पुणे- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या पुढच्या फेजमध्ये पुण्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ही मोठी चिंतेची बाब आहे. यावर तोडगा म्हणून ‘फार्मपाल’ या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कंपनीने भाजीपाला व फळे यांनी ही गरज व मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक साठ्याची व पुरवठ्याची सशक्त यंत्रणा सज्ज केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या बिकट काळात जीवनावश्यक भाजीपाल्याची वाढती मागणी पूर्ण करण्यास ते सज्ज आहेत व पुणेकरांच्या मदतीसाठी ते पुढे आले आहेत.
कोविड-१९च्य काळात कर्मचाऱ्यांची स्वच्छता, सुरक्षा आणि भाजीपाल्याचा दर्जा याविषयी विशेष काळजी घेत ‘फार्मपाल’ कार्य करते. त्यामुळे आरोग्याबरोबर दर्ज्याची काळजी घेतल्याने त्यांना रोजच्या उत्पन्नाची चिंता सतावत नाही. याशिवाय लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या तसेच व्यवसायावर त्याचा दुष्परिणाम झालेला आहे. त्यामुळे त्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून ‘फार्मपाल’ने बी२बी२सी (B2B2C) हे नवे मॉडेल प्रायोगिक तत्वावर विकसित केले आहे.
हे मॉडेल शेतकरी, ग्राहक व पर्यायी उत्पन्न मिळवू पाहणाऱ्या नवव्यावसायिकांसाठी देखील उपयुक्त आहे. यात नवव्यावसायिक अंदाजे १० ते १५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतात. याद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत विनात्रास भाजीपाल्याचा पुरवठा करणे शक्य होईल असे ‘फार्मपाल’चे संचालक करण होन यांनी सांगितले. ‘फार्मपाल’चे संचालक होन व पुनीत सेठी यांनी ग्राहक व शेतकरी यांच्यातील दलालांना दूर करत तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी व ग्राहकांचा थेट संबंध जोडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक दर्जा उंचावण्यास मदत झाली असल्याचेही होन यांनी सांगितले.
सेठी म्हणाले, “शेतकऱ्यांना माल पोहोचविण्यास व ग्राहकांना खरेदी करण्यास सोपे होईल असे एक ठिकाण आम्ही ठरवतो. जेणे कारून ताजा माल ग्राहकाला पुरविणे सोपे होते. अचानक वाढलेल्या मागणीत घाऊक व्यापाऱ्यांनाही पुरवठा करणे कठीण होते. मात्र आमच्या मागील काही वर्षांतील शेतकऱ्यांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे मागणीनुसार मोठ्याप्रमाणात मालाचा आम्ही पुरवठा करू शकतो. सध्याच्या या अनिश्चिततेच्या काळातही आम्ही चांगले मनुष्यबळ टिकवून मागणी व पुरवठ्यातील कमी जास्त होणारी लवचिकता लक्षात घेत उत्तम व्यवस्थापन करू शकलो. आधीच्या अनुभवांवरून धडे घेत या बिकट काळात आंतरिक व बाह्य दोन्ही प्रकारच्या भागीदारांना आम्ही विनात्रास सेवा पुरवू शकतो याची खात्री आहे.”
‘फार्मपाल’ ही संस्था शेतकरी व ग्राहक यांना तंत्रज्ञानाने थेट जोडण्याचे काम करते. होन व सेठी यांनी संस्थेची स्थापना हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन केली. यातील ४०० शेतकरी सुरुवातीलाच त्यांच्या मदतीने आपला माल विकू लागले. करन होन यांना माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील २० वर्षाहून अधिक जागतिक स्तराचा अनुभव आहे तर पुनीत सेठी यांना विपणन, विक्री व व्यवसाय वृद्धी याचा ११ वर्षाहून अधिक अनुभव आहे. अशा या दोन अनुभवी व्यक्तींनी आपल्या अनुभवाचा फायदा शेतकऱ्याला व्हावा या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली आहे.