तर कॉँग्रेस पक्षच संपून जाईल – शशी थरूर: का म्हणाले असे?


नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—भाजपचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार करत असल्याचा आरोप होत असताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, लेखक तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला चेतावणी दिली आहे. कॉंग्रेसने ‘भाजपा लाइट’ (भाजपचे दुसरे रूप) बनण्याचा प्रयत्न केल्यास कॉंग्रेस पक्षच संपून जाईल असे सूचक वक्तव्य थरूर यांनी केले आहे.

 ‘द बॅटल ऑफ बिलॉगिंग’ The Battle of Belonging या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला ही चेतावणी दिली आहे. कॉंग्रेस पक्ष ‘भाजपा लाइट’ (भाजपाचे दुसरे रूप) होण्याच्या चक्रात संपून जाईल असे ते म्हणाले.

थरूर म्हणाले, एक तत्व म्हणून भारतात धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाला आहे. सत्ताधारी पक्ष घटनेतून हा शब्द काढून टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु, द्वेष पसरविणाऱ्या शक्ती देशाची  धर्मनिरपेक्षतेला  धक्का लाऊ शकत नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले.

अधिक वाचा  Maharashtra Olympic Association Election: अजित पवार आणि मुरलीधर मोहळ यांच्यातील संघर्ष संपला : महायुतीत समझोता

धर्मनिरपेक्षता हा फक्त एक शब्द आहे आणि सरकारने हा शब्द काढून टाकला तरी राज्यघटना मूळ स्वरूपामुळे धर्मनिरपेक्षच राहील असे सांगून थरूर म्हणाले की, कॉंग्रेस ‘भाजपा लाइट’ (भाजपचे दुसरे रूप) बनण्याची जोखीम नाही घेऊ शकत कारण तसे केल्यास कॉंग्रेस संपण्याचा धोका आहे.

ते म्हणाले की, कॉंग्रेस भाजपाच्या राजकीय विचारांचे कुठलेही सौम्य रूप अंगीकारत नसून कॉंग्रेसमध्ये भारतीय धर्मनिरपेक्षतेची भावना चांगली जिवंत आहे. कॉंग्रेसवर सौम्य हिंदुत्वाचा आरोप केला जात आहे याबद्दल बोलताना थरूर म्हणाले की, अनेक उदारमतवादी भारतीयांमध्ये हा चिंतेचा विषय झाला आहे परंतु, कॉंग्रेस पक्षात आमच्यामध्ये याबाबत स्पष्टता आहे की काही झाले तरी कॉंग्रेसला भाजपचे दुसरे रूप बनवू द्यायचे नाही

ते म्हणाले,  ‘हिंदू धर्म आणि हिंदुत्व यात फरक आहे. आम्ही ज्या हिंदू धर्माचा आदर करतो तो सर्वसमावेशक आहे आणि टीकास्पद नाही, तर हिंदुत्व हा एक राजकीय सिद्धांत आहे जो भेद निर्माण करतो. म्हणून आम्ही भाजपच्या राजकीय विचारांचे सौम्य स्वरूप मांडत नाही. राहुल गांधींनी हे स्पष्ट केले आहे की मंदिरात जाणे हा त्यांचे वैयक्तिक हिंदुत्व आहे. ते कोणत्याही प्रकारच्या सौम्य किंवा कट्टर हिंदुत्वाचे समर्थन करत नाहीत.

अधिक वाचा  महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर ?

 धर्मनिरपेक्षता ‘हा फक्त एक शब्द आहे; घटनेतून हा शब्द सरकारने काढून टाकला तरी राज्यघटना धर्मनिरपेक्षच राहील., असे सांगून ते म्हणाले की, उपासनेचे स्वातंत्र्य, धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अल्पसंख्याक हक्क, सर्व नागरिकांना समानता या सर्व गोष्टी घटनेचा मूलभूत गाभा आहे आणि एक शब्द काढून टाकण्याने हे सर्व संपणार नाही.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love