मेलबर्न: भारताची ऊर्जेची वाढती गरज आणि पर्यावरणाचे रक्षण या दोन्ही आघाड्यांवर आज एक मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यात झालेल्या तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत न्यूक्लियर एनर्जीच्या क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. या ऐतिहासिक करारामुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, भारताच्या ‘क्लीन एनर्जी’ (स्वच्छ ऊर्जा) उद्दिष्टांना यामुळे मोठी ताकद मिळणार आहे. मेलबर्नमधील या भेटीत मोदींनी हा मुद्दा प्रामुख्याने मांडत दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारीला नव्या उंचीवर नेले आहे.
आर्थिक विकासासाठी ‘सीका’ आणि ‘गुंतवणूक करारा’वर भर ऊर्जा क्षेत्रासोबतच आर्थिक संबंधांना गती देण्यासाठी दोन्ही देशांनी कंबर कसली आहे. २०१२ मध्ये झालेल्या व्यापार कराराच्या (ECTA) यशानंतर, आता ‘सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावर’ (CECA) वेगाने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा करार दोन्ही देशांसाठी ‘विन-विन’ ठरेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. याशिवाय, गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘द्विपक्षीय गुंतवणूक करारावर’ देखील स्वाक्षरी केली जाणार आहे.
सौर ऊर्जा आणि क्रिटिकल मिनरल्समध्ये सहकार्य पंतप्रधान मोदींनी सौर ऊर्जेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’ला पाठबळ देण्यासाठी गुजरातमध्ये ‘रूट सोलर ट्रेनिंग अकॅडमी’ स्थापन करण्यात आली आहे. ही संस्था भारतीय महिला आणि तरुणांच्या कौशल्य विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याचप्रमाणे, भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या ‘क्रिटिकल मिनरल्स’ (महत्त्वाची खनिजे) आणि पुरवठा साखळीसाठी ‘एआय पॅक्स’ (AI-PACTS) सारखा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला असून, दोन्ही देश ‘क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉर’वरही एकत्र काम करतील.
संरक्षण आणि इंडो-पॅसिफिक सुरक्षा संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी दोन्ही देशांनी एक ‘संयुक्त जाहीरनामा’ प्रसिद्ध केला आहे. यांतर्गत ‘भारत-ऑस्ट्रेलिया संरक्षण नाविन्यपूर्ण कॉरिडॉर’ (Defense Innovation Corridor) तयार केला जाईल, ज्यामुळे दोन्ही देशांतील स्टार्टअप्स आणि उद्योगांना संरक्षण साहित्य निर्मितीत संधी मिळेल. सागरी सुरक्षेसाठी ‘रोडमॅप’ तयार करण्यात आला असून, जहाज बांधणी आणि दुरुस्ती क्षेत्रातही दोन्ही देश सहकार्य वाढवतील.
दहशतवादाविरोधात एकजूट आणि ‘क्रिकेट डिप्लोमसी’ पंतप्रधान मोदींनी जागतिक व्यासपीठावरून दहशतवादाचा कडाडून निषेध केला. “दहशतवाद ही केवळ एका देशाची नाही, तर संपूर्ण मानवतेपुढील मोठी समस्या आहे,” असे सांगत त्यांनी याविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला. रशिया-युक्रेन युद्धासारख्या जागतिक तणावांवर केवळ ‘संवाद आणि मुत्सद्देगिरी’ (Dialogue and Diplomacy) हाच मार्ग असल्याचे त्यांनी ठावूकपणे सांगितले.
मेलबर्न या खेळांच्या राजधानीत मोदींनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना क्रिकेटच्या भाषेत गुंफले. ते म्हणाले, “आमचा अजेंडा ‘वन-डे’ सारखा फोकस्ड आहे, निर्णय ‘टी-२०’ सारखे वेगवान आहेत आणि आमची भागीदारी ‘टेस्ट मॅच’ सारखी प्रदीर्घ आणि खोल आहे”. आगामी ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समुळे दोन्ही देशांतील क्रीडा सहकार्य आणि गुंतवणुकीला नवे आयाम मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी, पंतप्रधान मोदींनी अल्बनीज यांना पुन्हा एकदा भारतात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण देत १४० कोटी भारतीयांच्या वतीने स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली.










