हा तर फक्त स्वल्पविराम : काहीही झाले तरी भाजपला अजित पवार का हवे आहेत?

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

सहा महिने झाले की अजित पवार नॉट रिचेबल, अजित पवार (ajit pawar) नाराज अशा बातम्या येतच असतात. पण घडत काहीच नाही आणि ज्यावेळी घडतं तेव्हा या कानाचा, त्या कानाला पत्ता लागत नाही. आत्ता देखील अजित पवारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चा राजकारणात काही दिवसांपासून सुरू आहेत. राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा, माध्यमे, सोशल मिडियावर झडू लागल्या आहेत. कोण म्हणतं अजित पवार आणि अमित शहांची (amit shaha ) भेट झाली. कोण म्हणते अजित दादांचा यावेळी पक्क ठरले आहे. कोणी त्यांचे दौरे रद्द झाल्याच्या बातम्या देतात. थोडक्यात काय तर यंदा ठरले हे फिक्स असल्याचे सांगितलं जातंय. त्याला कारणही तसेच आहेत. विरोधी पक्षनेते असतानाही इतर वेळी क्षुल्लक कारणावरून कार्यकर्त्यांवर भडकणारे अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून फारसे आक्रमक झालेले दिसत नाहीत. तसेच गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीवरून घेतलेला सॉफ्ट कॉर्नर असू की इतर मुद्दयांवरुन भाजप आणि मोदींबद्दल घेतलेला सॉफ्ट कॉर्नर असूद्यात त्यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. त्यातच एका इंग्रजी दैनिकाने अजित पवारांचं ठरलं अशा आशयाचे वृत्त दिले. अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचे या वृत्तमध्ये म्हटल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shaha) यांची भेट घेतली आणि आल्यानंतर काय चर्चा झाली हे उघड करणार नाही असे सांगत आणखी भर घातली.

दरम्यान,  शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रसार मध्यमांसमोर या सर्व गोष्टींचा इन्कार केला. अजित पवारांबद्दल जी चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्या मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करायच्या म्हणून हे सगळं चाललंय. या पलीकडं त्याला काही अर्थ नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अजित पवार भाजप मध्ये जाणार असल्याच्या चर्चेबाबत दिले. तर दुसरीकडे अजित पवार यांनी ‘जीवात जीव असेपर्यंत पक्षाचे काम करीत राहणार , स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे प्रसार माध्यम प्रतिनिधींना विचारत सर्व चर्चा फेटाळून लावल्या. परंतु, हा पूर्णविराम नाही तर स्वल्पविराम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सध्याच्या सरकारला संख्याबळ बघता कुठलाही धोका नाही. अगदी शिवसेनेच्या  (शिंदे गट) 16 आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही असे खुद्द अजित पवार म्हणत आहेत. मग असे असताना महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भाजपला अजित पवारांची गरज आहे का?  आणि असेल तर ती का बर आहे?  शिवसेनेच्या प्रकरणात पूर्वीच असंतोष असताना अजित पवारांना सोबत घेण्याची अशी काय गरज भाजपला आहे. हे जाणून घेणेही तितकेच महत्वाचे आहे.  

सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयाबाबतीत शिंदे गटाच्या 16 आमदारांवर उपाध्यक्ष नरहरी झीरवळ यांनी  केलेली कारवाई मान्य करणार नाही अथवा हे प्रकरण सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं जाईल. अशावेळी हे 16 आमदार अपात्र होणार नाहीत . दुसरी शक्यता शिंदेंसहित 16 आमदार अपात्र ठरवले जातील आणि त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असल्याकारणाने हे सरकार कोसळेल अर्थात सरकार कोसळेल किंवा नाही कोसळणार पण या दोन्ही शक्यतांमध्ये भाजपला अजित पवारांची तितकीच गरज भासू शकते.

सर्वात पहिल्यांदा 16 जण अपात्र ठरले तर अजित पवारांची कशी गरज भासेल ते पाहूया… सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर 16 आमदार अपात्र ठरले तर विधानसभेच्या सदस्यांची संख्या 288 वरून 272 इतकी होईल.  यावेळी बहुमताचा आकड 137 इतका असेल.  शिंदे आणि फडणवीस सरकारचे एकूण बहुमताचा आकडा देखील 165 वरून 149 इतका होईल. म्हणजे 16 आमदार अपात्र ठरले तरी देखील शिंदे-फडणवीस  सरकार बहुमतामध्येच असेल. परंतु हे प्रकरण इथेच थांबणार नाही.  शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाल्यानंतर उर्वरित 24 जणांवर देखील अपात्रतेची टांगती तलवार येऊ शकते. अशावेळी या 24 पैकी काही आमदार ठाकरेंकडे माघारी फिरतील अशीही शक्यता आहे.  जर माघारी गेलेच नाही तर ‘टू थर्ड’चा नियम सांगून या 24 जणांना अपात्र करण्याची मागणी केली जाईल.  एकंदरीत पुन्हा अराजकता निर्माण होईल.  समजा या 24 जणांवर देखील अपात्रतेची कारवाई झाली तर काय होईल? त्यावेळी  एकूण अपात्र होणाऱ्या आमदारांची संख्या असेल 40 आणि विधानसभा सदस्यांचा एकूण आकडा 288 वरून 248 होईल.  यावेळी बहुमताचा आकडा 125 असेल भाजपचे 105 आणि शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले अपक्ष आणि इतर पक्षांचे मिळून वीस आमदार पकडून हे बहुमत 125 इतका होईल अर्थात अशावेळी भाजपकडे काठावरचे बहुमत असेल आणि या 24 जणांनी ठाकरेंचा रस्ता पकडला तर अशावेळी हे सदस्य अपात्रतेच्या कात्रीतून वाचतील आणि त्यावेळी विधानसभेची सदस्य संख्या 288 वरून 272 होईल आणि बहुमताचा आकडा 137 इतका असेल.  125 वरील पण ठाकरेंकडे 24 जण परत गेल्यानंतर महाविकास आघाडीचा एकूण आकडा हा 138 इतका होईल आणि अशावेळी महाविकास आघाडी बहुमतात येईल. असं झालं तर मात्र अजित पवार सर्वात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसू शकतात.  आता अजित पवार नेमके कशासाठी लागतील तर 16 पात्र आणि 24 माघारी फिरले तर भाजपला 13 आमदारांची गरज लागेल आणि हे 13 जण अजित पवार राष्ट्रवादी मधून घेऊन येऊ शकतील आणि सरकार टिकेल. पण 13 जणांवर आणि अजित पवारांवर कारवाई होणार नाही का?  तर इथे देखील अजित पवार एकनाथ शिंदे ठरू शकतील.  

