खडकवासला १०० टक्के भरले : धरणाच्या सांडव्यातून ११ हजार ९०० क्युसेक विसर्ग : नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरालगतच्या विविध धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे शहराला पानी पुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्गही वाढवून दुपारी १ वाजता ११ हजार ९०० क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

राज्यभरात मागील काही दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मराठवाड्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यात चार प्रमुख धरणांच्या परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मागील महिन्यात पावसाने ओढ दिल्याने कोरडी पडलेली धरणे भरू लागली असून, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांचा एकूण पाणीसाठा मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ११.५७ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे एकूण क्षमतेच्या ३९.६९ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षी याचवेळी हा पाणीसाठा ८.६२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे एकूण क्षमतेच्या २९.५६ टक्के इतका होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा २.९५ टक्क्यांनी हा पाणीसाठा जास्त झाला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात अजूनही संततधार सुरू असून या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून आणखी विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *