मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अत्यंत भावूक आणि तितकेच निर्धारपूर्ण भाषण केले. “हे पद केवळ एक जबाबदारी नसून, लाखो कार्यकर्त्यांच्या आशा आणि संघर्षाचे प्रतीक आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आदरणीय दादांच्या (अजित पवार) निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असले, तरी त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत पक्षाला पुन्हा सुवर्णकाळ मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
मुंबईच्या अधिवेशनात नावाची घोषणा
मुंबईच्या वरळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेसन 2026 आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनासाठी पक्षाचे सर्व महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते तसेच पक्षाचे इतरही काही नेते आणि पदाधिकार उपस्थित होते. यावेळी अधिवेसनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्वच नेत्यांनी एकमताने सहमती दाखवली. आता राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. पक्षाचे कार्यकारी अध्ययक्ष प्रफुल्ल पटेल हेच असतील. तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे असेल. सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली.
‘दादांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही’
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ३० जून २०२३ रोजी दादांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. केवळ अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि पक्षाची ताकद तिपटीने वाढवली,. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक राज्यांत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दमदार कामगिरी केली. “दादांची जागा कोणीही भरून काढू शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. पण त्यांनी दिलेली जिद्द आणि शिस्त हीच आज राष्ट्रवादीची खरी ताकद आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
पक्षाला पुन्हा ‘राष्ट्रीय’ दर्जा मिळवून देण्याचे उद्दिष्ट
भाषणादरम्यान सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीवर प्रकाश टाकला. राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक परिवार असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात पक्षाला पुन्हा ‘राष्ट्रीय पक्षाचा दर्जा’ मिळवून देण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवले आहे,. ग्रामीण भागात पक्षाची पाळेमुळे घट्ट असली, तरी आता शहरी भागातही जनतेचा विश्वास संपादन करून पक्ष विस्तार करण्यावर त्यांचा भर असेल.
शेतकरी, महिला आणि तंत्रज्ञानावर भर
शेतकरी आणि महिला सक्षमीकरणासाठी दादांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. विशेषतः शेतीमध्ये ए.आय. सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच, महिलांना ‘विकासाचे इंजिन’ संबोधत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि प्रशासनातील सहभाग वाढवण्यासाठी विशेष काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले,.
वैचारिक वारसा आणि पुढील वाटचाल
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर आणि आपल्या सासूबाई शारदाबाई पवार यांचा वैचारिक वारसा आपल्यासोबत असल्याचे सांगितले,. “मी आदरणीय दादांसारख्या वादळासोबत अनेक वर्षे संसार केला आहे, त्यामुळे हे ‘शिवधनुष्य’ पेलणे कठीण असले तरी कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे ते अशक्य नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“उतणार नाही, मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही, असे म्हणत महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि राष्ट्रवादीचा विचार पुढे नेण्यासाठी मी आपली मुलगी, बहीण आणि सोबती म्हणून सदैव तुमच्या पाठीशी उभी राहीन,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना वचन दिले,. लवकरच पक्षाच्या घटनेनुसार सभासद नोंदणी आणि पुढील निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे सांगून त्यांनी भाषणाचा समारोप केला.
















