पुणे -‘शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात अपात्र परीक्षार्थी पात्र करण्यासंदर्भातील संख्या जास्त असल्याने त्याबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.
टीईटी परीक्षा २०१९ च्या तब्बल सात हजार ८८० जणांना बनावट पध्दतीने प्रमाणपत्रे दिल्याचे समोर आले असून, त्याबाबतची यादी पत्त्यांसह तयार झाली आहे. संख्या मोठी असल्याने दोषानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा संस्थापक गणेशन ट्रान्झिट रिमांड घेऊन पोलिसांसमोर हजर झाला असून, त्याची चौकशी सुरू करण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
२०१९ ची शिक्षक पात्रता परीक्षा २०२० मध्ये पार पडली. या परीक्षेच्या निकालात १६ हजार पैकी सात हजार ८८० परीक्षार्थींना बनावटरीत्या पास केल्याचे उघड झाले आहे. अंतिम निकालाची फेरतपासणी केली असता त्यात बोगस परीक्षार्थी यादी टाकल्याचे दिसून आले. आरोपींनी तीन प्रकारे गैरव्यवहार केला असून, पहिल्या प्रकारात ओएमआर शीटमध्येच बदल केला. दुसऱ्या प्रकारात ओएमआर शीट स्कॅन झाल्यानंतर निकाल बदलण्यात आला, तर काही परीक्षार्थींचा जातीचा रकाना बदलून त्यांना पास करण्यात आले. जर तीन प्रकारांत बसले नाही त्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली असून, अशाप्रकारे आरोपींनी मोठा गैरव्यवहार केला आहे.
टीईटी प्रमाणपत्र प्रत्यक्ष देणे आवश्यक असताना काही परीक्षार्थींना ते पोस्टाद्वारे किंवा कुरिअरने पाठविले गेले असून, याबाबतची सविस्तर माहिती प्रत्येक जिल्ह्याकडून मागविण्यात आली आहे. आतापर्यंत चार ते पाच जिल्ह्यांतील ३०० बोगस प्रमाणपत्रांची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. सर्व माहिती गोळा करून राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत पडताळणी करीन त्यासंदर्भातील अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे.