Don't judge my age; I will not stop - Sharad Pawar

मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्याचा कदाचित परिणाम म्हणून हे सगळं घडत असावं

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे— पंतप्रधान मोदींची धोरणं पसंत आहेत, तर मग गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याविरोधात का लढाई लढली गेली? त्याआधी निवडणुकीच आमचं लक्ष्य मोदी होते. मोदींचं लक्ष्य आम्ही होतो. आता चार वर्षं काम केल्यानंतर आज अचानक असं काय परिवर्तन झालं? असं काहीही नाही. त्यांना तिकडे जायचं होतं, त्यांना सत्तेची गरज होती. मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्याचा परिणाम म्हणून कदाचित हे सगळं घडत असावं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार (sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडावर व्यक्त केली. ( Sharad Pawar| Maharashtra Political Crisis)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (shinde -Fadanvis Govt.) उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, जे पक्षातून गेले ते विधानसभेचे सदस्य आहेत. ज्यांना ईडी’चे (ED) प्रॉब्लेम आहेत तेच गेले आहेत. ईडीच्या चौकशीमुळे आमच्यातील काही आमदार अस्वस्थ होते. यात छगन भूजबळ, (chagan Bhujbal) अजित पवार, हसन मुश्रीफ,(Hasan Mushrif) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची नावं आहेत. या सगळ्यांवर केलेल्या कारवायांमधून त्यांना कधी क्लीनचिट मिळतेय आणि या सगळ्यातलं नेमकं काय अंडरस्टँडिंग होतं, हे लोकांसमोर येईल याची मी वाट बघतो आहे असे पवार म्हणाले. मुंबईत गेलेल्या काही लोकांनी मला फोन केला आणि आम्हाला इथे बोलवून आमच्या सह्या घेतल्या, पण आमची भूमिका वेगळी आहे दोन-तीन दिवसांत भेटून भूमिका सांगू असे सांगितल्याचे पवार म्हणाले. ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली, त्या सर्व नऊ जणांबाबत निर्णय घेणार असल्याचही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

जे कोणी गेले त्यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. जे गेले त्यांच्यातलेच काही लोक संपर्क साधतायत. त्यांना दोन गोष्टींची चिंता आहे. एक तर मतदारसंघ आणि दुसरं पक्षांतर्गत कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी असलेले व्यक्तिगत संबंध. सत्तेचा काही लाभ त्यांना होईल, चारदोन कामं होतील, निवडणुकीसाठीच्या सहाय्याबाबत हे चिंतामुक्त झाले असतील. पण, या सगळ्या गोष्टी १०० टक्के यश देतात असं नव्हे. शेवटी लोक ठरवतात, लोकांचा पाठिंबा आवश्यक असतो. ती चिंता यातल्या अनेकांना असावी, म्हणून ते आमच्याशी संपर्क साधत आहेत असेही त्यांनी नमूद केले.

बंडखोरीबाबतचं अधिक स्पष्ट चित्र माझ्या इतकेच जनतेच्या समोर मांडण्याची आवश्यकता आहे. बंडखोर आमदारांनी जर त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली तर त्याबद्दल माझा विश्वास बसेल. त्यांनी तशी भूमिका मांडली नाही, तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन, असे ते म्हणाले.

हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही

पक्षात पडलेल्या फुटी नंतर पक्षाच्या भवितव्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, आजचा प्रकार हा इतरांना नवीन असेल. मला हा नवीन नाही. १९८० मध्ये निवडणुकीच्या नंतर मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो त्याचे ५८ आमदार निवडून आले होते. एक महिन्यानंतर सहा सोडले तर बाकी सगळे सोडून गेले होते. सगळे पक्ष सोडून गेले, मी विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी पाच लोकांचा नेता झालो. पाच लोकांना बरोबर घेऊन मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी केली. त्यानंतर जी निवडणूक झाली त्यात आमची संख्या ६९ वर गेली होती. त्यावेळी जे पक्ष सोडून गेले त्यापैकी पुढच्या निवडणुकीत ४ जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले. १९८० ला जे चित्र दिसलं तेच जनतेच्या पाठिंब्यावर कसं उभं करता येईल हे मी पाहतो आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे असंही शरद पवार म्हणाले.

त्याबद्दल पंतप्रधान  मोदींचे आभार

दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे असे म्हणाले होते. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याचबरोबर सिंचनासंदर्भात जी तक्रार होती त्याचा उल्लेख केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सहभागी आहे असा उल्लेख केला होता. मात्र,  मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातल्या काही सदस्यांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे काही सत्य नव्हते. त्यांनी केलेल्या आरोपांमधून सगळ्यांना मुक्त केलं त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो.

