पुणे– अँटिलिया प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
अँटिलिया प्रकरणात एक फेक पासपोर्ट तयार करण्यात आला होता. एका छोट्यामोठ्या गुंडाच्या नावाने हा पासपोर्ट तयार केला गेला. त्यावर पाकिस्तानची एक्झिट आणि एन्ट्री दाखवण्यात आली होती. वाझे आणि परमबीर सिंगने हा फेक पासपोर्ट तयार केला होता. मनसुख हिरेनची हत्या झाली नसती किंवा हिरेन पोलिसांकडे शरण आला असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती. त्या गुंडाचं फेक एन्काऊंटर करण्याचं षडयंत्रं होतं. वाझे आणि सिंग यांचं हे षडयंत्रं होतं. वाझेच्या घरातून हा फेक पासपोर्ट मिळाला आहे. पंचनाम्यात तो पासपोर्ट आहे. एनआयने ही माहिती उघड करावी, असं आवाहन मलिक यांनी केलं.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, राज्य सरकारला दोन वर्ष झाली आहेत. पण या काळात पोलिस अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला तर माजी पोलिस आयुक्त बेपत्ता होतात याबाबत कसे बघता असे विचारले असतं मलिक म्हणाले, हे सर्व पॉलिटिकली मोटिव्हेटेड होतं. अँटेलिया बाहेर बॉम्ब ठेवण्याचं कारस्थान वाझे आणि सिंग यांनी मिळून केलं होतं. सरकारला ब्रिफिंग करत असताना वेगळ्या पद्धतीने ब्रिफिंग दिली गेली. सिंग आणि वाझे हेच सरकारला ब्रिफिंग करत होते. त्यामुळे आम्ही ते अधिवेशनात मांडत होतो. हे दोघेही अधिवेशन सुरू असताना सरकारची दिशाभूल करत होते, असं त्यांनी सांगितलं.
हत्येच्या घटनेनंतरही वाझेंनी सरकारची दिशाभूल केली. सत्य समोर आल्यानंतर सिंग यांची बदली होम गार्डला करण्यात आली. बदली केल्यानंतर सिंग यांनी ईमेल द्वारे तक्रार दाखल केली. नंतर सीबीआय आली. गुन्हा दाखल केला. तेव्हा देशमुखांनी राजनीमा दिला. आता हे प्रकरण कोर्टात आहे. पण हा संपूर्ण विषय पॉलिटिकली मोटिव्हेटेड होता. चांदीवाल कमिशनचं कामकाज सुरू आहे. अहवाल आल्यावर सत्यस्थिती बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
भविष्यात ईडीबाबत देखील मोठा धमाका करणार
दरम्यान, भविष्यात ईडीबाबत देखील मोठा धमाका करणार असल्याचे मलिक म्हणाले. आमचा ईडीच्या बाबतीत शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे. केंद्र सरकार म्हणेल तसे विभाग चालतो आहे. राणेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीचे काय झालेस, हे कुणाला माहितीच नाही. राणे ईडीच्या माध्यमातून भाजपमध्ये गेले. ईडीच्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली. बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा घरवापसी झाली. ईडीच्या यंत्रणेचा गैरवापर होतच असल्याचे नवाब मलिक म्हणाले.