पक्षांतर बंदीचा दोन तृतीयांश नियम पाळायचा असल्याने अजित पवारांना राष्ट्रवादीचे किमान 36 आमदार घेऊन बाहेर पडावे लागेल आणि त्यातही स्वतःच्या गटाला कोणत्यातरी पक्षात विलीन करावे लागेल.  म्हणजेच अजित पवारांना किमान 36 आमदार घेऊन थेट भाजपमध्ये सामील व्हावे लागेल.  अजित पवारांकडे दुसरा पर्याय असेल तो म्हणजे बहुमताचा आकडा सांगून स्वतः पक्षावर दावा करण्याचा.  एकनाथ शिंदेंप्रमाणे सर्वाधिक आमदार आणि खासदारांचा पाठबळ घेऊन अजित पवार तसं करूही शकतील पण एकनाथ शिंदेंच्या समोर वाढलेल्या अडचणी, अपात्रतेची कारवाई पुन्हा निवडणूक आयोग आणि न्यायालयीन लढा, तो देखील शरद पवारांच्या विरोधात लढणं या शक्यता अजित पवार कधी स्वीकारणार नाहीत. शरद पवारांच्या मर्जीने आणि शरद पवारांना सोबत घेऊनच असा स्टॅन्ड अजित पवार घेताना दिसू शकतील.

परंतु, आपला मुद्दा हा आहे की अजित पवारांची गरज का आहे? तर पहिले कारण आपण पाहिले ते बहुमतांच्या आकड्यांचं जिथे सरकार टिकवण्यासाठी अजित पवार हे महत्वाचा फॅक्टर ठरतील.

पण दुसरी शक्यता देखील तपासून बघितली पाहिजे ती म्हणजे आमदार अपात्र झालेच नाहीत तरीही अजित पवारांचा पाठिंबा भाजपला पाहिजेच असणार आहे किंवा अजून एक शंका अशीही व्यक्त केली जात आहे की, अगोदरच शिवसेना फोडण्याचा पाप माथी असताना भाजप राष्ट्रवादी फोडण्याचे पाप घेऊन निवडणुकीत उतरेल का?  आणि निवडणुकांना दीड एक वर्ष असताना ही रिस्क भाजप घेईल का?  तर हो भाजपला काहीही करून अजित पवारांचा पाठिंबा लागेलच. आता तो कशासाठी तर त्यासाठी राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणाचा विचार करावा लागेल.

 भाजपचा सर्वात पहिला इंटरेस्ट आहे तो म्हणजे मोदींना सिक्युअर करणं.  2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना बहुमताने पंतप्रधान करणं हा भाजप समोरचा सर्वात महत्त्वाचा अजेंडा आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र असो की मुंबई महानगरपालिका असो सर्वकाही कॉम्प्रमाईज करण्यासाठी भाजप हाय कमांड तयार होईल.  2019 च्या निवडणुकीत भाजपला सेनेसोबत एकूण 41 खासदारांची रसद महाराष्ट्रातून मिळाली होती. आता मात्र ती स्थिती नाहीये. आज ठाकरेविरोधात आहेत, महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची तयारी करते आहे. अशावेळी जे जे सर्वे आले त्या त्या सर्वे मध्ये महाविकास आघाडी 30 पेक्षा जास्त जागा घेताना दिसते आहे, ठाकरे आणि शिवसेना सोबत असताना 41 खासदारांचा हा आकडा आता थेट 10 पर्यंत ढासळू शकतो अशाही चर्चा  आहे. अशावेळी भाजपला महाविकास आघाडी कमजोर करावी लागणारे अजित पवार आलेच तर महाविकास आघाडी कमजोर होईल आणि महाराष्ट्रातल्या खासदारांचा आकडा वाढवता येईल.

थोडक्यात काय तर मोदींसाठी महाराष्ट्र कॉम्प्रमाईज करण्याची खेळी भाजप खेळू शकतो आणि जरी सरकार पडलं ना पडल तरीही… म्हणूनच भाजपचे नेते कितीही नाकारात असले तरीही अजित पवारांसाठी हाय कमांड रेड कार्पेट टाकून तयार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *