पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी हा विवाह कुटुंबीयांपासून पूर्णपणे लपवून ठेवला होता, मात्र काही नातेवाईकांना याची कुणकुण असावी असा संशय पोलिसांना आहे. या दोघांना पुण्यात न राहता राजस्थानमधील उदयपूर किंवा जोधपूर येथे कायमचे स्थायिक व्हायचे होते. चेतन हा सियाला मारवाडी संस्कृती, तिथली पारंपरिक वेशभूषा आणि जीवनशैलीबद्दल माहिती देत होता, जेणेकरून लग्नानंतर ते तिथे नवीन आयुष्य सुरू करू शकतील. केतनसोबत नोव्हेंबर २०२६ मध्ये होणारे लग्न टाळण्यासाठी सियाने अनेक प्रयत्न केले होते. प्री-वेडिंग फोटोशूटसाठी बालीला जाणे असो वा वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरची ट्रीप, केतनसोबत एकाच खोलीत राहावे लागू नये यासाठी तिने हे सर्व कार्यक्रम टाळले होते, अगदी केतनचा पासपोर्टही तिने स्वतःकडे लपवून ठेवला होता.
केतनची हत्या करण्यासाठी आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध कट रचला होता. कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी विविध वेब सीरिज, पॉडकास्ट आणि गाजलेल्या गुन्ह्यांच्या व्हिडिओंचा अभ्यास केला होता. शस्त्राचा वापर केल्यास पकडले जाण्याची भीती असल्याने त्यांनी हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचे ठरवले. हत्येचा पहिला प्रयत्न १४ जून रोजीच करण्यात आला होता, मात्र त्यावेळी सियाला प्रत्यक्ष कृती करण्याचे धाडस झाले नाही. तिने चेतनला मेसेज करून “माझे डेअरिंग होत नाही, तूही चल… आपण दोघे मिळून त्याला ढकलू,” असे म्हटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. १४ जून रोजी तिने केतनला धक्का दिला होता, पण झाडाचा आधार मिळाल्याने तो वाचला, तेव्हा तिने सापापासून वाचवण्यासाठी धक्का दिल्याची बतावणी केली होती.
शेवटी १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर प्री-वेडिंग फोटोशूटच्या बहाण्याने केतनला नेण्यात आले. यावेळी चेतन चौधरी हा चेहरा लपवण्यासाठी हुडी घालून त्यांच्या मागावर होता. केतन दरीकडे पाहत असताना या दोघांनी त्याला मागून धक्का देऊन संपवून टाकले. या प्रकरणाचा उलगडा करण्यात केतनच्या बहिणीने व्यक्त केलेला संशय आणि सियाच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. जानेवारी महिन्यापासून हत्येच्या दिवसापर्यंत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर बोलणे झाले होते, ज्याचा कालावधी ३३८ तासांहून अधिक होता. सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.














