छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांना मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल -चंद्रकांत पाटील


पुणे- मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगत संभाजीराजे यांच्या भारतीय जनता पार्टी सदैव पाठीशी उभी राहील असे ते म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जे ओबीसींना ते मराठा समाजाला असे सूत्र वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगाराच्या अनेक सवलती दिल्या तसेच आरक्षणही दिले. तथापि, महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण गमावले तसेच मराठा समाजासाठी भाजपा सरकारने चालू केलेल्या योजनांची अंमलबजावणीही होत नाही. फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरु केली, मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थीनींची निम्मी फी भरली व त्यासाठी ७८५ कोटी रुपये खर्च केले, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी दहा लाख रुपये कर्जाची योजना सुरू केली, मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतीगृहे सुरू केली. आज हे सर्व बंद आहे. त्यामुळे आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे किंवा राजे समरजितसिंह घाटगे अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांना मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल.

अधिक वाचा  हजारो चिंचवडकरांच्या साक्षीने अरुण पवार यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टीने पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले तर त्याला राजकीय वळण येईल. त्यामुळे भाजपा असे आंदोलन करणाऱ्या मान्यवरांना पूर्ण समर्थन देईल असेही ते म्हणाले.

जोशी भविष्य सांगतात पण पाटील कधी भविष्य सांगू लागले, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. त्याविषयी विचारले असता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, ते एका समाजाला हिणवणारे बोलत आहेत. त्यांनी सांभाळून बोलले पाहिजे. हा जातीयवाद आहे व तो खूप महागात पडेल.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्कार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पुण्यात गुन्हे दाखल केले आहेत, त्याविषयी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्या डोक्याला जबर मार लागला असता. त्या प्रकरणात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची लगेच सुटका झाली. मग त्यांच्यावर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल का झाला नाही?

अधिक वाचा  युगेंद्र पवार यांचे बारामती विधानसभा लढविण्याचे संकेत

केंद्रीय गृह यंत्रेनेने मुंबईत एका राजकीय नेत्याच्या जवळच्या नातेवाईकावर आज कारवाई केली. आहे त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही केंद्रीय गृह यंत्रणांना कारवाई करायला सांगत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या राज्यघटनेनुसार आमचे सरकार काम करत आहे. ज्या नेत्यांनी घोटाळे केले आहेत त्यांना आत्तापर्यंत जेल मध्ये जावे लागले आहे.

१२ आमदारांचे निलंबन करण्यात आले पण आमच्या बाजूने निकाल लागला. त्यावर विरोधी पक्षांनी न्यायालय, वकील हे सगळे भाजपच्या बाजूने आहेत, असा आरोप आमच्यावर केला मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला  निर्णय सगळ्यांनाच मान्य करावा लागतो.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love