जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला- ‘मुलखावेगळी ती’ : सेवाभावी – डाॅ.मंगलाताई

महाराष्ट्र लेख
Spread the love

पुण्यातील सुपे मेमोरिअल हॉस्पिटलच्या संचालक आणि सान्वी फर्टीलीटी सेंटरच्या प्रवर्तक डाॅ. मंगला सुपे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून सामाजिक संवेदना जपणारे व्यक्तिमत्त्व आहे.

स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करताना त्यांनी आपल्या  वैद्यकीय व्यवसायात  सामाजिक जाणीव जागृत ठेवली आणि त्यातून एक एक काम हाती घेतले. वयात येणा-या मुलींसाठी ‘मी किशोरी’ या अभियानात  किशोर वयीन मुलींसाठी शरीर आणि  मनाच्या आरोग्यासाठी काम, तरूण स्त्रियांसाठी गर्भारपण व प्रसूतीच्या महत्वपूर्ण दिवसात  काळजी घेण्याचे मार्गदर्शन, प्रौढ स्त्रियांसाठी स्तनाचा कर्क रोगासारख्या गंभीर आजारांवर विविध शिबिरांच्या माध्यमातून उपचार, याशिवाय, आदिवासी प्रवर्गातील 10वी 12वीच्या विद्यार्थाना शैक्षणिक मार्गदर्शन आणि आदिवासी तरूण तरूणींचे सामुहिक विवाह इतका त्यांच्या कार्याचा पसारा आहे.

सेवा कार्यातून उभे राहिलेले ” मी किशोरी” हे अभियान तारूण्यात पदार्पण करणा-या मुलींना शरीर आणि मन यांच्या आरोग्याविषयी जागृती करणारे एक महत्वपूर्ण काम आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून कार्यरत असल्यामुळे गर्भवती महिला हेच माझे मुख्य पेशंट आहेत. पण त्यामध्ये जेव्हा वय वर्ष १६ पेक्षाही लहान मुली गर्भवती होऊन येतात, तेंव्हा या पीडित मुलींवर झालेला आघात,  त्यांच्या

आई-वडिलांवरचा सामाजिक व मानसिक ताण

तणाव बघून लक्षात येते की, या मुली दुर्गम, ग्रामीण भागातून आलेल्या असतात. त्यांचे अनेक प्रश्न असतात. अंतर्मुख होत मंगला ताई संवाद साधत होत्या. अर्थात, शहरी भागातल्या मुली सुध्दा या ना त्या कारणाने आत्याचाराला बळी पडतात. अशी घटना समोर दिसली की मनाला चटका लावून जाते. स्त्रीरोगतज्ज्ञ या नात्याने या समस्येकडे जास्त गंभीरतेने पाहिले पाहिजे,असे वाटते. यातूनच *मी किशोरी* या अभियानातून प्रत्येक मुलीला वयात येताना शारीरिक मानसिक बदलांची जाणीव व त्याचे आयुष्यावर होणारे परीणाम, यातून स्वतःवर येणारी जबाबदारी समजावून सांगणे असे या कामाचे उद्दीष्ट्य आहे. याच उद्देशाने “मी किशोरी’ उपक्रमाला सुरुवात झाली. शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात हे कार्यक्रम घेण्याचे ठरले. समाजात या उमलत्या कळ्या केवळ अज्ञानामुळे कोमेजणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, याबाबतची जागृती करायचे ठरले. 

प्रत्येक मुलीने आपला  ‘स्व’  जपणे गरजेचे आहे. आपला आत्मसन्मान टिकवण्यासाठी जागरूक राहून संकटापासून स्वतःला दूर ठेवणे आणि आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे असे वाटते.

अध्यापकाची भूमिका निभावताना ज्ञानार्जन करण्याची भावना जास्त प्रबळ असते. भविष्यातील डॉक्टर होणाऱ्या आपल्या विद्यार्थ्याची संवेदनशीलता जागी करून त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करून द्यावी, हीच भावना जास्त प्रकर्षाने आहे. शोषित-पीडित वर्गातील  एखादा रुग्ण ज्या अपेक्षेने आपल्याकडे आला आहे त्याकडे सेवाभावाने जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

 माझे विद्यार्थी भावी आयुष्यात एक संवेदनशील डॉक्टर म्हणून नावाजले जावेत,  अशी माझी भूमिका या अध्यापनाच्या मागे आहे. भविष्यात आपल्या पेशंटशी डॉक्टरांचा सुसंवाद चांगला घडून यावा, याबाबत त्यांच्या शिक्षण काळातच त्यांच्या मनावर बिंबवणे, ही अध्यापकाची मोठी जबाबदारी

आहे. याविषयातला अध्यापकांचा अनुभव विद्यार्थ्यांना खूप उपयोगी पडू शकतो. सध्याच्या धकाधकीच्या व धावपळीच्या जीवन पध्दतीमुळे वंध्यत्वाचा प्रश्न ज्वलंत होताना सध्या मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. विशेषतः शिक्षण व करिअरला प्राधान्य देणा-या तरुणपिढीला  या समस्येला सामोरे जावे लागत आहे.   त्याला मानसिक बळ देणे जास्त गरजेचे आहे. हीच वंधत्वावर मात करण्यासाठी सर्वात महत्त्वाची पायरी म्हणावी लागेल. कारण पेशंट  सुरवातीच्या काळात खूप तणावाखाली असतो, तेव्हा त्याचे कौन्सलिंग करणे खूप आवश्यक आ वंध्यत्व  समस्येत औषधांईतकेच मानसिक बळ दृढ असणे गरजेचे आहे. वंध्यत्व निवारणासाठी मानसिकता अनुकूल असणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.  सांगवी फर्टिलिटी सेंटरच्या माध्यमातून अनेक जोडप्यांचा ‘आशेचा किरण’ होण्याचा प्रयत्न डॉ. सुपे करत आहेत.

‘रेड स्वस्तिक सोसायटी’ ही एशियन ओरिजिन संघटना आहे. देशभर या संस्थेच्या आरोग्यविषयक संघटना आहेत. संस्थेचे मुख्य काम  आरोग्य शिक्षण हेच आहे. यामध्ये गरजू,  गोरगरीब रुग्णांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत करते. शस्त्रक्रिया ते पुनर्वसनापर्यंत ही मदत केली जाते.  त्यातून स्त्रियांच्या आजारांचे निदान करून योग्य मार्गदर्शन करणे हे काम त्या या संस्थेच्या माध्यमातून करते. या कामात विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, पंढरीच्या वारीतील वारकऱ्यांची सेवा करणे हे एक मोठे काम संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी होत असते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील हजारो वारकरी रुग्णांची तपासणी करण्याचे अतीव समाधान त्यांना  त्यातून मिळते.

 स्वभावातली  संवेदनशीलता हीच स्त्रीची खरी शक्ती आहे. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे एका वंचित समाजघटकाला घेऊन जाणारी डाॅक्टर मंगला सुपे नावाची ,  ‘ती एक  दीपकळी .. मुलखावेगळी भासली. 

 अमृता खाकुर्डीकर, पुणे.

[email protected]

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *