पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास (भाग -10)

अध्यात्म महाराष्ट्र
Spread the love

सन १८३५ मध्ये हैबतबाबांनी श्री ज्ञानेश्वरांचा स्वतंत्र पालखी सोहळा सुरू केला, याकामी त्यांना वासकर महाराज, आजरेकर महाराज व सरदार शितोळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. बैलगाडीवर आडव्या फळ्या टाकून त्यावर पालखी ठेवून पंढरपुरास पालखी आणण्याची प्रथा सुरू झाली, पालखी सोहळ्याचा आर्थिक भार श्री शितोळे सरदार यांनी उचलला. हैबतबाबा यांनी पालखी सोहळ्यात सैनिकी शिस्त आणली, त्यामुळे पालखीचे प्रस्थानापासून पंढरपूर पर्यंतचे सर्व मुक्काम, तेथील व्यवस्था, आगमन व प्रयाणाच्या वेळा, पालखीचा सरंजाम, दिंड्याचे क्रम त्यांनीच घालून दिल्याप्रमाणे चालत असतात, त्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कुठलाही गोंधळ न होता हा पालखी सोहळा संपन्न होत असतो. आळंदी – पुणे – सासवड – जेजुरी – वाल्हे – नीरा – लोणंद – तरडगाव – फलटण – नातेपुते – शंकरगाव – माळशिरस – वेळापूर – भंडीशेगाव – वाखरी- पंढरपूर हाच या पालखीचा प्रथम पासूनचा मार्ग आहे व याच मार्गाने ती परत जाते.

 संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्येष्ठ वद्य अष्टमीला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. प्रस्थानाच्या दिवशी पहाटे तीन वाजता माऊलींच्या समाधीची महापूजा होते, दुपारी एक वाजता दिंडी प्रमुखांना आमंत्रण दिले जाते, तीन वाजता घोडे सन्मानपूर्वक आणतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची आरती होते, मानाचे पाच नारळ दिले जातात. त्यानंतर देवस्थानतर्फे आरती होऊन पादुका पालखीत ठेवल्या जातात, या वेळी ४७ मानाच्या दिंड्या देऊळ वाड्यात तर उर्वरित सर्व बाहेर असतात, दिंडी प्रदक्षिणा करते व दिंडी प्रमुखांना नारळ दिला जातो. रात्री नऊ वाजता गांधी वाड्यात आरती होते, रात्रभर जागर होतो व पहाटे आरती होऊन पालखी पुण्याकडे निघते, याप्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होते.

 (क्रमशः)

डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर

मो.क्र. ७५८८२१६५२६

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *