कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण,परीक्षेपासून वंचित ठेवू नये- वर्षा गायकवाड


पुणे—कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांनी एकाही विद्यार्थ्याला केवळ फी भरली नाही म्हणून शिक्षण, परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा सक्‍त सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. शुल्कासंदर्भात संस्था, शाळा प्रशासन आणि पालकांनी समन्वयाने निर्णय घेतले, तर ते संयुक्‍तिक ठरेल, असेही त्या म्हणाल्या.

पुण्यात बालभारतीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर प्रा. गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शहरातील काही शाळा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना वेगळी वागणून देत आहेत. त्यांना ऑनलाइन वर्गांना बसू दिले जात नसल्याचे प्रकार काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे येत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर प्रा. गायकवाड यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली.

करोनाच्या संकटामुळे शिक्षण शुल्कात कपात करावी, अशी पालकांची मागणी आहे. मात्र, त्यासंदर्भात काही शिक्षणसंस्था कोर्टाकडे धाव घेतली. ही बाब सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यात राज्य शासनाच्या वतीने शुल्कासंदर्भात योग्य भूमिका मांडली जात आहे. यासंदर्भात न्यायालयाच्या निकालानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र, शुल्क भरले नाही म्हणून कुणालाही शिक्षणपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे शुल्कासंदर्भात समन्वयाने निर्णय घेतल्यास योग्य राहील, असेही गायकवाड यांनी सांगितले.

अधिक वाचा  कोरोना लसींच्या दरांमधील फरक ही नफेखोरीच -नाना पटोले

शिक्षणमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

कोरोनामुळे शाळांच्या शुल्कात कपात करावी म्हणून पालकांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन केली. पण त्यांच्याकडून समाधानकारक आश्‍वासन न मिळाल्याने बालभारती येथे पालकांनी शिक्षणमंत्री आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. बाकीच्या राज्यांमध्ये शुल्क कमी होऊ शकते, तर महाराष्ट्रात का कमी होऊ शकत नाही, असा प्रश्‍न पॅरेंट्‌स असोसिएशन पुणे अध्यक्षा जयश्री देशपांडे केला. पालकांच्या निदर्शने सुरू असताना प्रा. वर्षा गायकवाड यांनी बालभारतीच्या मागच्या दारातून निघून गेल्या. याचवेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तेथे होते. ते पालकांना बोलण्यासाठी गेले असता त्यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने हा वाद संपला. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love