अन्यथा मला कारवाई करावी लागेल

काही दिवसांपूर्वी काही पदाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. काहींवर जबाबदारी टाकली आहे. उदाहरणार्थ जनरल सेक्रेटरी म्हणून सुनील तटकरे(Sunil Tatkare) तर कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल (Prfull Patel) यांची नियुक्ती केली आहे. माझं त्यांना स्वच्छ सांगणं आहे, या सगळ्या प्रकारात पक्षाच्या हिताच्या दृष्टीकोनातून जी पावलं त्यांनी टाकायला हवी होती ती त्यांनी टाकलेली नाही. त्यामुळे आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा त्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यासाठी उचित अशी कारवाई त्यांनी येवून करावी किंवा मला कारवाई करावी लागेल”, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर “जे पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाईल त्या प्रत्येकाच्या संबंधिचा निकाल घ्यावा लागेल. ९ लोकांचाही निकाल घ्यावा लागेल”, असं पवार यांनी स्पष्ट केले.

पक्षाच्या धोरणाशी विसंगत पावलं कुणी टाकली असली तर ती पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही त्यासाठी पक्षाचे प्रमुख लोकं बसतील आणि त्यासंदर्भात योग्य निर्णय घेतील. फक्त एकच आहे, हा निकाल एकटा व्यक्ती घेणं योग्य नाही. त्यामुळे बाकीचे सहकारी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, इतर सगळ्यांशी आम्हाला बोलणं करावी लागेल, असं शरद पवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही

राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही, याची मला खात्री आहे. मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढवली तेव्हा चिन्ह होतं बैलजोडी, त्यानंतर काँग्रेस फुटल्यावर आमची खूण होती चरखा. त्यानंतर गाय वासरु हे चिन्ह होतं. चार चिन्ह घेऊन माझ्याच आयुष्यात मी निवडणुका लढलो. समोरचा माणूस कोण आहे हे लोक बघतात, त्याचं काम काय आहे ते पाहतात असे पवार म्हणाले.

अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मला आत्ताच कळतेय. त्यावर मी भाष्य करणार नाही. पक्षाबद्दल कोणी काहीही दावा करो. माझा लोकांवर विश्वास आहे. आम्ही लोकांसमोर भूमिका मांडू. माझी खात्री आहे, त्यांचा पाठिंबा मिळेल.

माझा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांवर प्रखर विश्वास आहे. आमची खरी शक्ती सामान्य माणूस आणि कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते सगळे अस्वस्थ झाले असतील हे खरं आहे. कारण जे कष्ट करतात, आम्हाला लोकांना निवडून देतात, आम्ही सांगतो ती भूमिका मांडतात आणि काही लोक विरोधी संघर्षाची भूमिका घेतात, असं शरद पवार म्हणाले.

“ज्यांची संघर्षाची आणि विरोधाची भूमिका घेतली आज त्यांच्यामध्येच आम्ही सहभागी झालो तर कार्यकर्ते अस्वस्थ होणार. यामध्ये त्यांचा दोष नाही. पण त्यांची अस्वस्थता काढायची असेल तर पुन्हा संघटनेची बांधणी करायचं काम करावं लागेल. हे काम मी आणि संघटनेचे असंख्य तरुण माझ्याबरोबर करतील याची मला पूर्ण खात्री आहे”, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

जनतेकडे जाऊन पाठिंबा मिळवणार

अशा गोष्टी घडल्या की मला अधिक हुरूप येतो. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. कराडला जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समधीचं दर्शन घेऊन दलित समाजाचा पहिला मेळावा घेणार आहे. राज्यात आणि देशात जितकं जाता येईल, तितकं जाईन. आम्ही न्यायालयात नाही तर जनतेकडे जाऊन पाठिंबा मिळवणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. आता टार्गेट एकच पक्षबांधणी. आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची नवीन टीम दिसेल. मला महाराष्ट्रातून फोन येतायत. लोक पाठिंबा देतायत. ममता बॅनर्जी, खर्गे यांचा फोन आला. जे काही घडलं त्याची मला चिंता नाही. माझा महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेवर, विशेषत: तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे. २०१९ लाही असंच झालं होतं. पण आमचे चांगले आमदार निवडून आले असे त्यांनी सांगितले.

पक्षाचा आश्वासक चेहरा कोण?

तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न शरद पवारांनी विचारला असता शरद पवारांनी हात उंचावून ‘शरद पवार’ असं उत्तर दिलं आहे. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शपथ घेतलेल्या ९ जणांपैकी छगन भुजबळ यांचा संपर्क झाला होता. तिथे जातो आणि काय चाललंय ते तुम्हाला सांगतो, जे काही चाललंय ते चांगलं नाही. असे ते म्हणाले होते पण त्यांनीच शपथ घेतल्याचं आम्हाला कळवलं असे पवार यांनी सांगताच हशा पिकला.

एकनाथ शिंदे आणि भाजपावाल्यांनी त्यांच्या उपयोगितेचा विचार करावा. शपथविधीचा कार्यक्रम मी पाहिला. त्यात आत्ता मंत्रीपदावर जे आहेत किंवा जे होऊ इच्छितात त्यांचे चेहरे मला चिंताजनक दिसत होते.

News Title | Sharad Pawar | Maharashtra Political Crisis |

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *