दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये भीषण अग्नितांडव; २१ जणांचा होरपळून मृत्यू, जीव वाचवण्यासाठी पर्यटकांच्या इमारतीवरून उड्या

दिल्ली मालवीय नगर आग दुर्घटना
दिल्ली मालवीय नगर आग दुर्घटना

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील दक्षिण भागातील उच्चभ्रू मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी एका पाच मजली हॉटेल आणि रेस्टॉरंटला लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण इमारत आगीच्या विळख्यात सापडली. या दुर्घटनेत अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावरून थेट खाली उड्या मारल्या, ज्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवीय नगरमधील एका मोठ्या रुग्णालयाजवळ असलेल्या ‘फ्लोरिश स्टे’ (Flourish Stay) नावाच्या या हॉटेलमध्ये ही आग लागली. ही इमारत पाच मजली असून तिथे रेस्टॉरंट आणि हॉटेल दोन्ही कार्यरत होते. सकाळी साडेनऊच्या सुमारास तळमजल्यावरील किचनमधून आगीचा भडका उडाला आणि काही क्षणातच धुराचे लोट वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचले. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, तेव्हा हॉटेलमध्ये अनेक परदेशी पर्यटक आणि रुग्णालयात उपचारासाठी आलेले लोक थांबलेले होते. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. समोर मृत्यू दिसत असल्याने अनेकांनी इमारतीच्या खिडक्यांतून खाली उड्या मारल्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून आपापल्या घरातील गाद्या रस्त्यावर अंथरल्या, जेणेकरून उड्या मारणाऱ्यांचे प्राण वाचू शकतील; मात्र उंचावरून पडल्याने अनेक पर्यटकांचे हात-पाय मोडले आहेत.

अधिक वाचा  प्रतीक्षा संपली: कोरोना रुग्णांना संजीवनी ठरणारे ‘टू डी-ऑक्सी डी ग्लुकोज‘औषधाचे (2-deoxy-D-glucose drug) पुढच्या आठवड्यात होणार लॉंचिंग

या दुर्घटनेत धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला आहे. हॉटेलच्या तळमजल्यावरील प्रवेशद्वाराला बाहेरून कुलूप लावलेले असल्याने अनेक लोक आतच अडकून पडले होते. अग्निशमन दलाला सकाळी ९:४५ च्या सुमारास पहिला फोन आला, त्यानंतर जवानांनी घटनास्थळी धाव घेत कुलूप तोडून बचावकार्य सुरू केले. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर ३७ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये सुरुवातीला हा आकडा १० होता, तो दुपारपर्यंत २१ वर पोहोचला.

या घटनेमुळे दिल्लीतील नागरी सुविधा आणि इमारतींच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तपासादरम्यान असे समोर आले की, या हॉटेलला केवळ ६ खोल्यांची परवानगी असताना तिथे २० खोल्या बनवण्यात आल्या होत्या. हे हॉटेल ‘बीएनबी’ (B&B) लायसन्सवर चालवले जात होते आणि इमारतीमध्ये विजेच्या तारांचे जाळे अतिशय असुरक्षित पद्धतीने पसरलेले होते. दाटीवाटीचा परिसर आणि अनियमित बांधकाम यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे आले.

अधिक वाचा  विजय हाताशी असताना माघार का ? जनतेच्या मनात प्रश्नांचा डोंगर!

पंतप्रधान कार्यालयाने (PMO) या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची, तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, कुलिंग ऑपरेशन आणि रेस्क्यू ऑपरेशनचे काम पूर्ण झाले आहे. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दल या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love