म्हणून मला बाजूला करण्यात आलं : फडणविसांचे नाव न घेता खडसेंचा निशाणा

राजकारण
Spread the love

पुणे- ओबीसींसाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी न्याय मागितला. ओबीसींसाठी ४० वर्ष संघर्ष केला, पण वापरा आणि फेकून द्या असेच भाजपचे धोरण असल्याची टीका माजी महसूलमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी कार्यक्रमात बोलताना केली. लालकृष्ण अडवणींचे आज काय झाले? असा प्रश्न उपस्थित करतानाच ओबीसींच्या नेत्यांचा मतांसाठी वापर करण्यात आल्याचा आरोप भाजपवर खडसेंनी केला.

म्हणून मला बाजूला केलं

मी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलो. आपल्या स्पर्धेमध्ये हा असता कामा नये. म्हणून बाजूला करण्यात आल्याचे खडसे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता म्हटले आहे. गेल्या ७० वर्षाच्या राजकीय जीवनात खान्देशचा मुख्यमंत्री झाला नाही. खान्देशवाशीयांना असे वाटते की, मराठवाडयाचे दोन- तीन मुख्यमंत्री झाले, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथील मुख्यमंत्री झाले. पण खान्देशमधील झाले नाहीत. अन् एखादा माणूस पोहचला, तर त्याला होऊ दिले नाही, अशी खंत खडसेंनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपसाठी उभे आयुष्य घातले. पण ते आज कुठे आहेत?, असा प्रश्न खडसेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे अशा अनेक नेत्यांनी ओबीसींसाठी न्याय मागितला. ४० वर्षे ओबीसींसाठी संघर्ष केला. परंतु, भाजपने मतांसाठी ओबीसी नेत्यांचा वापर केला. ते नेते आज कुठे आहेत? अशा अनेक कारणांसाठी पक्ष सोडून राष्ट्रवादीत यावे लागले.

पिंपरी महानगरपालिकेमधील स्थायी समितीचा अध्यक्ष कोणाच्या आदेशाने लाच घेत होता. वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याशिवाय हिंम्मत होणार नाही. माजी उपमहापौरांनी खंडणी घेतली, म्हणून ते आत आहेत. अनेकांना अजून जेलमध्ये जायचे आहे. येऊ द्या आमचे सरकार! मग बघा कसे एक- एक आत जातात ते, असा सूचक इशारा खडसे यांनी दिला.

पिंपरी महानगर पालिकेत झालेला भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडावा. आपल्या माणसाची चौकशी मागणी करत नाहीत. पण, इतरांकडे ते बोट दाखवतात. हे योग्य नाही. भ्रष्ट्राचारविरोधात भांडायचे असेल, तर आपला असो वा परका जे घडलेले आहे त्याच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी केली पाहिजे, असेही खडसे म्हणाले.

सीडी बाहेर येणार

“पुरावे न देता फक्त आरोप करायचे. तुम्हाला पुरावे देऊन चौकशी करायला कोणी अडवलं आहे का ? भाजपातल्या नेत्यांची चौकशी होत नाही, जसे की ते स्वच्छ आहेत. हे चुकीचे आहे. माझी सीडी बाहेर येणार आहे. आता सीडी बाहेर काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा.” असे खडसे म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या या सूचक वक्तव्यामुळे राजकीय भूकंप होणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बंडा तात्या कराडकर यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसें असे म्हणाले की, “वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे अपशब्द वापरले. महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत जे मद्याला हात लावत नाहीत. काही घटक असू शकतात पण सर्वांना एकाच माळेत बंडा तात्यांनी गुंतवू नये.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *