सामाजिक संवेदना जपण्यासाठी सर्व बँका आणि सर्व सहकारी संस्थांच्या सहयोगाची आवश्यकता- सुनीलजी आंबेकर

अर्थ पुणे-मुंबई
Spread the love

पुणे  :  सामाजिक संवेदना जपण्यासाठी सर्व बँका आणि सर्व सहकारी संस्थांच्या सहयोगाची आवश्यकता आहे. या सहयोगातूनच ज्यांना अडचणी आहेत त्यांना मदत करत पुढे जावे लागेल असे मत रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनीलजी आंबेकर यांनी व्यक्त केले.

जनसेवा सहकारी बँकेच्या ५० व्या वर्धापन दिन समारंभानिमित्ताने महात्मा ज्योतीराव फुले सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या ‘जनसेवा जीवन गौरव पुरस्कार’ आणि ‘जनसेवा कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी रा.स्व.संघ, प.महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, जनसेवा सहकारी बँकचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र हिरेमठ मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम नाईक, उपाध्यक्ष रवि तुपे, पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन, पुणेचे कुलकर्णी आणि सिन्नर येथील वनप्रस्थ फाऊंडेशनचे अभिजीत देशमुख यावेळी उपस्थित होते.

यावर्षी जनसेवा बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनसेवा पुरस्कार 2022 – पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या पूर्णम इको व्हिजन फाऊंडेश , पुणे आणि वनप्रस्थ फाऊंडेशन, सिन्नर यांना प्रदान करण्यात आला. रुपये १ लाख १ हजार आणि सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. जनसेवा बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या औचित्याने बँकेचे संस्थापक सदस्य मा.श्री.वसंतराव देवधर यांना जनसेवा जीवनगौरव पुरस्कार तसेच बँकेचे संस्थापक संचालक सदस्य मा. श्री. रघुनाथ तथा नाना कचरे  आणि मा. श्री. मधुकर तथा अण्णा टेमगिरे यांना जनसेवा कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेच्या ५०  वर्षांच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेणाऱ्या जनसामान्यांची असामान्य बँक या प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  

सुनीलजी आंबेकर म्हणाले, समाजामध्ये एक द्वंद्व सुरू आहे. मोठ्या बँका फक्त मोठ्या प्रकल्पांना मदत करतात आणि छोट्या बँका छोट्या व्यावसायिकांना मदत करतात. त्यामुळे मोठ्या बँका आणि छोट्या बँका असे दोन भाग झाले आहेत. परंतु, पुढील काळात सामाजिक संवेदना जपण्याच्या दृष्टीने सर्व बँका आणि सहकारी संस्थांच्या दृष्टीने सहयोगाची आवश्यकता आहे.

देशात सहकारी बँकांची संख्या कमी नाही. समाजाची सेवा करण्याच्या उद्देश ठेऊन कार्य करणाऱ्या बँका आहेत.    परंतु ५० वर्षांच्या वाटचालीनंतरही त्याच मार्गावर जाणे हे अतिशय अवघड आहे. कारण आर्थिक उलाढाल असलेले बँकिंग क्षेत्र आहे. ते जसे आर्थिक क्षेत्र आहे तसेच ते सत्तास्थान आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणेही अडचणीचे होते. असे असताना जनसेवा बँकेने प्रेरित होऊन देशाची आणि समाजाची सेवा केली आहे, असे गौरोदगार त्यांनी काढले.  

विकासामध्ये तंत्रज्ञान वापरण्याची प्रवृत्ती प्राचीन काळापासून

भारत हा कृषिप्रधान देश आहे असे म्हटले जाते. तो आहेच. आपला आपल्या देशाच्या मातीशी संबंध होता आणि तो असलाच पाहिजे. परंतु, विकासामध्ये तंत्रज्ञान वापरण्याची प्रवृत्ती व वृत्ती ही प्राचीन काळापासून आहे. प्राचीन काळातही तीनशे वर्षांपासून  जगाच्या एकूण व्यापाऱ्याचा तीस टक्के व्यापार भारताकडे होता. हिंदू व्यापारी परदेशात जाऊन व्यापार करत होते. भारताच्या परस्पर सहकार्याचे धर्मपालन आणि सहयोगाच्या भूमिकेमुळे समृद्धी आणि मानवी समूह उंचवण्याचा प्रयत्न केला गेला .परंतु, नंतर सामाजिक दृष्टीने परस्पर सहकार्यामध्ये कमतरता निर्माण झाली आणि त्यातून परिस्थिति बदलत गेली. नवनवीन तंत्रज्ञान, औद्योगीकरण हे शोषणाचे प्रतीक झाले. जगात लूट करण्याची संस्कृती आली. त्यामुळे विकेंद्रीकरण तसेच संस्थांवर आघात झाला आणि त्यामुळे समानतेचे तत्व आले नाही असे त्यांनी सांगितले.

नानासाहेब जाधव म्हणाले, समाजाचे आपण काही देणे लागतो तो भाव जागा झाला आणि त्यातून जनसेवा बँकेची निर्मिती झाली आणि सहकारातील एक माइलस्टोन ठरला. ‘वीणा सहकार नाही उद्धार’, असे म्हटले जाते परंतु ‘वीणा संस्कार नाही सहकार’ याचा मापदंड म्हणजे जनसेवा बँक आहे.

पूर्णम इको व्हिजन फाऊंडेशन, पुणेचे कुलकर्णी आणि सिन्नर येथील वनप्रस्थ फाऊंडेशनचे अभिजीत देशमुख यांनी त्यांच्या संस्थांच्या कार्याची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ, राजेंद्र हिरेमठ यांनी केले. सूत्रसंचालन संजय भुजबळ यांनी केले आणि आभार रवी तुपे यांनी मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *