भारतीय संगीत क्षेत्रातील एक तेजस्वी तारा, ज्याने सात दशकांहून अधिक काळ आपल्या सुरांनी जगाला मंत्रमुग्ध केले, त्या आशा भोसले आज आपल्यात नाहीत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या गायकीची मोहोर उमटवणाऱ्या आशाताईंच्या निधनाने केवळ मंगेशकर कुटुंबच नाही, तर संपूर्ण कलाविश्व पोरके झाले आहे. मात्र, ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांना आनंद दिला, त्या आवाजाच्या मालकिणीने पडद्यामागे सोसलेल्या वेदना आणि केलेला संघर्ष कोणत्याही चित्रपटाला लाजवेल असाच होता.
…………. एक विशेष शब्दांजली
लहानपणीच पडली संसाराची धुरा
अल्पवयात खांद्यावर पडलेली संसाराची धुरा आशाताईंचा जीवनप्रवास संघर्षानेच सुरू झाला. १९४३ मध्ये वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर, मंगेशकर कुटुंबावर मोठे संकट कोसळले. कुटुंबाला आधार देण्यासाठी आशाताईंनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी प्रथमच मायक्रोफोन हाती धरला. सुरुवातीच्या काळात थोरली बहीण लता मंगेशकर यांच्या अफाट लोकप्रियतेच्या सावलीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान होते.
सासरच्या ‘नरक यातना’ आणि संघर्षाचा काळ
वयाच्या १६ व्या वर्षी घेतलेला तो धाडसी निर्णय आणि ‘नरक यातना’ आशाताईंच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण वयाच्या १६ व्या वर्षी आले. त्यांनी लता दीदींचे सचिव असलेल्या गणपतराव भोसले यांच्याशी प्रेमविवाह केला. गणपतराव त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. या विवाहासाठी त्यांनी घराचा उंबरठा ओलांडला, ज्यामुळे मंगेशकर कुटुंबात मोठा दुरावा निर्माण झाला. मात्र, ज्या सुखी संसाराचे स्वप्न त्यांनी पाहिले होते, तिथे त्यांच्या नशिबी ‘नरक यातना’ आल्या. पतीला असलेले दारूचे व्यसन आणि सततची मारहाण यामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. धक्कादायक वास्तव म्हणजे, त्या गर्भवती असतानाही त्यांना शारीरिक छळाला सामोरे जावे लागले आणि तिसऱ्या मुलाच्या वेळी त्यांना सासरच्यांनी घराबाहेर काढले. या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, परंतु केवळ मुलांच्या ओढीने त्या पुन्हा जिद्दीने उभ्या राहिल्या.
व्यावसायिक स्पर्धा आणि यश
गाण्याच्या क्षेत्रात लता दीदी आणि आशाताई यांच्यात नेहमीच निरोगी स्पर्धा राहिली. अनेकदा लता दीदींनी ‘अश्लील’ किंवा ‘कठीण’ म्हणून नाकारलेली गाणी आशाताईंच्या वाट्याला आली आणि त्यांनी त्या गाण्यांचे सोने केले. ‘हम दोनो’ चित्रपटातील ‘अभि ना जाओ छोडकर’ हे गाणे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. लता दीदींनी नाकारलेले हे गाणे आशाताईंनी इतक्या नजाकतीने गायले की ते अजरामर झाले. पुढे आर.डी. बर्मन यांच्याशी झालेला विवाह आणि त्यांनी निर्माण केलेली सांगीतिक जोडी भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ ठरली.
अपत्यवियोगाचे अतीव दुःख
वैयक्तिक दुःखांचे डोंगर आशाताईंचे आयुष्य केवळ यशाने भरलेले नव्हते, तर त्यात दुःखाचे अनेक डोंगरही होते. २०१२ मध्ये कन्या वर्षा भोसले हिची आत्महत्या आणि त्यानंतर मोठा मुलगा हेमंत याचा कर्करोगामुळे झालेला मृत्यू, हे धक्के पचवणे त्यांच्यासाठी अतिशय कठीण होते. आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्या दोन तरुण मुलांना गमावण्याचे दुःख उराशी बाळगूनही त्या कलेशी एकनिष्ठ राहिल्या.
एक अजरामर वारसा २० हून अधिक भाषांमध्ये आणि १२ हजारांहून अधिक गाणी गाऊन आशाताईंनी संगीताचा एक असा अढळ डोंगर उभा केला आहे, जो कधीही हलवता येणार नाही. ‘पिया तू अबतो आजा’ मधील मादकता असो किंवा ‘दिल चीज क्या है’ मधील वेदना, त्यांनी प्रत्येक भाव आपल्या सुरातून जिवंत केला. एक स्त्री म्हणून सोसलेला अन्याय आणि एक कलाकार म्हणून गाठलेले शिखर, हा त्यांचा प्रवास पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीताचा एक ‘सुवर्ण काळ’ खऱ्या अर्थाने संपला आहे.















