Pune Hooch Tragedy: केवळ ६,६०० रुपयांच्या फायद्यासाठी २२ जणांचा बळी! मुख्य आरोपी वानखेडेचा ‘डेथ प्लॅन’ उघड

Pune Hooch Tragedy: केवळ ६,६०० रुपयांच्या फायद्यासाठी २२ जणांचा बळी
Pune Hooch Tragedy: केवळ ६,६०० रुपयांच्या फायद्यासाठी २२ जणांचा बळी

पुणे(प्रतिनिधी)– पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाने शनिवारी संध्याकाळपर्यंत  २२ जणांचा बळी घेतला असून, केवळ ६,६०० रुपयांच्या अतिरिक्त फायद्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने रचलेला हा ‘डेथ प्लॅन’ असल्याचे तपासात उघड झाले आहे. या भीषण घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, हलगर्जीपणा दाखवणाऱ्या २२ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने मोहीम राबवून ६४५ लिटर विषारी दारू जप्त केली आहे.

या खळबळजनक प्रकरणाची पाळेमुळे उरळी कांचनपासून सुरू होतात. राधेश्याम प्रजापती हा उरळी कांचनमध्ये हातभट्टीची दारू तयार करण्याचे काम करत असे, ज्याच्याकडून योगेश वानखेडे ही दारू विकत घेऊन वेगवेगळ्या गुत्त्यांवर पुरवत असे.  अधिक नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी वानखेडेने २३ मे रोजी पहिल्यांदाच मिथेनॉलचा वापर करण्याचा जीवघेणा प्रयोग केला.  त्याने १७,५०० रुपयांचे २१० लिटर मिथेनॉल आणि ९,५०० रुपयांचे गावठी दारूचे ५ ड्रम विकत घेतले. या ५ ड्रममध्ये पाणी मिसळून १० ड्रम केले आणि त्यात मिथेनॉल मिसळून एकूण १२ ड्रम तयार केले.  हा सर्व साठा त्याने ३३,६०० रुपयांना विकला, ज्यातून त्याला केवळ ६,६०० रुपयांचा नफा झाला, मात्र या अल्प फायद्यासाठी त्याने अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त केले.

अधिक वाचा  नारी शक्ती वंदन अधिनियम: महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी १६ एप्रिलपासून संसदेचे विशेष सत्र

ही विषारी दारू पिंपरीतील फुगेवाडी येथील कर्नेलसिंग विरका (सरदारजी), त्याची पत्नी इंदरजित आणि मुलगा विक्की विरका यांच्या माध्यमातून विकली गेली. तसेच खडकीतील अग्रवाल, वडारवाडीतील धोत्रे आणि हडपसर-काळेपडळ भागातील आकाश जाधव व अशोक हांडे यांनीही ही दारू ग्राहकांना उपलब्ध करून दिली होती.  ही दारू शरीरात गेल्यावर अत्यंत घातक ठरली. कुजलेला गूळ आणि उसाच्या मळीपासून बनवलेल्या या दारूत नशा वाढवण्यासाठी नवसागर, युरिया, ऑक्सिटोसिन आणि प्रमाणाबाहेर मिथेनॉल मिसळल्याने ती विषात बदलली होती. ही दारू प्यायल्यानंतर मळमळणे, उलट्या होणे, दृष्टी अधू होणे आणि तोंडाला फेस येणे अशी लक्षणे मृतांमध्ये दिसून आली. अवघ्या काही तासांतच या विषारी रसायनाने यकृत आणि किडन्या निकामी केल्याने अनेकांचा तडफडून मृत्यू झाला.  उरळी कांचनमधील ३२ वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचाही अशाच प्रकारे मळमळ आणि उच्च रक्तदाबाने मृत्यू झाला.

अधिक वाचा  छगन भुजबळांचे मंत्रिमंडळात 'कमबॅक', अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता

कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला

या घटनेनंतर प्रशासनाने आक्रमक पाऊले उचलली आहेत. हडपसर आणि फुगेवाडी परिसरात २२  मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ६४५ लिटर विषारी दारूचा साठा जप्त केला, ज्यामध्ये हडपसरमधून ७० लिटर, दापोडीतून १५५ लिटर आणि गोखलेनगरमधून ४२० लिटर दारूचा समावेश आहे.  या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले.

२२ जणांवर निलंबनाची कारवाई

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे १३ अधिकारी (३ निरीक्षक, ६ दुय्यम निरीक्षक आणि ४ जवान) निलंबित केले आहेत. तर पुणे पोलिसांच्या हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, एपीआय सिकलगर आणि पीएसआय मुलानी यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील दापोडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि त्यांच्या पथकातील ५ कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणे: टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या, दोन महिला कर्मचाऱ्यांसह एकावर गुन्हा दाखल

५० हून अधिकजण ताब्यात

या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यावर यापूर्वीही ३ गुन्हे दाखल असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.  सध्या ५ जण अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत असून, पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे आणि ५५ ठिकाणी छापे टाकले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love