पुणे -समाजात संघाबद्दल एक मोठी स्पष्टता निर्माण झाली आहे. संघाला जवळून आणि संघाच्या दृष्टीकोनातून समजून घ्यायला हवे. आपल्या भारताला जगात एक सर्वश्रेष्ठ देश बनवणे. जो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्षम असेल आणि जगाला एक नवी वाट, मार्ग आणि दृष्टी देण्यास समर्थ असेल. अशा राष्ट्रनिर्मितीचे काम संघाने हाती घेतले आहे. आपणही त्यात योगदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कसबा भाग प्रचार विभागाच्या वतीने आयोजित ‘संघ शताब्दी मंथन’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, कार्यवाह राहुल पुंडे यावेळी उपस्थित होते.
संघाची शाखा हे केवळ व्यायामाचे ठिकाण नाही, तर ते संस्कारांचे केंद्र आहे.शाखेमध्ये येणारा स्वयंसेवक हा केवळ शारीरिकदृष्ट्या सुदृढ होत नाही, तर त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण केली जाते. आज स्वयंसेवक शिक्षण, आरोग्य, सेवा आणि ग्रामविकास अशा विविध क्षेत्रांत सक्रिय आहेत.वनवासी कल्याण आश्रम, विद्या भारती, आणि सेवा भारती यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून समाजात मोठे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व करत असताना स्वयंसेवकाचा भाव हा ‘स्वार्थाचा’ नसून ‘परमार्थाचा’ असतो.असेही ठाकूर यांनी सांगितले.
स्वयंसेवक म्हणजे समाजातील दु:ख दूर करण्यासाठी नेहमी तत्पर असणारी व्यक्ती.जेव्हा आपत्ती येते, भूकंप असो किंवा महापूर, संघाचा स्वयंसेवक कोणाचीही वाट न पाहता मदतीसाठी धावून जातो. ही सेवा करताना तो समोरच्याची जात, धर्म किंवा पंथ पाहत नाही; तो केवळ ‘माणूस’ म्हणून मदत करतो.संघाचे कार्य हे केवळ हिंदू समाजाला संघटित करणे एवढेच मर्यादित नाही, तर या संघटित शक्तीचा उपयोग करून राष्ट्राला परमवैभवाप्रत नेणे आहे. आपण सर्वांनी या पवित्र यज्ञातील समिधा व्हावे असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिमंतिनी वझे यांनी संघाची पंच परिवर्तन संकल्पना मांडली.समर्थ जोशी यांनी प्रास्ताविक केले. अमोघ वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.
















