पुणे(प्रतिनिधी)–महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी, १४ जुलै २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
इयत्ता १० वीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत, तर १२ वीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै २०२६ या काळात पार पडली. या परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिका छायाप्रत प्रक्रिया:
ऑनलाईन निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच १५ जुलै ते २४ जुलै २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी आवश्यक शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, युपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यानंतरच्या पाच कामकाजाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
श्रेणी सुधार योजनेची संधी:
ज्या विद्यार्थ्यांनी या पुरवणी परीक्षेत सर्व विषयांसह यश संपादन केले आहे, त्यांना आपली श्रेणी किंवा गुण सुधारण्यासाठी ‘श्रेणी/गुणसुधार योजने’ अंतर्गत पुढील सलग तीन संधी उपलब्ध असतील. यामध्ये फेब्रुवारी-मार्च २०२७, जून-जुलै २०२७ आणि फेब्रुवारी-मार्च २०२८ या परीक्षांचा समावेश असेल.
दरम्यान, फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी आणि श्रेणीसुधार योजनेतील विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. या अर्जांच्या तारखा मंडळामार्फत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.













