#Ajit Pawar : अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही : अजित पवार

पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला

Ajit Pawar –विरोधी उमेदवार (संजोग वाघेरे) कदाचित असं सांगेल की अजित दादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. मात्र, असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, असे स्पष्ट करीत  धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीच्या शिवसेनेचे(ऊबाठा) संजोग वाघेरे अशीच लढत आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना होणार आहे. महायुतीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार मावळमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांचे जुने सहकारी संजोग वाघेरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. संजोग वाघेरे  हे एकेकाळी अजित पवारांचे निकटवर्तीय होते. पण आता ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहेत, तर अजित पवार भाजपसोबत महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी बारणेंच्या प्रचारावेळी संजोग वाघेरे यांच्यावर निशाणा साधला.

अधिक वाचा  शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच: बावणकुळेंचा हल्लाबोल

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशातील आजवर झालेल्या पंतप्रधानाच्या काळात घटना दुरुस्ती किती वेळा झाली. मात्र, विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जात आहे त्याला काही अर्थ नाही.

देशाच्या १४० कोटींमध्ये लोकसंख्येमध्ये ७० कोटी महिला आहेत. आता प्रत्येक महिलांच्या खात्यात १ लाख टाकायची गॅरंटी द्या म्हणतात. आता मला सांगा असं केलं तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल. विरोधक बोलायचं म्हणून काहीही बोलत आहेत. ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे, विकासाची वज्रमुठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असल्याचे अजित पवार म्हणाले.

पदाधिकाऱ्यांना तंबी

अजित पवार म्हणाले, विरोधक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करतात. विरोधकांकडून नको ते मुद्दे उचलले जातायेत. त्याला काही अर्थ नाही. विरोधी उमेदवाराला प्रचारादरम्यान भेटायला जाऊ नका. परत म्हणाल दादा फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, महायुतीचा धर्म पाळायला हवा. मैत्री, नातं-गोतं, भावकी-रावकी बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे, अशी तंबी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

अधिक वाचा  #MLA disqualification case: आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेला निर्णय हा घटनेशी सुसंगत नाही- घटनातज्ञ उल्हास बापट

गेल्या लोकसभेत मी निवडून येणार हे ठामपणे सांगितलं होतं – बारणे

गेल्या लोकसभेच्या (२०१९) निवडणुकीमध्ये मी निवडून येणार हे ठामपणे सांगितलं होतं अन् मी खासदार झालो, अशा शब्दात शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी अजित पवारांसमोरच पार्थ पवारांच्या पराभवावर भाष्य केले.

श्रीरंग बारणे यावेळी बोलताना म्हणाले की, अजित पवारांनी मला पहिलं तिकीट दिलं होतं. महापालिकेत त्यांच्यामुळे मी नगरसेवक म्हणून गेलो. कालांतराने मी वेगळ्या युतीत गेलो. आम्ही संपर्कात होतोच, आत्ता ही लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, तेव्हा अजितदादांचा फोन सर्वात आधी आला.

बैठकीवर आरपीआय गटाचा बहिष्कार

दुसरीकडे, मावळ लोकसभेची उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांच्या उपस्थित सुरू झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीवर रामदास आठवलेंच्या आरपीआय गटाने बहिष्कार टाकला. मंचावर स्थान न दिल्यानं बैठकीतून आरपीआय गट बाहेर पडला. सभागृहाबाहेर घोषणाबाजी सुरू झाली, तेव्हाच उदय सामंत त्यांचं भाषण संपवून पुढच्या दौऱ्याला निघाले होते.  आरपीआय गटाने सामंतांना घेराव घातला, आमचे अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांना डावलण्यात आलं असेल तर आम्ही का थांबावं. असा सवाल सामंतांना विचारला असता, नजर चुकीनं घडलं असेल, अशी कबुली सामंतांनी दिली. सामंतांनी आरपीआय गटाची समजूत काढून उमेदवार श्रीरंग बारणेंशी चर्चा घडवून आणली, त्यानंतर कांबळे यांना मंचावर स्थान दिलं. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love