कमळाबाईची आरती करत राष्ट्रवादीचे महागाई विरोधात आंदोलन

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे- पुण्यातील शनीपार चौकात महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाईची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कमळाबाईची आरती करण्यात आली. हे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. दरम्यान, गॅसची सबसिडी कुठे आहे? सबसिडीचे पैसे कुठे गेले? गॅसचे दर आज एक हजाराच्या पुढे गेले आहेत, केंद्र सरकार एवढे असंवेदनशील कसं आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

घरगुती गॅस सिलेंडरचे दर १ हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. याविरोधात पुण्यात आज राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आहे. पुण्यातील रस्त्यावर गॅसच्या टाक्या ठेवून राष्ट्रवादीने आंदोलन केले. यात आंदोलकांनी भाजप, तसेच केंद्र सरकार विरोधात घोषणा दिल्या. महागाई विरोधाती आरतीचे पठण केले. मोदी सरकार विरोधात घोषणा देवून निषेध करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी राष्ट्रवादीने महाआरती केली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी घरातील गॅसच्या टाक्या आणल्या होत्या. इंधन दरवाढ विरोधात हनुमान चालीसा लावून हनुमानाला साकडे घालण्यात आले. सीएनजी, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या आंदोलनात वासुदेवही सहभागी झाले होते. महागाईविरोधात वासुदेवाचा जागर करण्यात आला. गॅस टाकीची हार घालून पुजा करत निषेध व्यक्त केला. ‘बहोत हुई महेंगाई की मार चले जाव मोदी सरकार’ ची घोषणाबाजी सुरु होती.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जनतेचा विचार न करता केवळ आपले निर्णय त्यांच्यावर लादणारे सरकार म्हणून मोदी सरकारचा नावलौकिक आहे. वेग -वेगळे कायदे असतील, नोटबंदी जी. एस. टी लागू करणे, सरकारी कंपन्या बँका विकणे, – जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवणे असे अनेक निर्णय मोदी सरकारने या देशाला दिले आणि या निर्णयामुळे हा देश होरपळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली. एकाच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत पाच टक्क्यांनी झालेली ही वाढ खरोखर अन्यायकारक अशीच आहे.

आज जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत पेट्रोल, डिझेल, सी. एन. जी, पी. एन. जी, घरगुती गॅस, व्यवसायिक गॅस, खाद्यतेल अश्या सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत.

‘लिंबु शरबत द्यायला माझी आई नको म्हणते कारण पुण्यात लिंबू १० रुपये तर मुंबईत १५ रुपये लिंबू आहे. एवढी महागाई सध्या आहे. सुषमाजींचे शब्द ती कविता कानात आजही गुंजते आहे. मोदींना मी विचारते अनेकदा तुमचं सरकार असंवेदनशील कसं आहे?, असा सवाल सुळे यांनी केला.

राज्यात काही चांगलं झालं तर केंद्रामुळे वाईट झालं तर राज्यामुळे असं सध्या सुरु आहे. महिला लाटणं घेवून रस्त्यावर उतरल्या तर दिल्लीत बसायला जागा मिळाणार नाही. राज्यातील सर्व जिल्ह्यात महागाईची कविता वाचून आंदोलन करण्याचे आवाहन सुळे यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *