Modi Govt's Education and Youth Policy Will Vote for Modi

मोदी सरकारच्या शैक्षणिक आणि युवक धोरणामुळे मोदींनाच मतदान होणार : राजेश पांडे

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे(प्रतिनिधि)- एनडीए सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अमुलाग्र बदल केले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कौशल्य विकास शिक्षणावर भर देण्यात आला असून पहिल्यांदाच पुर्व प्राथमिक शिक्षणाचा समावेश धोरणात करण्यात आला आहे. युवकांना दोन पदव्या घेता येणार असल्यामुळे कुशल मनुष्यबळाची निर्मिती मोठ्याप्रमाणात होणार आहे. युवकांचे हित पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करु शकतात. पुणे हे ऑक्सफर्ड आणि ईस्ट नावाने ओळखले जाते. शिक्षण क्षेत्रातील क्रांतीकारक निर्णयामुळे पुण्यामध्ये युवक भाजपच्या उमेदवाराला म्हणजेच मोदींना मोठ्या प्रमाणावर मतदान करतील असा विश्‍वास प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी पुणे लोकसभेचे प्रभारी श्रीनाथ भिमाले, भाजपचे शहर उपाध्यक्ष शाम देशपांडे, प्रशांत हरसुले  लहुली क्रांती सेनेचे नितीन वायदंडे, प्रदेश प्रवक्ते संजय मयेकर आणि हेमंत लेले उपस्थित होते.

पांडे म्हणाले, पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. आयटी हब आहे. मोदी सरकारने युवकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले. यामुळे उद्योगाला चालना मिळाली आहे. पुण्यात अनेक स्टार्टअप सुरु झाले. मोदी सरकारच्या  स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि मेक इन इंडिया, पीएमईजीपी सारख्या योजनांमुळे नवीन संशोधनाला आणि उपक्रमांना चालना मिळाली आहे. राज्य सरकारने सर्व जिल्हयांमध्ये योजगार मेळावे आयोजित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात युवकांना नोकर्‍या मिळाल्या. 2014 ते 2019 आणि 2021 ते 2023 या कालावधीत, राज्य सरकारने वेगवेगळ्या जिल्हयांमधये 1 हजार 473 रोजगार मेळावे घेतले. यामध्ये  अडीच लाख कर्मचार्‍यांच्या भरतीसाठी 13 हजार उद्योजकांना बोलावण्यात आले होते. राज्य सरकार विविध विभागांमध्ये 72 हजार पदे लवकरच भरणार आहे. मोदी सरकारने दीनदयाळ उपाध्याय ग्रामिण कौशल्य योजना, पंतप्रधान कौशल्य विकास योजनांसारख्या प्रमुख औदयोगिक आणि व्यावसायिक कौशल्य देणार्‍या योजना आणल्या आहेत. राज्यातील 34 ग्रामिण जिल्हयांमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात आली असल्याचे पांडे यांनी सांगितले.

मोदी सरकारने युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद केली आहे. मुद्रा योजना,पंतप्रधान स्वनिधी योजना यामुळे 2014 पासून उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या . मुद्रा योजनेचा लाभ 3 कोटी 74 लाख लाभार्थ्यांना झाला आहे. यामध्ये 20 टक्के अनुसुचित जाती आणि जमातीमधील नागरिक आहेत. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत राज्यात 7 लाख 65 हजार पथविक्रेत्यांना आर्थिक मदत मिळाली. यामध्ये महिलांचे प्रमाण 44 टक्के इतके आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल शाळा सुरु करण्यात आल्या. उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नवीन वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी, आयआयएम आणि विद्यापीठे सुरु करण्यात आली. मोदी सरकारच्या काळात पाच हजार नवीन आयटीआय स्थापन करण्यात आले असल्याचे पांडे यांनी सांगितले.

प्रचाराच्या शेवटच्या टप्यात राज ठाकरे, फडणवीस, अजित पवार यांच्या पुण्यात सभा

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी  4 मे पासून घर चलो अभियान सुरु करण्यात आले आहे. साडेसात हजार कार्यकर्ते  घरोघरी जावून प्रचार करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ,मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, , महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सभांचे आणि दौर्‍याचे नियोजन 8 ते 11 मे दरम्यान करण्यात आले असल्याचे राजेश पांडे यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *