विश्‍व मानव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : विश्‍वधर्मी प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांचे विठ्ठल रामजी शिंदे यांना अभिवादन

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- माईर्स एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांना ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी ‘विश्‍वधर्म उपासक, वंचित, दलित वर्गाचे उध्दारक, कर्मयोगी महर्षी डॉ. वि. रा. शिंदे’ हा हिंदी ग्रंथ समर्पित केला. महर्षी डॉ. विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर वंचित आणि उपेक्षितांसाठी कार्य केले. त्यांच्यासाठी शैक्षणिक संस्था काढल्या आणि त्यांनाच समर्पित केल्या.

विश्‍वधर्मी प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विश्‍वधर्म आंदोलनातील महान कार्याबद्दल अभिवादन करून त्यांना आपल्या सर्व संस्थाच्या वतीने गौरवांजली वाहिली.

विश्‍व मानव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

महर्षि शिंदे यांच्या कार्यांकडे दृष्टिक्षेप टाकला तर त्यांनी नेहमी समाजातील शेवटच्या माणसाची काळजी वाहिलेली दिसून येते. त्यांचे समकालीन सुधारक उच्च वर्गीयांच्या सुधारणेसाठी सर्वस्व पणाला लावून हिमालयाएवढ्या कर्तृत्वाचे धनी बनले असतील पण जन्मोजन्मी धिक्कारलेल्या लाथाडलेल्या बहिष्कृत माणसासाठी आकाशाचे अंतःकरण ठेवून त्यांच्यावर प्रेमवृष्टी करण्याचे कार्य महात्मा फुल्यांनंतर कर्मवीरांनीच केले. महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक, आगरकर ही सारी हिमालयाची उत्तुंग शिखरे आहेत. स्वराज्य, राष्ट्र, देशभक्ती या कल्पना महान असतील देश पण ज्यांच्या जीवनात जगण्यासाठी हात पसरण्याची अन्नासाठी धर्म बदलण्याची पाण्यासाठी आसवे गाळण्याची पाळी येते त्यांसमोर हे शब्द म्हणजे केवळ अर्थहीन ‘शब्द बापुडे केवळ वाराच!’

कृतार्थ जीवन!

मराठी मातीला मानवतेची मोठीच भूक! समतेच्या वर्षावासाठी ती नेहमीच आसुसलेली! तिला नेहमी हवी असतात क्रांतीची बीजे मग हा वर्षाव कवी संतवाणीच्या करूणेचा असो – प्रखर सत्य शोधकांच्या वैचारिक विद्युत आघाताचा असो किंवा कर्मवीरांच्या अविरत घामाच्या धारांचा असो, दुष्काळ हा तर नेहमीचा पाहुणा, दारिद्र्याने तर कायमची मिठी मारलेली पण मराठी मातीची विलक्षण किमया महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या कृतार्थ जीवनाची समर्पित यात्रा इथेच सुरू केली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनात संत पुरुषाच्या सहवासाचा प्रभाव अगदी लहानपणापासून पडला होता. तारुण्याच्या उंबरठ्यावर उपभोगाची कारंजी उडवण्याच्या वयात त्यांच्या खडतर जीवना अनुभवातून विश्‍वधर्माची ओढ लागली. सर्व भेदभावातून अभेद पहावा म्हणून उदारमतवादी विचाराने त्यांना झपाटून टाकले. महर्षी शिंदे यांच्या जीवनाची वैचारिक बैठक होती – सर्व समावेशक विशाल – विश्‍वधर्माची! ब्राह्म समाज हे केवळ प्रगटीकरणाचे निमित्त मात्र साधन होते. त्यांच्या मनातील विश्‍वमानव आपल्या विराट अनुभवाच्या अभिव्यक्तीसाठी ब्राह्मधर्माचे व्यासपीठ पवित्र करीत होता. तरुण वयात त्यांची उपासना चाले त्यांनी आपल्या जीवन संघर्षात हे विशाल मन नेहमी स्थिर ठेवले. आपल्या मनोविकासाचे वर्णन करीत असताना कर्मवीर शिंदे यांनी लिहिले, मी ब्राह्म समाजात गेल्याने सुधारक झालो असे नाही तर मी सुधारक होतो म्हणून ब्राह्म समाजात गेलो माझ्या उदार ध्येयामुळे मी मनामध्ये जी वेळोवेळी मानवी आयुष्याची चित्रे रेखाटली तिला तंतोतंत जुळेल अशी ब्राह्म समाजाची ठेवण मला दिसली. त्यामुळे मी एकदम ब्राह्मसमाजात (मुंबई प्रार्थना समाजात शिरलो) एवढेच नव्हे तर लवकरच त्यांच्याशी मी इतका तादात्म्य पावलो की स्वतःला पूर्णत वाहून घेऊन त्याचे प्रचार कार्य हीच तळमळ मला लागली.

सहकारी!  कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी लोकमान्य टिळकांविषयी एक आठवण दिली आहे.  अस्पृश्यता निवारण परिषदेत लोकमान्य टिळकांनी भावना उचंबळून टाकणारे भाषण केले. “अस्पृश्यता ही देवाला मान्य असेल तर मला तो देव मान्य नाही.“ लोकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला…  दुसर्‍या दिवशी विठ्ठल रामजींनी “मी माझ्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही” अशा आशयाचे पत्रक तयार केले. परिषदेतील सर्व नेत्यांच्या सह्या घेऊन ते प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार होता- ते सरदार गृहात गेले. टिळकांना पत्रक दाखवले आणि सही करण्याची विनंती केली. टिळक विठ्ठलरावांना बाजूला घेऊन गेले आणि त्यांनी सही केली नाही.  “शिंदे मला आताच याच्यावर सही करता येणार नाही… मला माझ्या सहकार्‍यांना विचारावे लागेल..!” 

आंतरिक जाणीव

कर्मवीरांच्या वरील विधानातून त्यांच्या जीवनध्येयाचे सारसर्वस्व प्रकट झाले आहे. सुधारकाकडे पाहण्याच्या आपल्या सर्व सामान्य दृष्टीकोण किंवा अपघाताने आपद्धर्म म्हणून झालेले सुधारक यांत फार मोठे अंतर होते. अनेक महायोद्धयकांचा जीवनात सुधारणेचे अपघात झाले. नव्हे कधीकधी त्यांना परिस्थितीने खेचून त्यात भाग घ्यायला लावला. लोकसंग्रहाची काळजी वहात अनुयायांची मर्जी सांभाळीत मुत्सद्देगिरीने राजकारण करणे वेगळे आणि एखाद्या प्रश्‍नासाठी सर्वस्व पणाला लावून त्याचा पाठपुरावा करणे वेगळे. कर्मवीरांनी चौकटी पाहून जीवनाचे चित्र कापले नाही किंवा बदलले नाही तर आपल्या विराट जीवन चित्राला अनुकूल अशी तरल सीमारेषा पाहिली, नव्हे त्यांनी आपल्या कार्यासाठी ज्या ज्या संस्था निवडल्या. त्या त्यांच्या जीवन चित्राला सौंदर्याकित करीत होत्या. परिस्थितीने मनस्थिती बदलाची वाट पहाण्यापक्षा विशाल मनस्थितीतून विषम परिस्थिती प्रेरणा होणे हे अत्यंत मूलगामी आहे म्हणून कर्मवीर शिंदे यांच्या जीवनातील निराशा, उदासीनता, अपयशदेखील महान आहे. निखार्‍यात फुले मानून बाजी मारण्याचा वेडेपणा नसून निखार्‍यांना निखारे मानूनच त्यांचा स्वीकार करून त्यांच्या परिणामाची जाणीव असूनही त्यांना कवटाळण्याचा निर्भय निर्धार त्यांनी दाखवला. त्या अर्थाने महर्षी खरे धार्मिक असण्याचा एकमेव निकष म्हणजे अहंकार विसर्जन अण्णासाहेबांनी सांगितले तसे पाहिले तर मी धर्माचा स्वीकार केला असे नसून धर्मानेच माझा स्वीकार केला जीवनातील अत्यंत संपन्न आणि प्रसन्न अनुभूती माझे मीपण संपल्यावरच येते. कवी कलावंत आणि कर्मवीर जेव्हा माझे मीपण ओलांडून पुढे जातात मग ती अनुमूर्ति त्यांची नसते, ती असते विश्‍वात्म्याची. या समग्र अस्तित्वाची!

लौकिकार्थाने कर्मवीर शिंदे उपेक्षित वाटतील कारण त्यांच्या जीवनाशी महायात्रा सागरातून सरोवराकडे अशी झाली म्हणून उपेक्षा ही अपेक्षितच आहे, कबीराच्या भाषेत सांगायचे झाले तर, ‘हेरत हेरत हे सखी सब कुछ रह्या हे खाई समुंद समाना मुंदमे अव कुछ कहा न जाई’ कर्मवीरांच्या जीवनात अगदी लहानपणापासूनच समतेची आणि ममतेची शिकवण मिळाली होती. अत्यंत धीरोन पोटाची भूक सारून पोटच्या पोरासाठी वाटेल ते करणारी प्रेमळ माता आणि दिलदार वृत्तीचे धर्मभोळे पिता यांचे संस्कार त्यांच्या अंतकरणावर कायमचे बिंबले होते. त्याचबरोबर त्यांची दुर्दैवी भगिनी जनाक्का यांची सावली सारखी सोबत लाभली होती. आपल्या मातापित्यांनी दिलेल्या सहकार्याची त्यांची त्यांनी अत्यंत कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवली आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर हे वर्म तर त्यांच्या आईच्या स्वभावात श्‍वासोच्छासातप्रमाणे सहज मिळाले होते.

तरुण वयातच त्यांना ब्राह्म समाजाच्या वतीने विलायतेतून शिक्षण घेण्याचा योग आला. ते शिक्षणदेखील त्यांनी अत्यंत निष्ठेने आणि डोळसपणाने घेतले. १९०१-१९०३ त्यांनी युरोपातील समाज जीवनाचे निरीक्षण केले. एकांतवासात आत्मशोध घेतला. कुठेही जा माणूस हा सारखाच प्रेमाने वेडावलेला किंवा घृणेने बरबटलेला! युरोपचा किनारा सोडताना पाश्‍चात्त संस्कृतीचा घमेंडखोरपणाचा त्यांना वीट आला होता. साहेबांचे ते सगळे चांगले म्हणून पाश्‍चात्यापेक्षाही अधिक साहेबी वागणारे. पप्पा, मम्मी, डॅडी होतील अशी त्यांना कल्पना नसेल! पण त्यांची परस्पर वागण्याची पद्धत मात्र आण्णासाहेबांनी जोखली आहे. कारणांशिवाय सलगी न दाखवणे न बोलावता खोलीत पाय न टाकणे, परवानगीशिवाय न जाणे यामुळे त्यांना इंग्रजांविषयी आदर वाटत असे. तेथून आल्यावर आण्णासाहेबांना प्रार्थना समाजाचे प्रचारक नेमण्यात आले. हिंदू ख्रिस्ती, इस्लाम आणि बौद्ध या पद्धतीचा समन्वय हा ब्राह्मासमाजाचा प्रयत्न होता. अत्यंत हीन, परस्पर विरोधी आणि एकमेकांना नष्ट करण्यासाठी अवतरलेल्या पद्धतीत समन्वय करणे हे महाकठीण कार्य आहे. इस्लामची लोकसत्ता ऊशोलीरींळल ख्रिश्‍चनांची पितृवात्सल्याची मेंढपालाची (रिीीींर्ळींरश्र) हिंदू प्रचार पद्धतीत भिन्न जाती वर्ग प्रांत विभागलेली राजकारणी िेश्रळींळलरश्र तर बौद्धांची निसंशय उदासीन वृत्तीची खीशरीांशपीं अशी आहे, पण यातून कुठेतरी मानवी प्रेमास एकात्मतेचा प्रार्थनेचा सद्भावनांचा धागा पकडून आत्मघाती जगास कुणीतरी आशेचा किरण दाखवायला हवाच. म्हणून युरोपातील युनिटेहियन – संप्रदाय – भारतातील ब्राह्मसमाज – थिअँसोफी – इ. आंदोलनाचा उगम झाला. कर्मवीरांनी त्या निमित्ताने भारतभर प्रवास केला. बंगलोरपासून बंगाल सर्वत्र संचार केला. व्याख्याने दिली. निरीक्षण केले. लोकजीवनाचा अनुभव घेतला. अपमानाचे चटके सहन केले. सन्मानाचे स्वागत सोहळे स्वीकारले.

असे ठरले कुरुक्षेत्र

पौर्णिमेच्या उज्ज्वल चांदण्यात भगवान बुद्धांसारख्या महापुरुषांना बोध झाला. पण अवसेच्या काळोख्या रात्री कर्मवीरांना जीवनध्येयाचा शोध लागला. पौर्णिमेच्या प्रेममयी प्रकाश सर्वत्र पसरावा म्हणून बुद्धाने निरंतर परिभ्रमण केले. तरी अस्पृश्य अत्यंत अज्ञानी यांच्या जीवनातील अमावस्या नष्ट व्हावी म्हणून कर्मवीरांनी मशाल पेटवली. महात्मा जोती फुल्यांनीही अग्निज्वाला पेटवली होती. अत्यंत दाह झाला होता त्या प्रखर ज्वालेचा. त्यातून पेटवली मशाल कर्मवीरांनी आपली मधील गोष्ट.

अहमदनगर येथे उन्हाळ्यातील दिवस. रात्री बारा वाजता अस्पृश्य दलित वर्गाचे शिष्ट मंडळ भेटायला आले. नगरपासून चार मैल दूर जायचे होते. त्यांच्याबरोबर स्वामी आत्मानंद होते. अण्णासाहेब भिंगारला आले. मोठे हिल्लाळ पेटलेले होते, लहान-थोर बायका-मुले, गजबजलेली सभा वाट पहात बसली होती. टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्वागत. खेडेगावातल्या मागासलेल्या समाजाचा एवढा जमाव जमलेला पाहून स्वामींना आश्‍चर्य वाटले. ही सभा अशी अवेळी का बोलविली स्वामींनी चालकांना विचारले. साहेब आम्ही गरीब लोक. दिवसभर कष्टात राबावे लागले. तशांत आम्ही सर्व चालक मंडळी शेजारच्या जिल्ह्याच्या गावच्या परकीय साहेबांच्या घरगुती कामात गुंतलेलो. आम्हाला या वेळेपूर्वी हे काम करण्यास वेळ मिळत नाही. आपल्याला तसदी दिली याची माफी असावी. त्या अमावसेच्या काळोख्या रात्री या विश्‍वमानवाची करुणा पाझरली. विराट आकाशातून, मातीच्या भावबंधांनी निमंत्रण दिले. लोकांची हजारो वर्षांची कहाणी अभ्यासून त्यांचे मन हळवार झाले होते. कामास सुरुवात झाली. श्री. किसन फागूजी बनसोड आणि वहाड नागपूरकडील अस्पृश्य पुढारी यांनी सोमवंशी हितचिंतन समाज ही संस्था सुरू केली होती. त्यांच्या सूचनेवरून अहमदनगर येथील अस्पृश्यांचे पुढारी श्रीपतराव थोरात पांडुरंग लक्ष्मण डांगळे (हेडमास्तर) रावजी संदोबा गायकवाड यांनी ही सभा बोलावली होती. इतर सर्व कामे टाकून एका घडीचाही वेळ न दवडता ह्या कार्यास लागावे असा संकल्प परमेश्‍वराला स्मरून ह्याच रात्रीच्या मुहूर्तावर केल्याचे मला पक्के आठवले, असे कर्मवीर म्हणतात. १८ ऑक्टोबर १९०६ कार्तिक वर्ष प्रतिपदेच्या शुभदिवशी भारतीय निराधित साह्यकारी मंडळी स्थापना झाली. पहिल्या तीन वर्षांत २२ शाखा, १६ दिवसांच्या प्राथमिक शाळा १०, ८० विद्यार्थी सहा रविवार शाळा ५ भजन समाज, ४ उद्योग शाळा, ८ मशिनरी कार्यवाह आणि एक मासिक निघाले. (कर्मवीरांनी कृतार्थ जीवन यात्रा केली)

प्रा. रतनलाल सोनग्रा
२०१, साराह एनक्लेव्ह,
विमाननगर, पुणे – १४
मोबाईल ९८२२३२८८२२

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *