राखावा. एक आमदार आहेत आणि एक पालकमंत्री आहेत. त्यासाठी आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत. छगन भुजबळ यांच्याशी माझा चांगला संवाद आहेत, असेही राऊत यांनी नमूद केले.
एसटीप्रश्नी मुख्यमंत्री गंभीर
एसटी कर्मचाऱयांच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, एसटी कर्मचारी मृत्यू हा महत्त्वाचा विषय आहे. एसटी कर्मचाऱयांचीही वकिली करायला हवी. आर्यन खानला सोडायला मोठमोठे वकील लागले आहेत. एसटी कर्मचाऱयांच्या प्रश्नावर मी वकिली करेन. मुख्यमंत्री संवेदनशील असून एसटी कर्मचारी प्रश्नावर गंभीर आहेत, असे सांगत महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठीच गेल्या दोन दिवसांपासून मी काम करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.